उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळतंय. निवडणुकांच्या काही काल आधी झालेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीमुळे अचानक भाजपला चांगली लढत मिळेल असं चित्र होतं. काही काळ तसं वातावरणही होतं. पण सपा काँग्रेसला कितीतरी फरकाने मागे टाकत भाजपने यूपीमधलं आपलं स्थान बळकट केलंय.

काँग्रेसला या निवडणुकांमध्ये मदत करणारा एक चेहरा होता तो प्रशांत किशोर यांचा. ते पाॅलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी देशभर सभा घेत असताना त्यांच्या भाषणासाठी मुद्दे शोधणं. तसंच प्रचार करण्याच्या नव्या पध्दती शोधून काढणं अशी महत्त्वाची जबाबदारी प्रशांत किशोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली. त्यांच्या कल्पनेतून पुढे आलेल्या ‘चाय पे चर्चा’ सारख्या कल्पना देशभर प्रसिध्द झाल्या. मोदींच्या इमेज निर्मितीमध्ये या सगळ्या कँपेनचा मोठा हात होता. मोदींनी त्यांच्या प्रचारासाठी ‘होलोग्राफिक प्रचार’, व्हिडिओद्वारे प्रचार असे अनेक मार्ग अवलंबले होते. या सगळ्या प्रचारतंत्राची देशभर चर्चा झाली होती. मीडिया आणि इंटरनेट सॅव्ही तरूण पिढीला आकर्षित करायला मोदी यशस्वी ठरले होते. या सगळ्या स्ट्रॅटेजींमागे प्रशांत किशोर यांच्या कल्पना होत्या.

भाजपच्या गोटातून प्रशांत किशोर यांना काँग्रेसने आयात केलं खरं. पण उत्तर प्रदेश निवडणुकांचा कल लक्षात घेता प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी फेल झाली आहे का? असा प्रश्न आता मोठ्या आवाजात विचारला जातोय. निवडणुकांआधी काँग्रेसच्या प्रचारासाठी ‘खाट पे चर्चा’ छी कल्पना काढली होती. त्यानुसार राहुल गांधींनी अनेक गावांमध्ये जात खाटेवर बसून तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेश विधानसभेत याआधी फक्त ४७ जागा असणाऱ्या भाजपने यंदा २०२ चा आकडा सहज ओलांडला आणि याउलट काँग्रेस-सपा जोडी शंभरीही पार करेल की नाही अशी शंका आहे. प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांची स्टार व्हॅल्यू उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये पार फिकी पडल्याचं चित्र दिसतंय.

Uttar Pradesh Assembly Election Results 2017: यूपीत भाजपकडून ‘हे’ असतील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात आपल्या कारकीर्दीची सुरूवात केलेल्या किशोर यांची संयुक्त राष्ट्रांनी ट्रेनीशिपसाठी २००० च्या दशकात निवड केली होती. त्यानिमित्ताने त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थांचं कामकाज आणि ते वापरत असलेल्या प्रचाराच्या पध्दतींची ओळख झाली होती. आपलं हे सर्व कौशल्य यशस्वीपणे वापरत त्यांनी मोदींच्या लोकसभा निवडणुकांमधल्या विजयात मोठा वाटा उचलला. पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या प्रचारतंत्राची जादू फारशी चालली नाही.

काँग्रेसचं उत्तर प्रदेशमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं तितकंसं दमदार नाही. गावपातळीवर जात घराघरातल्या मतदारांशी बोलतील अशा कार्यकर्त्यांची मोठी फळी काँग्रेसकडे नाही. प्रशांत किशोर यांच्या प्रचारतंत्राच्या नावीन्याने लोकसभा निवडणुकीत बाजी मारली खरी. पण  डिजिटल क्लृप्त्यांसोबत मतदारांशी प्रत्यक्ष साधलेला संवाद अजूनही तितकंच महत्त्वाचा अाहे हे या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय.

[jwplayer UV9HGpIn]