आजकाल हॉटेलमध्ये, मॅकडोनल्ड किंवा घरी फ्रेंज फ्राईज हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. फ्रेंज फ्राईज खाणे कुणाला आवडत नाही? हा प्रकार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा झाला आहे. टोमॅटो सॉस किंवा टेस्टी ग्रेव्हीसोबत फ्रेंच फ्राईज खाणे हे अनेकांसाठी आनंद देणारे असते. बटाट्यापासून तयार केलेला हा पदार्थ आता जगभर परिचित झाला आहे. काही ठिकाणी फ्रेंज फ्राईज किंवा चिप्स या नावाने प्रसिद्ध असलेले हे पदार्थ जिभेसाठी चमचमीत असले तरी आरोग्यासाठी ते फार चांगले असल्याचे मानले जात नव्हते. आता तर नव्या अभ्यासानुसार असे कळते की, हा तेलकट, पिष्टमय पदार्थ मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे. नव्या संशोधनानुसार निकृष्ट दर्जाचे, तळलेले हे पदार्थ शारीरिक आरोग्यासाठी तर चांगले नाहीच, शिवाय त्यामुळे चिंता आणि नैराश्यात वाढ होते. नव्या संशोधनानुसार कोणती माहिती समोर आली ते पाहू या.

नवे संशोधन काय सांगते?

चीनमधील हांगजू येथील संशोधकांच्या एका पथकाचा संशोधन अहवाल PNAS (Proceedings of the National Academy of Sciences of the United States of America) या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात संशोधकांनी तळलेल्या पदार्थांबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. विशेषतः बटाट्याच्या तळलेल्या पदार्थांमुळे तणावग्रस्त होण्याचा धोका १२ टक्क्यांनी वाढतो, तर नैराश्यात जाण्याचा धोका सात टक्क्यांनी वाढतो. सदर संशोधनासाठी युनायटेड किंग्डममधील एक लाख ४० हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सरासरी ११ वर्षे या लोकांचा पाठपुरावा करून त्यांच्यामधील तणाव आणि नैराश्याच्या लक्षणांचा अभ्यास करण्यात आला.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

ज्या लोकांनी तळलेले पदार्थ दिवसातून एकदा तरी खात असल्याचे सांगितले, त्या लोकांमध्ये इतर आहार घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत तणावग्रस्त आणि नैराश्यग्रस्त होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. तळलेले पदार्थ खाण्याची ज्यांना सवय होती, त्यांच्यामध्ये इतर लोकांपेक्षा तणाव आणि नैराश्याचे प्रमाण अधिक दिसले.

फ्रेंच फ्राईजमध्ये असे काय असते ज्यामुळे नैराश्यग्रस्त होण्याचा धोका उद्भवतो? Acrylamide हे रसायन यासाठी जबाबदार ठरते. बटाट्यासारखे स्टार्च असलेले पदार्थ अधिक काळ उच्च तापमानाला तळल्यानंतर त्यातून Acrylamide हे रसायन तयार होते. हे रसायन दीर्घकाळ आपल्या खाण्यात आले तर त्यामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या मानसिक समस्या निर्माण होतात.

अशाच प्रकारचे तथ्य आणखी एका अहवालातून समोर आले. या संशोधनात झेब्राफिश (zebrafish) माशाच्या संपर्कात हे रसायन आणले गेले. दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यानंतर झेब्राफिश हा फिश टँकमधील अडगळीच्या जागी जाऊन राहायला लागला. माशामध्ये तणाव व चिंता वाढीस लागल्याचे हे द्योतक होते. याशिवाय झेब्राफिश हा फिश टँकमध्ये आधीसारखा मोकळ्या पद्धतीने फिरत नव्हता. तसेच इतर माशांसोबत त्यांचे फिरणेदेखील कमी झाले होते. झेब्राफिश हा कळपाने राहणारा मासा आहे.

हे संशोधन सार्वजनिक करत असताना संशोधकांनी म्हटले की, तळलेल्या पदार्थाचे नकारात्मक परिणाम सांगून आम्हाला लोकांना घाबरवायचे नाही. जे लोक तळलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात नियमित समावेश करतात, त्यांच्यासाठी हा केवळ सावधानतेचा इशारा आहे. आपले मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी लोकांनी अशा पदार्थांपासून लांब राहणे गरजेचे आहे.

