शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. बुलढाणा येथील खामगावमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरेंनी खास ठाकरी शैलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समाचार घेतला. राहुल गांधींवरही त्यांनी टीका केली. गरीबी हटावची घोषणा राहुल गांधींच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी केली होती. गांधींची गरीबी हटली आमचा गरीब तसाच राहिला असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आज जमलेली गर्दी आणि जोष पाहून काय बोलावं ते समजत नाही आमच्या विरोधात 56 पक्ष एकत्र आलेत त्यांना एवढंच सांगायचं आहे 56 काय 556 पक्ष एकत्र आले तरीही हे भगवं वादळ कुणीही रोखू शकणार नाही. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीलाच मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. राहुल गांधींसारख्या नेभळट लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का? कन्हैय्या, दाऊद यांसारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचं कलम रद्द करायचं आहे. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

राहुल गांधी यांनी एवढा जाहीरनामा आणला मात्र त्यात राम मंदिर बांधण्याचा साधा उल्लेखही नाही. राम मंदिर व्हावं ही शिवसेनेची इच्छा आहे. मी युती केली कारण शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, जनतेचं भलं होणार आहे आणि राम मंदिर बांधलं जाणार आहे. आमच्यात आणि भाजपात काही खट्टं मीठं नातं होतं. मात्र आता सगळं गोड झालंय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.