आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये इराण लवकरच काबीज केले जाईल असा इशारा तालिबानकडून देण्यात आला आहे. यासाठी अमेरिकेबरोबर झालेल्या संघर्षापेक्षाही उत्कट लढा आम्ही या युद्धात देवू असेही या व्हिडिओत तालिबानकडून सांगण्यात आले आहे. आजतागायत जगात पाण्यावरून अनेक वाद झाले आहेत. पाणी हे जीवन आहे. ते सांभाळून वापराने ही काळाची गरज आहे. आज आंतराष्ट्रीय स्तरावर पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे. काय आहे नेमके हे प्रकरण?

वाद नदीवरून पण इतरही मुद्दे ऐरणीवर

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील ‘निमरोझ’ या प्रांताची एक सीमा इराणला लागून आहे. सध्या याच भागात तणावाचे वातावरण आहे. याच भागात अफगाणिस्तान व इराण यांच्या सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. २७ मे २०२३ रोजी झालेल्या गोळीबारात दोन इराणी सैनिक (बॉर्डर गार्ड) आणि तर एक तालिबानी सैनिक (बॉर्डर गार्ड) मारला गेला. या चकमकीत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या प्रकरणात कोणत्या देशाच्या सैनिकांकडून आधी गोळीबार करण्यात आला या विषयावर आरोप -प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. अफगाणिस्तान व इराण यांच्यात ‘हेलमंड’ या नदीच्या पाण्यावरून या वादंगाला वाट फुटल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असले तरी या वादाला अनेक कंगोरे आहेत. यामध्ये अफगाणी नद्यांचे पाणी, अफगाणी निर्वासितांची मोठी संख्या, इराणमध्ये अवैध ड्रग्जचा प्रवाह आणि तालिबानकडून होणारे शिया मुस्लिमांवर हल्ले यांसारख्या अनेक समस्यांचा समावेश होतो. त्यामुळेच आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धाची गांभीर्याने चर्चा होताना दिसत आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी अशाच स्वरूपाच्या घटना झाल्या होत्या. परंतु आताच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?
For the third day in Russia mourn the death of Alexei Navalny
रशियात नागरिकांमध्ये वाढता आक्रोश
Talks between Muslim League Nawaz and Bilawal Bhutto Zardari led Pakistan People Party failed
पाकिस्तानात सरकार स्थापनेची चर्चा निष्फळ

आणखी वाचा : विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!

इराण- अफगाणिस्तान सीमावाद

इराण व अफगाणिस्तान यांच्यात समान सीमा आहेत. इतकेच नव्हे तर समान भाषा, संस्कृती अशा अनेक मार्गाने या दोन देशांमधील सांस्कृतिक तसेच प्रादेशिक अनुबंध लक्षात येतो. परंतु २०२१ सालापासून या सांस्कृतिक व प्रादेशिक संबंधात वितुष्ट आले आहे; या मागील मुख्य कारण म्हणजे ‘तालिबान’. २०२१ साली तालिबानने अफगाणिस्तान सरकार काबीज केले. तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये पराकोटीच्या तणावाला सुरुवात झाली. अफगाणिस्तान व इराण यांच्यात ५७२ मैलांची सीमा रेषा आहे. ही सीमा वायव्य अफगाणिस्तानमध्ये तुर्कमेनिस्तानच्या त्रिबिंदूपासून (इराण, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान यांच्यात समान सीमा आहेत) सुरू होते. आणि पाकिस्तानसह दक्षिणेकडील त्रिबिंदूवर समाप्त होते. १८७२ साली ब्रिटिशांच्या पुढाकाराने इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा ठरविण्यात आली होती. तत्कालीन इराणी शाह ‘नसेर अल-दिन (शाह)’ यांनी पाचारण केल्यानंतर सर फेड्रिक गोल्डस्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून ही सीमा निश्चित करण्यात आली. त्यावेळीदेखील इराण व अफगाणिस्तान यांच्यात वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे हा तोडगा काढण्यात आला होता. या घटनेला दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला असला तरी आज नव्या स्वरूपात इराण-अफगाणिस्तान यांच्यातील वाद समोर आला आहे.

सीमाभागात तणाव नेमका कशासाठी?

