निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशपातळीवरील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. निवडणुकीच्या अगोदर आता नेते मंडळींकडून मोठमोठी विधानं केली जात आहेत. शिवाय, अनेक मंत्री, आमदारांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षात प्रवेश करण्याचे सत्र देखील सुरू झाले आहे. उत्तरप्रदेशात नुकत कॅबिनेटमंत्री मौर्य यांनी भाजपाल सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आहे. तर, गोव्यात देखील भाजपाचे मंत्री मायकल लोबो यांनी पक्षत्याग केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्शभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी “भाजपा समाजमाध्यमं किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ओपिनियन पोलच्या माध्यमातून ज्या अफवा पसरवतोय, त्यावर विश्वास ठेवू नका. गोव्यात आणि उत्तरप्रदेशमध्ये १०० टक्के परिवर्तन होतय, हे तुम्ही लिहून ठेवा.” असं विधान केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आज उत्तरप्रदेशात परिवर्तन निश्चित असल्याचं म्हटलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “गोव्यात देखील भाजपा सरकारमधील प्रमुख मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांचे दुसरे प्रमुख आमदार प्रवीण झान्टे यांनी देखील भाजपा सोडली. म्हणजेच भाजपा गोव्यात, उत्तर प्रदेशमध्ये देखील अभेद्य नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे अनेक आमदार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये समाजवादी पार्टीत प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हवामानाचा अंदाज काही जणांना आलेला आहे. त्यानुसार वारं फिरतय आणि वाहतय. मौर्य यांनी देखील आज राजीनामा दिला आहे. ते ज्येष्ठ मंत्री व नेते आहेत आणि त्यांच्याबाबतीत असं बोललं जातय, की त्यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपाने तिथे सावधगिरी बाळगावी. ”

तसेच, “गोव्या संदर्भात काल आमची आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. आम्ही तयारी सुरू केलेली आहे. त्या बैठकीला अनेक प्रमुख लोक उपस्थित होते. मंत्री उदय सामंत, दिपक केसरकर, अनिल देसाई, विनायक राऊत, वैभव नाईक, संदेश पारकर, आमदार सुनिल शिंदे, सुनिल प्रभू आणि मी देखील होतो. हे सगळे लोक गोव्यात जाऊन निवडणुकीचं नेतृत्व करणार आहेत. ” अशी देखील संजय राऊत यांनी माहिती दिली.

याचबरोबर उत्तरप्रदेशात भाजपाचं जहाज बुडू लागलं आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आता लाटांचे तडाखे बसायला लागले आहेत. सध्याच्या लाटा थोड्या मंद आहेत. पण त्या उसळू शकतात, जहाज हेलकावे खाऊ शकतं असं वातावरण आहे. शिवसेनेची उत्तर प्रदेशमध्ये तयारी आहे, लवकरच समजेल. उद्या मी दिल्लीत जात आहे तिथून उत्तर प्रदेशला जातोय. त्यामुळे शिवसेना एक पक्ष म्हणून जे काय करायचं आहे ते करत राहील. उत्तरप्रदेशात ५० पेक्षा जास्त जागांवर शिवसेना लढू शकते. ”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 percent change in goa and uttar pradesh sanjay raut msr
First published on: 11-01-2022 at 17:20 IST