मात्र, काही खाद्यपदार्थतज्ज्ञ आणि मनुष्य स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी या संशोधनातील दावे मानण्यास नकार दिला आहे. टीकाकारांनी सांगितले की, तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळेच तणाव किंवा नैराश्यासारख्या मानसिक समस्या निर्माण होतात, हे सिद्ध होत नाही. जर काही लोकांना आधीपासूनच या समस्या असतील तर काय करणार?

चिंताग्रस्तता आणि नैराश्यात वाढ होत आहे

हे संशोधन अशा वेळी समोर आले आहे, ज्या वेळी जगभरातील लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढलेले दिसत आहे. चिंतातुरता आणि नैराश्यग्रस्त होणे हे दोन वेगवेगळे मानसिक आजार आहेत.

भीती आणि काळजीपेक्षा थोडे अधिक प्रमाण असल्यास त्याला चिंताविकार (anxiety disorder) म्हणतात. चिंतातुरता किंवा चिंताग्रस्त होणे ही समस्या कधीच कायमची सुटत नाही. ती पुन्हा पुन्हा डोके वर काढू शकते आणि आणखी बिकट होत जाते. या आजाराची लक्षणे आपल्या दैनंदिन जीवनातील कामांमध्ये व्यत्यय आणू शकतात. जसे की, कामाच्या ठिकाणी कामगिरी ढासळणे, शाळेत लक्ष न लागणे किंवा नातेसंबंध बिघडणे.

तर दुसऱ्या बाजूला नैराश्याग्रस्त असताना सतत उदास वाटत राहते आणि कोणत्याच कामात रस उरत नाही. नैराश्यग्रस्त परिस्थितीमुळे तुमच्या भावना, विचार आणि वागण्याच्या पद्धतीमध्ये नकारात्मक बदल होतात. ज्यामुळे अनेक भावनिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात. रोजची दैनंदिन कामे करणेदेखील अवघड होऊन बसते. कधीकधी तर हे जगणेच व्यर्थ आहे, असेदेखील वाटायला लागते.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ साली एक डेटा जाहीर केला. त्यानुसार जगभरातील २८४ दशलक्ष लोक (एकूण लोकसंख्येच्या ३.८ टक्के) हे चिंतातुरता विकाराने ग्रस्त आहेत. तर २६४ दशलक्ष लोक यांनी नैराश्यग्रस्त असल्याची तक्रार केली आहे. २०२०-२१ साली जगावर करोना महामारीचे संकट आल्यानंतर सगळीकडेच चिंतेचे आणि नैराश्याचे वातावरण दिसत होते. या काळात मनोविकारांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली.

मागच्या काळात झालेल्या काही संशोधनांनुसार आपल्या खाण्याच्या सवयीचादेखील मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. आपल्या पोटाचा आणि मेंदूचा घनिष्ठ संबंध आहे. आपल्या पोटातील आतड्यांमध्ये कोट्यवधी जिवाणू असतात, जे शरीराचे काम व्यवस्थित पार पाडण्याची भूमिका बजावत असतात. शरीराला हवी असलेली झोप, वेदना, भूक, मूड आणि भावनांबाबत मेंदूला संदेश देण्याचे कामही या जिवाणूंमार्फत होते. संशोधनात असे आढळून आले आहे की, आपण जे अन्न खातो ते आतड्यामधील जिवाणूंच्या अधिवासावर परिणाम करणारे असते. जिवाणूंवर परिणाम म्हणजेच आपला मेंदू, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरदेखील ते परिणाम करणारे असते.

फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाला एका अभ्यासादरम्यान आढळले की, मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ; जसे की, साखरेचा वापर असलेले पेय, प्रक्रिया केलेले मांस किंवा इतर अल्पोपाहारचे पदार्थ खाल्ल्याने मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. यामुळे नैराश्य, चिंताग्रस्तता आणि मानसिक अस्थिरता यांसारखे विकार उद्भवतात.

आणखी एका अभ्यासानुसार असे समजले की, रात्री उशिरा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नैराश्य आणि चिंतेमध्ये अधिक प्रमाणात वाढ होते. त्यामुळे पुढच्या वेळी तेलकट पदार्थ, फ्रेंच फ्राईज खाताना याचा विचार एकदा नक्की करा.