काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीतला पराभव भाजपाला दिसू लागला आहे. त्यामुळेच मोदींनी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या सभा वाढवल्या आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मटण खाणारे ब्राह्मण असाही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

“भाजपाने गेल्या दहा वर्षांत पाप केलं आहे. महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख झाली आहे. गरीबांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने ६० वर्षांत काय केलं वगैरे म्हणत आहेत. सातत्याने हा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून केला जातो आहे.”

हे पण वाचा लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

२०१९ मध्ये मोदींनी आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं?

“२०१९ मध्ये नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते तेव्हा लष्कराचे गणवेश शिवण्यासाठी केंद्र उभं करणार म्हणाले होते. सोलापूरमध्ये आता आले तेव्हा त्या वचनावर काहीच का बोलले नाहीत? दोन उड्डाण पुलांचा उल्लेख त्यांनी केला होता. सोलापूरचा आवाजच दिल्लीत आला नाही. २०१४ आणि २०१९ चे दोन्ही खासदार मौन राहिले. प्रणिती शिंदे या जागरुक उमेदवार आहेत.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेत ४०० रुपये देऊन कर्नाटकांतून लोक आणले गेले होते. तर राहुल गांधींच्या सभेत उत्स्फूर्तपणे लोक आले होते. लोक आता मोदींचं भाषण आणि त्यांचे मुद्दे ऐकून कंटाळले आहेत, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण

“ब्राह्मणांना शाप देण्याचा अधिकार आहे. हे आम्ही पोथी आणि पुराणांमध्ये वाचलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्यांचा शाप आम्हाला लागणार नाही.” असं नाना पटोले म्हणाले. त्यांना पत्रकाराने विचारलं की तुम्ही फडणवीसांना मटण खाताना पाहिलंय का? त्यावर पटोले म्हणाले, “आम्ही एकत्र मटण खाल्लं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

माळशिरसच्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “एक तुम्हाला सांगतो मी कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा. मी काहीच करत नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते छक्के-पंजे हे काही जमत नाही. याला गाड, त्याला पाड हे कधीच केलं नाही. आई तुळजाभवानीचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याशी विश्वासघात केला की सत्यानाश झालाच, होतोच.”