जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतील मोठे बंड, त्यानंतर राज्यात झालेला सत्ताबदल, उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव गमवावे लागणे आणि गोठवले गेलेले ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह या अल्प काळातील पाठोपाठच्या घडामोडींमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात होत असलेली निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी कमालीची प्रतिष्ठेची ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कोणाची, यावरून रण पेटले असताना मुंबईतील ही पोटनिवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. मुळात अंधेरीचा हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी याच मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते.

२०१४नंतर बदललेल्या राजकीय समीकरणात या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके सलग दोन वेळा निवडून आले. नगरसेवक म्हणून लटके यांचा अंधेरी पूर्व भागात वर्षानुवर्षे राहिलेला वावर आणि त्यांचा जनसंपर्क या दोन गोष्टी शिवसेनेसाठी नेहमीच पोषक ठरल्या. हे जरी खरे असले भाजपला मानणारा एक मोठा मतदार या मतदारसंघात आहे हे मागील दोन्ही निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची यावरून शिंदे-ठाकरे यांच्या रंगलेला वाद अधिक चर्चेत असला तरी येथील खरी आणि अपेक्षित लढत ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतच होती असे जाणकार सांगतात. लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून, तर मुरजी पटेल भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला शिवसेनेकडे कसा आला?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा तसा संमिश्र लोकवस्तीचा आहे. या संमिश्र लोकवस्तीचा आणि येथील मतदारांचा कल २०१४च्या पूर्वीपर्यंत नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहात असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची या मतदारसंघावर उत्तम पकड होती. आघाडी सरकारच्या काळात आरोग्यमंत्री असणारे शेट्टी तीन वेळा येथून निवडून आले. २०१४नंतर देशातील आणि राज्यातील राजकीय गणिते बदलली तसा हा मतदारसंघही धक्कादायक निकाल नोंदवत गेला. मुंबईतील एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ भाजप आणि शिवसेनेसाठी अनुकूल बनला. २०१४मध्ये शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात निवडणूक लढले. त्यावेळी शिवसेनेकडून रमेश लटके यांनी भाजपचे सुनील यादव यांचा जेमतेम ५४७९ मतांनी पराभव केला. काँग्रेसकडून लढलेले सुरेश शेट्टी तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या मतदारसंघात २००९च्या निवडणुकीत शेट्टी यांनी लटके यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे २०१४मधील लढत शेट्टी विरुद्ध लटके अशीच होईल असा अंदाज बांधला जात असताना भाजपचा उमेदवार येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Andheri Bypoll: “जास्त म्याव म्याव केलं तर…,” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जाहीर इशारा, उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

संमिश्र मतदारांमुळे शिवसेनेपुढील आव्हाने अधिक?

मुंबईतील काही ठराविक भागांप्रमाणे अंधेरी पूर्वचा मतदारसंघ हा काही मराठमोळा नाही. जवळपास दोन लाख ७० हजारांच्या घरात मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्या अशी संमिश्र लोकवस्ती आहे. मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लिम आणि लक्षणीय असे ख्रिश्चन मतदार या ठिकाणी आहेत. काँग्रेस आणि शेट्टी यांच्या मदतीला हा अमराठी मतदार नेहमीच धावून जात असे. मराठी आणि गुजराती मतदारांच्या जोरावर रमेश लटके हेदेखील येथून शेट्टी यांना कडवी लढत देत असत. अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, गोंदवली, भवानी नगर, विजय नगर, अंधेरी-कुर्ला मार्गावरील काही वस्त्यांचा या मतदारसंघात समावेश होतो. २०१४मध्ये येथील अमराठी मतदारांनी भाजप उमेदवार सुनील यादव यांना भरभरून मतदान केल्याचे दिसून आले होते. यंदाही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची याच मतदारांवर आणि त्यातही विशेषत: गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मतदारांवर भिस्त असेल असेच दिसते. हा संमिश्र मतदार शिवसेनेसाठी आव्हान ठरू शकतो असे चित्र असले तरी येथील परंपरागत काँग्रेसचा मतदार कोणती भूमिका घेतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

विश्लेषण : “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही”, आपच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला त्या डॉ. आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा कोणत्या?

काँग्रेसचा मतदार निर्णायक ठरू शकेल का?

२०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांनी येथून १७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला असला तरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले मुरजी पटेल यांनी मिळवलेली ४४ हजार मते अनेकांची लक्ष ‌वेधणारी ठरली. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकमेकांविरोधात ‘छुपे’ उमेदवार उभे केले होते. मुरजी (काका) हे असेच एक उमेदवार असल्याची जाहीर चर्चा त्यावेळी या मतदारसंघात होती. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका केशरबेन यांनी साधारण २०१५मध्ये काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. केशरबेन या २०१२मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.

पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

२०१७मध्ये मात्र मुरजी आणि त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवारीवर नगरसेवक झाले. या विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात महापालिकेचे आठ नगरसेवक निवडून येतात. त्यांपैकी २०१७मध्ये शिवसेनेचे चार, काँग्रेसच्या दोन (त्यांपैकी संध्या राय आता शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला जात आहे) आणि भाजपचे दोन नगरसेवक आहेत. २०१९मध्ये येथून काँग्रेसच्या उमेदवाराला २५ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. येथील मुस्लिम, ख्रिश्चन मतदार काँग्रेसकडे वळला होता असे गृहीत धरले तर यावेळी हा मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी निर्णायक ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andheri east assembly by election rutuja latke uddhav thackeray challenges print exp pmw
First published on: 14-10-2022 at 14:19 IST