इराण व अफगाणिस्तान यांच्यातील विद्यमान सीमा १८७२ सालापासून स्वीकारण्यात आली आहे. असे असले तरी या सीमावर्ती भागात तणाव कायम आहे. दक्षिणेकडील झाबोल-झारंज सीमेजवळील हामुन सरोवराचा भाग वगळता सीमेवरील बहुतेक भाग रखरखीत आहे, यामुळे या भागात मानवी वस्ती कमी आहे. त्यामुळेच पाण्याच्या उपलब्धतेवरून या दोन्ही देशात नेहमीच वादंग निर्माण होतो. या सीमावर्ती भागात तीन प्रमुख सीमा- बॉर्डर क्रॉसिंगस् (म्हणजेच जेथून सीमा पार करून दुसऱ्या देशात प्रवेश करता येतो) आहेत. या बॉर्डर क्रॉसिंगस् मध्ये उत्तर भागातील इस्लाम कला (Islam Qala), मध्य भागातील अबू नसर फराही (Abu Nasr Farahi) आणि दक्षिण बलुचिस्तान भागातील झारंज (Zaranj) यांचा समावेश होतो. या सर्वांमध्ये झारंज बॉर्डर क्रॉसिंग प्रमुख आहे. अफगाणिस्तानकडे येणारा व्यापारी माल याच मार्गाने या देशात प्रवेश करतो. तसेच अफगाण शरणार्थी इराणमध्ये याच मार्गाने अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यावरूनच या झारंज बॉर्डर क्रॉसिंगचे महत्त्व लक्षात येते. झारंज या प्रांताचा उल्लेख इराणी पौराणिक कथांमध्ये वारंवार येतो. किंबहुना पर्शियन दंतकथा आणि लोककथा (झीदान) यांमध्ये या प्रांताचा आलेला उल्लेख या भागाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करतो.

झारंजची या तणावातील भूमिका

हेरात, हे पश्चिम अफगाणिस्तानमधील प्रमुख शहर सीमेपासून १०० मैलांवर वसलेले आहे. तर मशहद, हे पूर्व इराण मधील प्रमुख शहर असून सीमेपासून अंदाजे १३० मैल अंतरावर आहे. या पार्श्वभूमीवर इराण व अफगाणिस्तानला जोडणाऱ्या सीमेजवळील झारंज हे एक लाख लोकसंख्या असलेले दक्षिणेकडील दश्त-ए मार्गो वाळवंटातील एकमेव अफगाण शहर आहे. त्यामुळेच या शहराला राजकीय व आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे शहर मुख्यतः इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी तस्करांच्या आत किंवा बाहेर जाण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. हा भाग दुर्गम असूनही मोठ्या प्रमाणात या भागात मानवी वर्दळ आहे. याच शहरातुन तस्करीला मोठ्या प्रमाणात वाव मिळतो. इराणमधून अफगाणिस्तानमध्ये पोहोचवल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये बांधकाम साहित्य, पेट्रोलियम आणि खाद्यपदार्थांचा समावेश होतो. अफगाणिस्तानमध्ये निर्यात होणारा बहुतांश माल हा अवैध तस्करीमध्ये मोडतो. मूलतः हेच शहर इराणमध्ये पोहचवण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांचे केंद्रबिंदू मानले जाते. त्यामुळे झारंज ही शहर देखील इराण व अफगाणिस्तान यांच्यातील वादाला कारणीभूत ठरले आहे.

