आम्ही नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले, मात्र ते चौकीदार निघाले. आम्हास १०-१५ हजारात चौकीदार मिळतो. तुमची आम्हास गरज नाही, या शब्दात सिने अभिनेते प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदींना ठणकावले.

इस्लामपूर येथील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेस काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, उमेदवार खा. राजू शेट्टी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रकाश राज म्हणाले की, मला कमी वेळ मिळाला आहे. मात्र खरे बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळही पुरेसा आहे. जेव्हा राज्यकत्रे देशातील जनतेचे प्रश्न सोडवीत नसतील,तेव्हा आम्ही रस्त्यावर येणारच. घाणेरडे राजकारण सुरू आहे. अशा समाजविघातक राजकारणाला आळा घालण्याची ताकद सामान्य मतदारामध्ये आहे. या ताकदीचा वापर या निवडणुकीत करून परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास वाटतो असेही ते म्हणाले.