काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केल्याचे तीव्र पडसाद सध्या उमटत आहेत. भारताने चिनाब आणि झेलम नद्यांचे पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. याचबरोबर उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्यातून आण्विक युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, दोन्ही देशांदरम्यान आण्विक युद्ध झाल्यास त्याचा परिणाम केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहणार नसून, संपूर्ण जगावर होणार आहे. अमेरिकेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनातून आण्विक युद्धाची शक्यता आणि परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात हे परिणाम संपूर्ण जगासाठी भयावह असतील, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. संशोधन नेमके काय? भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत सातत्याने तणावाची पार्श्वभूमी आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धेही झाली आहेत. हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने पुढील युद्ध झाल्यास ते आण्विक युद्ध असेल, अशी शक्यता खूप काळापासून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोलोरॅडो आणि रटगर्स विद्यापीठांनी २०१९ मध्ये एक संयुक्त अभ्यास केला होता. हा अभ्यास सायन्स ॲडव्हान्सेस या पत्रिकेत प्रसिद्ध झाला होता. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२५ मध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या अभ्यासासाठी यूएस नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक रीसर्च, फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स आणि नॅचरल रिर्सोसेस डिफेन्स कौन्सिल यांसारख्या मोठ्या संस्थांची मदत घेण्यात आली होती. आता पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीने या अभ्यासाकडे लक्ष वेधले आहे.
जीवितहानी किती?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्याने तणाव असल्याने दोन्ही देशांकडील अण्वस्त्रांच्या संख्येत वाढीचा अंदाजही अभ्यासात वर्तविण्यात आला होता. या देशांच्या अण्वस्त्र क्षमतेतही मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याकडील प्रत्येक अण्वस्त्राची किमान क्षमता हिरोशिमात टाकण्यात आलेल्या बॉम्बएवढी आहे. दोन्ही देश शेजारी असल्याने ते एकमेकांच्या अगदी जवळचे लक्ष्य आहेत. यामुळे दक्षिण आशिया हा आण्विक युद्धाच्या बाबतीत सर्वाधिक अस्थिर मानला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध झाल्यास भारताकडून १०० अण्वस्त्रे आणि पाकिस्तानकडून १५० अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असा अंदाज अभ्यासात मांडण्यात आला आहे. त्यात दोन्ही देशांतील सुमारे १० कोटी नागरिकांचा तातडीने मृत्यू होईल. आण्विक युद्धानंतरच्या गंभीर परिणामांमध्ये ५ ते १२.५ कोटी नागरिकांचा बळी जाईल. यासाठी प्रामुख्याने किरणोत्सर्गाशी थेट संबंध, दुखापत, उपासमार आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास कारणीभूत ठरेल, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक उपासमारीचे संकट?
एकदाच मोठा स्फोट होऊन हे आण्विक युद्ध थांबणार नाही. त्याचे प्रचंड स्वरूपाचे परिणाम पर्यावरणावर होतील. आण्विक स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ निर्माण होतील आणि त्यातून १.६ ते ३.६ कोटी टन ब्लॅक कार्बन अवकाशात सोडला जाईल. त्यामुळे सूर्यप्रकाश रोखला जाऊन जगभरात तापमानात ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट होईल. आण्विक युद्धानंतर सूर्यप्रकाशाच्या पातळीत सुमारे ३५ टक्के घट होईल आणि पर्जन्यमानात ३० टक्क्यांपर्यंत घसरण होईल. याचा एकत्रित परिणाम पिकांवर होईल. सागरी परिसंस्थेवरही गंभीर परिणाम होतील. त्यातून जागतिक अन्नपुरवठा साखळी ठप्प होईल. या अभ्यासानुसार, पिकांच्या वाढीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत आणि सागरी उत्पादकता १५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. हे परिणाम जगात सुमारे दशकभर दिसून येतील.
अण्वस्त्रसंधीवर भर का?
या अभ्यासाचा विषय हा केवळ भाकीत मांडणे हा नव्हता तर या मुद्द्यावर जागतिक पातळीवर कृती व्हावी हा होता. आण्विक युद्धाचा धोका टाळण्यासाठी २०१७ च्या संयुक्त राष्ट्रे अण्वस्त्रसंधी करारासारखे करार करण्याची आवश्यकता त्यातून मांडण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानने त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. जागतिक पातळीवर भक्कमपणे पावले उचलली गेल्यास भविष्यातील आण्विक युद्धाचे धोके टाळण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यात मांडण्यात आली होती. याचबरोबर एखादा प्रादेशिक संघर्ष जागतिक संकट कसे बनू शकते, हेही दाखविण्याचा प्रयत्न अभ्यासातून करण्यात आला होता. संगणकीय सिम्युलेशन पद्धतीचा यासाठी वापर करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास ते केवळ दक्षिण आशियापुरते मर्यादित न राहता जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणारे ठरणार आहे.