युद्धाला कारणीभूत ठरलेली हेंलमंड नदी व हामुन सरोवर

इराण व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये १९७३ साली हेलमंड नदीच्या पाणी वाटपावरून एक करार करण्यात आला होता. असे असले तरी प्रत्यक्ष या कराराला २०२२ साली इराण व अफगाणिस्तान या दोन्ही देशांकडून मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार अफगाणिस्तानकडून इराणला प्रति सेकंद २२ घनमीटर, व अतिरिक्त ४ घनफूट पाण्याचा हक्क दिला होता. परंतु अफगाणिस्तानने आपल्या देशात पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इराणला पाणी कपातीचा सामना करणे भाग पडत आहे, असा आरोप इराणकडून करण्यात येत आहे. हेलमंड नदी काबुल जवळ उगम पावते. ही नदी १५ हजार किमी लांब आहे. हेलमंड नदी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुशच्या सांगलाख पर्वतरांगेतून उपनदी म्हणून प्रवाहित होते. मूलतः ही एक हिमनदी आहे. त्यानंतर अफगाणिस्तान ओलांडून नैऋत्येकडे ‘लष्करगाह’ या अफगाण शहरातून वाहत शेवटी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दक्षिण सीमेवरील हामुन सरोवरास जाऊन मिळते. नैऋत्य अफगाणिस्तान आणि आग्नेय इराणमधील सिस्तान खोऱ्यासाठी हा प्रमुख जलस्रोत आहे. सरोवराला कोणताही बाहेर जाणारा मार्ग नाही, त्यामुळे तलावात वाहून जाणारे पाणी तिथेच राहते किंवा बाष्पीभवन होते, एकूणच हा भाग एंडोरेइक ड्रेनेज सिस्टम मध्ये मोडतो (एंडोरेइक ड्रेनेज सिस्टम म्हणजे या भागात पाणी येते परंतु ते इतर कुठल्याही इतर जलप्रवाहांमध्ये प्रवाहित होत नाही). हामुन सरोवर इराण -अफगाणिस्तान सीमेवरील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळेच हे सरोवर अर्थव्यवस्था आणि पर्यावरणा यासाठी महत्त्वाचे मानले जाते. १९९९ ते २००१ साला दरम्यान या प्रदेशात पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे या सरोवरातील पाणीपुरवठा कमी झाला होता; यामुळे काही भागात तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. २०१६ साली युनेस्कोने पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संरक्षणाच्या उद्देशाने हामुन सरोवराला जागतिक जैव राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?

इराणसाठी हेलमंड नदी व हामुन सरोवरा यांचे महत्त्व काय?

इराण सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गेल्या दोन दशकांमध्ये इराणच्या सीमा प्रदेशातील २५ % ते ३०% लोकसंख्येने हे क्षेत्र कायमस्वरूपी सोडल्याचा अंदाज आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे येथील जनता इराणच्या प्रमुख शहरी उपनगरांकडे स्थलांतरित होत आहे. हेलमंडचे पाणी सीमेच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यामुळेच हा संघर्षही होताना दिसत आहे. हेलमंडच्या पाण्यावर ताबा कोणाला द्यायचा यावरून वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानने अनेक धरणे बांधली आहेत. सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी हेलमंड नदीतील पाण्याचा वापर अफगाणिस्तानमध्ये होत आहे. यासाठी अफगाणिस्तानकडून धरणांच्या माध्यमातून पाण्याला बांध घालण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील कमाल खान धरण इराण सीमाक्षेत्रातील पाणी टंचाईसाठी कारणीभूत असल्याचा दावा इराणने केला आहे. हे धरण झारंजच्या आग्नेयेस सुमारे ६० मैलांवर आहे. तर वादग्रस्त सीमेपासून सुमारे ६० मैल अंतरावर आहे.

कमाल खान धरण

धरणाचे काम १९९६ सालामध्ये सुरू झाले होते, परंतु अफगाणिस्तानमधील राजकीय अस्थिरतेमुळे काम बंद पडले . २०१४ साली हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आणि मार्च २०२१ मध्ये या धरणाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. इराणचा दावा आहे की, अफगाण शेतकरी आणखी पाणी मिळविण्यासाठी अतिरिक्त कालवे खोदत आहेत. त्यामुळे इराणच्या दिशेने येणाऱ्या पाण्यात कपात झाली आहे. इतकेच नाही तर इराणकडून १९७३ साली करण्यात आलेल्या करारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. करारात नमूद करण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. ही मागणी ३ ऑगस्ट २०२२ साली तालिबानकडून फेटाळण्यात आली व ठरलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.

एकूणात दोन्ही बाजूंकडून या विषयावर कोणीही सामंजस्याची भूमिका घेण्यास तयार नसल्याने या समस्येवर तोडगा निघणे कठीण झाले आहे आणि त्याचीच परिणिती होवू घातलेल्या युद्धात दिसत आहे.