मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या तगड्या प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसच्या उमेदवार बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना एक सल्लाही दिला आहे.


प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, उर्मिला मातोंडकर या सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रसिद्ध चेहऱ्याचा फायदा घेण्यासाठीच त्यांना राजकारणात आणण्यात आले आहे. मात्र, याचे कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. त्या एका राजकीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांना राजकारणाचे चांगले ज्ञान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी जो पक्ष निवडला आहे तो चुकीचा आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

शेट्टींनी काँग्रेसवर टीका केली असली तरी उर्मिला मातोंडकर यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. उलट त्यांच्यातील राजकीय जाणीवेचे कौतुकच केले आहे. यावरुन मातोंडकरांना ते कच्चा खेळाडू म्हणून दुर्लक्षित करणार नाहीत, उलट ते या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट होते.