Sanjay Shirsat Claims BJP Will Emerge as the Number One Party in the 2025 Local Body Elections: राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत पार पडल्या आहेत. आज (२१ डिसेंबर) याची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. साम टीव्हीशी बोलताना शिरसाट यांनी, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे म्हटले आहे.
आम्ही दुसऱ्या क्रमांकावर…
याबाबत बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. तर आम्ही लढवलेल्या जागांच्या हिशोबाने आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहोत. याचे कारण असे आहे की, भाजपाने आमच्यापेक्षा १०० जागा अधिक लढवल्या आहेत. त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर राहतील, हे निश्चित आहे.”
आकडे लपवता येणार नाहीत
शिरसाट पुढे म्हणाले की, “नगरसेवकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आमचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील. आता या तर चिन्हावर झालेल्या निवडणुका आहेत, त्यामुळे आकडे हे लपवता येणार नाहीत. याची आकडेवारी जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हालासुद्धा खात्री पटेल की एकनाथ शिंदेंनी जे काही काम केले होते, त्याला लोकांनी दिलेली पावती आहे.”
पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नगर पंचायत आणि नगर परिषदांसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६७.६३ टक्के मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात एकूण २६३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींचा समावेश होता.
राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींमध्ये मतदानाची घोषणा केली होती. तरी, काही ठिकाणी मतदान पुढे ढकलण्यात आल्याने २ डिसेंबर रोजी केवळ २२२ नगर परिषदा आणि ४२ पंचायतींसाठीच मतदान पार पडले होते. दरम्यान, उर्वरित ७६ नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील १५४ प्रभागांमध्येही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या भागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरुड नगर परिषदेत सर्वाधिक ८८.४३ टक्के मतदान झाले होते. तर नागपूर जिल्ह्यातील बेसा पिपला येथे सर्वात कमी ५१.३३ टक्के मतदान झाले होते.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी
महाराष्ट्रातील २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी, तसेच या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १४३ रिक्त सदस्य पदांसाठीचे मतदान शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता संपले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ यांसारख्या प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता. दुपारपर्यंत ४७.०४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानाची अंतिम आकडेवारी रविवारी जाहीर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
