पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या वर्धा येथील सभेला गर्दी नव्हती अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सभेला पाच हजार माणसं जमवून दाखवावी असं आव्हान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. ४४ अंश सेल्सियस तापमानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन या सभेला निदान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवा, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आज दिले.

तावडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील वर्धा येथील पहिल्या सभेला लोकांची गर्दी नव्हती असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. हा दावा खोडून काढताना तावडे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज वर्धा येथे आज झालेल्या सभेला सुमारे १ लाख लोकांची गर्दी होती.

‘पळ काढणारे चोर नाही, चौकीदार असतात’ या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘आदर्श’ सारखा मोठा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना त्यांना काही वाटत नाही का? चंद्रपूर च्या उमदेवारीवरुन ‘पक्षात माझे कोणी ऐकत नाही’, अशी जाहीर कबुली देणाऱ्या अशोक चव्हाणांनी का पळ काढला…..निवडणुकीत बायकोला लढण्यासाठी पुढे करतात त्यावरून लोकांना कळते की, कोण पळ काढतं आहे हे दिसतंय असंही तावडेंनी म्हटलं आहे.

गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो तसे मुख्यमंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत, असे आरोप करणाऱ्या छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे व हे सरकार घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेला चिकटून राहण्याची गरज नाही. जनतेनेच आमच्यावर संपूर्ण विश्वास टाकल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहोत.