भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलेले असताना तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत पातळीवर टीका केली. नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार ? अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

त्यांनी बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींना एकही मत देऊ नका असे सांगतानाच मोदींना हटवण्याचे आवाहन केले. भाजपा आणि तृणमुल काँग्रेसकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे.

मोदी काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी बदला घेणार म्हणून जाहीर केले होते. अमित शाह यांच्या रोड शो वर हल्ला करुन २४ तासात त्यांनी ते दाखवून दिले. सर्व सर्वेक्षण चाचण्यांनी भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. दीदी तुमची अस्वस्थतता आणि लोकांकडून मिळणारा पाठिंबा पाहिल्यानंतर बंगालमुळे आम्हाला ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्यास मदत होईल असा दावा मोदी यांनी केला.

पश्चिम बंगालमधील भाजपाच्या उदयाने दीदी घाबरल्या आहेत. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री बनवून त्यांना आदर दिला. पण सत्तेचा कैफ चढलेल्या ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.