Indian City Blackout Measures: भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान गुरूवारी (८ मे) भारतातील १५हून अधिक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. श्रीनगर पासून चंदीगड ते भूज पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पश्चिम आणि उत्तर सीमेवरील भारतीय लष्करी सुविधांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात आला. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी प्रतिहल्ला सुरू केल्यामुळे ब्लॅकआउट करण्यात आले. ब्लॅकआउट म्हणजे जेव्हा काही नेमलेल्या क्षेत्रात सर्व दिवे बंद केले जातात किंवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवले जातात. असे केल्याने सामान्य जनजीवनात याची नेमकी कशी मदत होते आणि जेव्हा वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा नेमके काय होते याबाबत जाणून घेऊ…
हल्ला झाल्यास ब्लॅकआउट करणे म्हणजे नेमकं काय?
शत्रूपक्षाकडून हल्ला झाल्यावर संघर्षकाळात ब्लॅकआउट केल्यामुळे खुल्या हवेतून दिसणारे सर्व प्रकाश स्त्रोत नष्ट होतात. ते प्रकाश योजनांच्या निर्बंधाचा एक भाग आहेत आणि त्यामुळे नागरी संरक्षण यंत्रणा आणखी मजबूत करण्यास मदत होते. भारताविरूद्ध हल्ल्याच्या बाबतीत नागरिकांनी काय करावे याची माहिती मिळावी यासाठी भारताच्या धोरणाचा एक भाग म्हणून ७ मे रोजी २४४ नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या मॉक ड्रिलमध्ये ब्लॅकआउट चाचण्यादेखील घेण्यात आल्या.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत नागरी संरक्षण महासंचालनालयाच्या २००३ च्या आदेशामध्ये भारतातील नागरी संरक्षणाची सामान्य तत्त्वे अशी एक नियमावली सादर करण्यात आली होती. त्यामध्ये हवाई हल्ल्यांपासून सुरक्षेच्या दृष्टीने बाळगण्याच्या सावधगिरीच्या उपायांमध्ये प्रकाश निर्बंध हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे स्पष्ट केले आहे. सामान्य दृश्यमानतेच्या परिस्थितीत जमिनीपासून ५ हजार फूट उंचीवर अजिबात प्रकाश दिसू नये असंही या नियमावलीत सांगितले आहे.
‘ब्लॅकआउट’ कशी मदत करते?
रात्रीच्या वेळी शत्रूच्या विमानांपासून लोकांना अंधाराबाबत अस्वस्थता न बाळगता स्वत:चे आणि भौतिक पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यास सक्षम करणे हे ब्लॅकआउटचे उद्दिष्ट आहे. ब्लॅकआउट्समुळे प्रगत हाय-स्पीड विमानांसाठीही जमिनीवरील लक्ष्यांना लॉक करणे कठीण होते. नागरी संरक्षण महासंचालनालयाच्या आदेशात असेही सांगितले आहे की, “जर परिसर अंधारात असेल तर कॉकपिटमधील शत्रूपक्षातील वैमानिकांनाही अडचण निर्माण होऊ शकते. पुढे कालांतराने ब्लॅकआउटदरम्यान धोक्याची पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि तांत्रिक गोष्टीत प्रगती झाली तरीही हे कायमच असणार आहे.”
प्रकाशयोजनेवर निर्बंध कसे लावायचे?
आदेशात असेही म्हटले आहे की, सर्व प्रकाशयोजनांचे निर्बंध एकाच वेळी लादणे हे शक्य नाही. सर्वोत्तम मार्ग म्हणजे ही हालचाल हळूहळू करणे. जेणेकरून नागरिक त्यांचे सामान्य काम कमीत कमी प्रकाशात करू शकतील. यामध्ये रस्त्यांवरील दिवे, इमारती आणि वाहनांमधील दिवे आणि मोठ्या संकुलांचाही समावेश आहे.
म्हणजे रस्त्यावरील दिव्यांचं उदाहरण घेतलं तर या पथदिव्यांची संख्या कमीत कमी असली पाहिजे. तसंच उरलेल्या दिव्यांचा प्रकाश शक्य तितका कमी करावा. जमिनीवर प्रकाश परावर्तित होणार नाही याची खात्री करावी.
“इमारती किंवा मोकळ्या मैदानाच्या बाबतीत कोणत्याही ठिकाणी इमारतीच्या बाहेर पोहोचणारा एकूण प्रकाश हा २० फूट अंतरावर असलेल्या २५ वॅटच्या बल्बने किंवा ६ फूट अंतरावर असलेल्या सामान्य हरीकेन कंदीलने जमिनीवर टाकलेल्या प्रकाशापेक्षा जास्त नसावा,” असेही आदेशात सांगितले आहे.
‘क्रॅश ब्लॅकआउट’ म्हणजे काय?
हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यावर कारखाने आणि व्यावसायिक परिसरांमध्ये ‘क्रॅश ब्लॅकआउट’ लागू केले जाते. रात्रीच्या वेळी हवाई हल्ल्याचे लक्ष्य म्हणून दिसत असलेल्या इमारती निशाणा ठरू नयेत हा यामागचा उद्देश आहे. भौगोलिक स्थान तपासण्याचे सोपे साधन हिरावून घेणे हा देखील याचा मूळ उद्देश आहे. यामुळे तो केवळ या मोठ्या परिसरांसाठीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी एक संरक्षक उपाय ठरतो. जर सहाय्यक किंवा पूरक प्रकाशयोजना वापरली जात असेल तर ती व्यावसायिक इमारतीच्या मुख्य विद्युत पुरवठ्याऐवजी दुसऱ्या स्रोताकडून वीज वापरली पाहिजे. अशा परिस्थितीत बॅटरी किंवा लहान पेट्रोलवर चालणारे जनरेटर वापरणे योग्य ठरते.