वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र आहे. या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. अक्षय तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात. या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते अशी एक श्रद्धा आहे. संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे. संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला संपत्तीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व हिंदू धर्मात आहे. अक्षय्य या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही. या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं, जेणे करून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील. याच दिवशी परशुरामाचाही जन्म झाल्याचं मानण्यात येतं. भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचीही आज आराधना करण्यात येते. भगवान विष्णू व त्याची पत्नी लक्ष्मी यांची पूजा केली तर सुख व समृद्धी येते अशी हिंदूंची श्रद्धा आहे. सोने खरेदी करण्याशिवाय नवीन उपक्रम, उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदूंमध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो. हिंदूंचं थोर संचित व महाकाव्य असलेलं महाभारत लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे. तीर्थंकर भगवान ऋषभनाथांचा सहा महिन्यांचा उपवास आज संपला म्हणून जैन धर्माचे लोक आजचा दिवस साजरा करतात. त्यामुळे सोनं खरेदी करत जैन धर्मीय अक्षय्य तृतिया साजरी करतात. हिंदू व जैन दोन्ही पुराणकथांमध्ये अक्षय्य तृतीयेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यानं या दिवसाला दोन्ही धर्मीय साजरा करतात.