– कुलदीप घायवट

वांद्रे एस. व्ही. रोड जंक्शन येथे २५ जानेवारी रोजी बेस्टची बस जळून खाक झाली. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी अंधेरी पूर्व चकाला जंक्शन येथे बेस्ट बसने पेट घेतला. या दोन्ही घटनांची पुनरावृत्ती २२ फेब्रुवारी रोजी झाली. या दिवशी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे विनावातानुकूलित सीएनजी बस आगीची भक्ष्य बनली. या तिन्ही बस मातेश्वरी कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर चालवण्यात येत होत्या. त्यामुळे बेस्टने मातेश्वरीच्या ४०० सीएनजी बस तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे देशातील पहिली विद्युत दुमजली वातानुकूलित बस मुंबईत सुरू होत आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील ४०० सीएनजी बस बंद करून समस्येपासून ‘यू-टर्न’ घेतला जात आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे मातेश्वरी कंपनीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न आणि मुंबईतील सुमारे ३० ते ३५ लाख प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

बेस्टमधील पहिली सीएनजी बस कधी सुरू झाली?

बेस्टची पहिली सीएनजी बस १९९७ साली सुरू झाली. त्यानंतर, २०२० साली भाडेतत्त्वावरील वातानुकूलित सीएनजी बस सुरू झाली. बस क्रमांक ७७ भायखळा ते ब्रीच कँडी या मार्गावर धावू लागली. २०२१ साली मातेश्वरी कंपनीची विनावातानुकूलित सीएनजी बस बेस्ट ताफ्यात दाखल झाली. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ६१९ बस असून यामधील २ हजार ९२७ सीएनजीवरील बस आणि ४२६ विद्युत बस आणि २६६ डिझेल बस आहेत.

स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसमध्ये फरक काय?

पूर्वीपासूनच बेस्टच्या स्वमालकीच्या बस होत्या. त्यावरील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी हे बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी असत. मात्र, प्रवासी सेवेमध्ये नावीन्यता नसणे, आधुनिकीकरणाची कास नसणे, व्यवस्थापनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे बेस्ट उपक्रम आर्थिक गर्तेत अडकला. त्यानंतर काही वर्षांपूर्वी बेस्ट उपक्रमाने आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी कंत्राटीकरणाचा मार्ग अवलंबला. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यास सुरुवात केली. तसेच, चालक आणि वाहकांचीदेखील कंत्राटी पद्धतीने भरती केली. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील १ हजार ८५५ बस आहेत. तर, स्वमालकीच्या १ हजार ७७९ बस आहेत.

आता पुढे काय?

तांत्रिक बिघाडामुळे मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या जवळपास ४०० गाड्या बेस्टने बंद केल्या आहेत. यामुळे तेथील कर्मचाऱ्यांचेदेखील रोजगार धोक्यात आले आहेत. या दोन्ही कारणांमुळे मुंबईकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. म्हणून, बेस्ट उपक्रमाने ‘वेट लिजिंग कॉन्ट्रॅक्ट’ धोरण तात्काळ रद्द करून स्वतःच्या मालकीच्या बस गाड्या घ्याव्यात, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. मात्र याबाबत बेस्टने अद्याप काही ठोस निर्णय घेतलेला नाही.

बसच्या मूळ निर्मितीमध्ये बदल केल्याने आगीच्या घटना?

पूर्वीप्रमाणे बेस्ट बसच्या यांत्रिक बाबी वारंवार तपासल्या जात नाहीत. तसेच, सध्या कंत्राटदारांकडून मूळ बस निर्मात्याच्या बसमध्ये बदल करून बस चालवण्यात येतात. कंत्राटदारांकडून अनेक यांत्रिक रचनेत बदल करण्यात आले आहेत. असे बदल केल्याने बसगाडीला आग लागण्याच्या घटना घडत असल्याची शक्यता आहे. तसेच, कंत्राटदारांकडून करण्यात येणाऱ्या यांत्रिक बदलाच्या बाबत बेस्ट उपक्रमाकडून कानाडोळा केला जातो, असे बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी सांगितले.

मुंबईकरांवर काय परिणाम झाला?

स्वस्त आणि वेगवान प्रवास म्हणून बेस्ट बसकडे पाहिले जाते. मात्र, आगीच्या घटनेनंतर तडकाफडकी ४०० बस बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रतीक्षा नगर, मजास, धारावी, सांताक्रूझ या बस आगारातील सुमारे ३६ बस मार्गांवर त्याचा खूप परिणाम दिसून आला. या मार्गावरील परिणाम कमी करण्यासाठी इतर आगारांतील बस या मार्गावर चालवण्यात आल्या. मात्र, त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांना बसची वाट पाहात राहावे लागले. ज्या बस थांब्यावर साधारण ५ ते १५ मिनिटांत बस येत होती, तेथे १५ ते ३० मिनिटे उशिराने बस येत आहेत. मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, पूर्व-पश्चिम उपनगरातील वाहतुकीवर निर्णयाचा परिणाम दिसून आला.

हेही वाचा : मुंबई महानगर प्रदेशात CNG वर चालणाऱ्या गाड्यांना ग्राहकांची पसंती; तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी झाली वाढ

आगीच्या घटनेनंतर बेस्ट उपक्रमाची भूमिका काय?

कंत्राटदाराने आणि मूळ बस निर्मात्याने आवश्यक बदल तसेच योग्य उपाययोजना करेपर्यंत आणि भविष्यात अशा घटना न होण्याची खबरदारी घेईपर्यंत बेस्ट उपक्रमाने सर्व ४०० बसगाड्या प्रवर्तित न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी बेस्टने त्या मार्गावर २९७ बस चालवल्या. तर, मे. मातेश्वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या सीएनजी बस या टाटा कंपनीच्या असल्याने लखनौहून टाटा मोटर्सचे एक अभियंता पथक मुंबईत दाखल झाले आहे. सुरक्षा मानके आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी या सर्व बसची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. येत्या ६ ते ७ दिवसांत ही तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेस्टसाठी प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे बेस्ट उपक्रमाद्वारे सांगण्यात आले.