तुषार वैती

पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घालण्याचे भारतीय महिला संघाचे स्वप्न रविवारी भंगले. संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविणारा भारतीय महिलांचा संघ अंतिम सामन्यात मात्र पूर्णपणे ढेपाळला, त्यामुळे तमाम चाहत्यांची निराशा झाली. ऑस्ट्रेलियाने भारतावर ८५ धावांनी विजय मिळवत पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारताच्या पराभवाची ही पाच प्रमुख कारणे –

१) पाटा खेळपट्टी

आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान किंवा फिरकी गोलंदाजांना साथ देणाºया होत्या. त्यामुळेच भारताच्या फिरकीपटूंनी उपांत्य फेरीपर्यंत घवघवीत यश संपादन केले होते. सलामीच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षरश: आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले होते. पण अंतिम सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची खेळपट्टी पाटा बनवण्यात आली होती. त्यामुळेच घरच्या मैदानाचा, वातावरणाचा आणि चाहत्यांच्या पाठिंब्याचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घट्ट केली.

२) गचाळ क्षेत्ररक्षण

‘झेल पकडा, सामना जिंका’ अशी क्रिकेटमध्ये म्हण प्रचलित आहे. पण अंतिम सामन्यात भारताला गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. सामन्याच्या पाचव्याच चेंडूवर शफाली वर्माने अलिसा हिलीचा झेल सोडला. त्यानंतर चौथ्या षटकांत राजेश्वरी गायकवाडने आपल्याच गोलंदाजीवर बेथ मूनीला जीवदान दिले. दोन्ही सलामीवीरांना मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत या दोघींनी ११५ धावांची सलामी नोंदवली.

३) गोलंदाजांचे पानिपत

भारताची मुख्य भिस्त ही फिरकीपटूंवर होती. लेग-स्पिनर पूनम यादव आणि ऑफ-स्पिनर दीप्ती शर्मा यांनी संपूर्ण विश्वचषकादरम्यान आपली छाप पाडली होती. अंतिम सामन्यातही फिरकीपटूंकडूनच मोठ्या अपेक्षा असताना भारताने एकच वेगवान गोलंदाजाला संधी दिली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांपुढे भारताच्या फिरकीपटूंचे पानिपत झाले.

४) शफालीकडून निराशा

शफाली वर्माची बॅट संपूर्ण स्पर्धेदरम्यान तळपली होती. साखळीतील चारही सामन्यात तिच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने सर्व सामने जिंकून अग्रस्थान पटकावले होते. त्यामुळे अंतिम सामन्यातही तिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण ऑस्ट्रेलियाचे १८५ धावांचे अशक्यप्राय आव्हान पेलताना शफालीने चाहत्यांची सपेशल निराशा केली. पहिल्याच षटकांत शफाली अवघ्या २ धावा काढून माघारी परतल्यानंतर भारताचा संघ सावरूच शकला नाही.

५) स्मृती, हरमनप्रीतची सुमार कामगिरी

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची भिस्त स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या अनुभवी फलंदाजांवर होती. पण संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना सूरच गवसला नाही. अंतिम सामन्यातही मानधना आणि हरमनप्रीत यांनी सुमार कामगिरी केल्यामुळे भारताचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मानधनाने या स्पर्धेत १०, ११, १७, ११ अशा धावा केल्या, तर हरमनप्रीतने २, ८, १, १५, ४ अशा धावा फटकावल्या.