संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेला गुरुवारी ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका निर्णायक आहे. भारतासमोर या मालिकेत कोणत्या खेळाडूंचे आव्हान असेल, भारताची या मालिकेतील बलस्थाने कोणती, याचा घेतलेला हा आढावा.

भारताच्या कोणत्या फलंदाजांवर मालिकेची मदार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक नजरा रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्या कामगिरीवर असणार आहेत. रोहितला गेल्या काही काळापासून दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तो भारतात झालेल्या गेल्या दहापैकी केवळ दोनच कसोटी सामने खेळू शकला. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला दुखापत झाली होती. मात्र, रोहित आता तंदुरुस्त झाला असून त्याच्याकडून संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा असेल. गेल्या काही काळात चांगल्या लयीत असलेला गिलकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यातील ऐतिहासिक कामगिरीनंतर गिलला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, भारताच्या गेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात गिलने सलामीला चमक दाखवली होती.

भारताला मालिका जिंकायची झाल्यास आघाडीचा फलंदाज विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटची कामगिरीही दमदार राहिली आहे. त्याने २० कसोटी सामन्यांत १६८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने सात शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. पुजारा भारताच्या मधल्या फळीतील निर्णायक फलंदाज आहे. पुजाराने २०२०-२१च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत २७७ धावा करत महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यामुळे या मालिकेतही पुजाराची भूमिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. तर, के एल राहुलकडूनही संघाला अपेक्षा असणार आहेत. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ९ कसोटीत ५८० धावा केल्या आहेत.

विश्लेषण : युरोपमधील निर्बंधांनंतर रशियातील बुद्धिबळपटू, क्रीडा संघटनांचा आशियाकडे कल का?

बुमराच्या अनुपस्थितीत शमी, सिराजवर अधिक भिस्त का?

गेल्या काही महिन्यांपासून जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे भारताच्या संघात सहभागी झालेला नाही. ऑस्ट्रेलियासाठीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांकरताही त्याचा संघात समावेश झालेला नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान माऱ्याच्या धुरा प्रामुख्याने अनुभवी मोहम्मद शमी आणि युवा मोहम्मद सिराजवर असणार आहे. सिराजने आपल्या कसोटी कारकीर्दीत आजवर १५ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ४६ बळी मिळवले आहेत. यामध्ये त्याने एकदा पाच आणि तीन वेळा चार गडी बाद केले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत १५ डावांत ३१ मिळवले आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ही ५६ धावांवर ६ बळी अशी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल.

अश्विन, जडेजा भारतासाठी का निर्णायक ठरू शकतात?

भारतामध्ये कोणाताही संघ जेव्हा दौरा करतो तेव्हा भारतीय परिस्थितीनुसार फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्ट्या असतात. त्यामुळे अशा खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू निर्णायक भूमिका पार पाडू शकतात. दोघांनीही संघासाठीची आपली उपलब्धता वेळोवेळी सिद्धही केली आहे. अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने आजवर त्यांच्याविरुद्ध १८ कसोटी सामन्यांत ८९ बळी मिळवले आहेत. त्यामुळे यावेळी अश्विनच्या फिरकीवर सर्वांचे लक्ष असेल. दुसरीकडे, दुखापतीनंतर जडेजा संघात पुनरागमन केले आहे. मात्र, तो अंतिम संघात खेळणार की नाही, त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. जडेजानेही १२ कसोटी सामन्यांत ६३ गडी बाद केले आहे. त्यामुळे हे दोन्ही संघात असणे ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. यासह अक्षर पटेल (८ सामन्यांत ४७ बळी) आणि कुलदीप यादव (८ सामन्यांत ३४ बळी) यांचा पर्यायही संघ व्यवस्थापनाकडे आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या खेळाडूंचे भारतासमोर आव्हान?

भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानांवर खेळत असला तरीही ऑस्ट्रेलियास कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, जे कुठल्याही स्थितीत संघाला सावरण्यात सक्षम आहेत. सर्व खेळाडूंमध्ये सुरुवातीला स्टिव्ह स्मिथचे नाव घ्यावे लागेल. त्याने भारतात ६०च्या सरासरीने ६६० धावा केल्या आहेत. सहा सामन्यांत तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. यासह संघात ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीतील अग्रमानांकित फलंदाज मार्नस लबुशेनसह नेथन लायन आणि उस्मान ख्वाजाचे आव्हानही भारतासमोर असेल.

विश्लेषण: शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का?

लबुशेन हा आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत आहे. भारतात तो आजवर एकही सामना खेळलेला नाही. मात्र, आशियामध्ये इतरत्र सात कसोटी सामन्यांत त्याने ४०० धावा केल्या आणि भारताविरुद्धच्या सामन्यासाठी तो कसून सरावही करत आहे. लायनही भारतात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने भारतात खेळलेल्या सात कसोटी सामन्यांत ३४ बळी मिळवले. आशियात खेळलेल्या २४ कसोटीत त्याच्या नावे ११८ गडी आहेत. गेल्या काही काळात त्याने भारतीय फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते. ख्वाजाला ऑस्ट्रेलियाचा २०२२मधील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले. त्यानेही भारतात अजूनपर्यंत एकही कसोटी खेळलेली नाही. मात्र, आशियात खेळलेल्या १२ कसोटीत त्याने ५७.५८च्या सरासरीने ९७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याच्या दृष्टीने भारतासाठी मालिका का महत्त्वाची?

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. दोनहून अधिक कसोटी सामने जिंकल्यास भारताची अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता वाढेल. तीन कसोटी सामने जिंकल्यास भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. ऑस्ट्रेलियाला दोन कसोटी सामन्यांत पराभूत केल्यास भारत ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचेल. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Border gavaskar trophy test series ind vs aus match prediction print exp pmw
First published on: 07-02-2023 at 10:13 IST