रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील धार्मिक स्थळावरुन आजीआजोबांसोबत परतणाऱ्या एका सात वर्षीय मुलावर वाघाने हल्ला करून ठार केले. मात्र, या घटनेनंतर संरक्षित क्षेत्रातील धार्मिक स्थळे आणि भाविकांना प्रवेश हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. अशा प्रकारे धार्मिक पर्यटन, तसेच अलीकडे वाढू लागलेले विवाह सोहळे हे वने आणि वन्य प्राण्यांवरील अतिक्रमण ठरू लागले आहे.
रणथंबोरमध्ये नेमके काय घडले?
रणथंबोर व्याघ्रप्रकल्पाच्या हद्दीत रणथंबोर किल्ल्यावर त्रिनेत्र गणेश मंदिर आहे. या परिसरात वाघांची सतत ये-जा असते. १६ एप्रिलला बुंदी जिल्ह्यातील कार्तिक सुमन हा सात वर्षांचा मुलगा त्याच्या आजी-आजोबांसोबत मंदिरात आला. मंदिराच्या वेदीवर काकांच्या लग्नाची पत्रिका ठेवून आजीआजोबांसोबत तो निघाला. गणेशधाम क्रॉसिंगपासून व्याघ्रप्रकल्पाच्या एक नंबरच्या प्रवेशद्वारापर्यंत परत जाताना दाट झाडीमधून ‘कनकटी’ नावाच्या वाघिणीने कार्तिकवर झडप घातली. त्याला ठार मारून जंगलात बरेच दूरपर्यंत त्याने शव ओढत नेले. दरम्यान, वनखात्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बऱ्याच वेळानंतर मृतदेह शोधून काढण्यात यश आले.
वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे काय?
रणथंबोर किंवा इतर व्याघ्रप्रकल्पांमध्ये वन्यप्राण्यांपेक्षा वाहनांची आणि माणसांची संख्या वाढू लागली आहे. व्याघ्रप्रकल्पांमधील पर्यटन आता नियंत्रणाबाहेर गेले आहे. व्याघ्रप्रकल्प ही आपली संपत्ती आहे. लोक याठिकाणी वाघ पाहण्यासाठी येतात, पण प्राण्यांनाही वाटते त्यांना कुणीही त्रास देऊ नये. वाघांच्या क्षेत्रात मानवी प्रवेशामुळे ते हिंसक होत आहेत. वाघ साधारण ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करतो. ते स्वत:चे अधिकार क्षेत्र तयार करतात आणि त्याचे संरक्षण करतात. त्यात कुणी लुडबूड केली तर ते हल्ला करतात. वाघ आणि मानव यांच्यात एक सीमारेषा असायला हवी, पण अनियंत्रित पर्यटनामुळे ही सीमारेषा पुसट बनत चालली आहे.
मानवी हालचालींमुळे वाघ हिंसक?
पूर्वी रणथंभोरमध्ये गाभा क्षेत्र आणि बफर क्षेत्र होते. जोगी महालपर्यंत गाभा आणि उर्वरित अमरेश्वरदरम्यान एक बफर होता. परंतु सरकारने पर्यटनाच्या नावाखाली तो बफर रद्द केला. सध्या वाघांची संख्याही वाढली आहे आणि जागेची कमतरता आहे. तर सुमारे १६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात जंगल आहे. मात्र, वाढत्या मानवी हालचाली, ज्यामध्ये हॉटेल्स आणि वाहनांचा समावेश आहे, त्यामुळे वन्यजीव आणि विशेषकरून वाघ हिंसक होत आहेत. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील नियम शिथिल केल्यामुळे याठिकाणी अनेक गेस्टहाऊस तयार झाले आहेत. पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या आतदेखील हॉटेल आणि गेस्टहाऊस आहेत. त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. माणसांची उपस्थिती वाढली आहे. गंभीर ध्वनी प्रदूषण होत आहे. वाघ तसा एकांतप्रिय प्राणी आहे, पण त्याच्या अधिवास आणि परिसरात गर्दी वाढली तर तो हल्ला करण्यास मागेपुढे पाहात नाही.
संरक्षित क्षेत्रात यात्रा
रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील मुख्य क्षेत्रात असणाऱ्या या मंदिरात धार्मिक यात्रेकरिता दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. तर याच कालावधीत सुमारे एक ते दीड लाख वाहनेदेखील असतात. महाराष्ट्रातदेखील असे अनेक व्याघ्रप्रकल्प आहेत, ज्या ठिकाणी मंदिरे आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात रामदेगी येथे मंदिर आहे. येथे कित्येकदा वाघ आणि भाविक समोरासमोर येतात. या ठिकाणी यात्रादेखील भरते, पण भाविकांची संख्या कमी असते. मात्र, याच ठिकाणी वर बौद्ध स्तुप आहे. येथेही जानेवारी महिन्याच्या अखेरीस तीन ते चार दिवस ५० हजाराहून अधिक भाविक येतात. तर १५० हून अधिक वाहने असतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दर्गा होता, तो आता बंद करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात धारगड येथे यात्रा भरते. मात्र, या ठिकाणीही यात्रेपुरतेच भाविकांना प्रवेश असतो, इतर वेळी वर्षभर प्रवेश दिला जात नाही.
राजकीय हस्तक्षेप कारणीभूत?
संरक्षित क्षेत्रातील धार्मिक स्थळांवर भाविकांची श्रद्धा असली तरीही वाढत्या वन्यजीवांच्या संख्येमुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. यासंदर्भात वनखात्याने वेळोवेळी निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला तरीही भाविकांना आवर घालणे हा संवेदनशील विषय असल्याने खात्याला मर्यादा आहेत. सरकारदेखील शतकानुशतके जुन्या धार्मिक परंपरांबाबत निर्णय घेण्यात कुचराई करते. नियम मोडणाऱ्यांवर ठोस कारवाईदेखील होत नाही. महाराष्ट्रातील काही व्याघ्रप्रकल्पांमध्ये असणाऱ्या धार्मिक स्थळावर भाविकांना जाण्यापासून रोखल्यास स्थानिक राजकीय नेतृत्व आड येते. मतांवर परिणाम होऊ नये म्हणून नेते भाविकांना पाठिंबा देतात. प्रत्यक्षात व्याघ्रप्रकल्प किंवा मुख्य वनक्षेत्रातील धार्मिक हालचालींना कमी करण्याची गरज आहे. अन्यथा रणथंबोरसारख्या घटना इतरत्रही घडत राहतील.
rakhichavhan@expressindia.com