गुजरातमधील प्रसिद्ध तरुण पाटीदार नेता असलेल्या हार्दिक पटेलने अखेर काल (गुरुवार) भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटले यांनी यावर्षी १८ मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पाटीदार आंदोलनामुळे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका सहन करावा लागला होता. अशा परिस्थितीत गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपा हार्दिक पटलेवर मोठा डाव खेळत आहे. गुजरातमध्ये पाटीदारांची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे आणि एकूण १८२ विधानसभा मतदार संघापैकी जवळपास ७० विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

अशा परिस्थितीत हार्दिक पटेल यांच्या येण्याने भाजपाला किती फायदा होईल, हे जाणून घेऊया? २०१७ च्या निवडणुकीत हार्दिकमुळे भाजपाला फटका बसला का? गुजरात निवडणुकीत पाटीदारांना इतके महत्त्व का? हे देखील पाहूयात.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीशी हार्दिक पटलेचा काय संबंध होता? –

२०१५ मध्ये गुजरातमधील पाटीदार समाज ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवत होता. दरम्यान, हार्दिक पटेल या तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी पाटीदार अनामत आंदोलन समिती स्थापन केली होती. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार आंदोलन इतके मजबूत झाले की हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या सभांना येऊ लागले आणि गुजरातमध्ये दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या भाजपाला निवडणूक हरण्याची भीती वाटू लागली होती.

या आंदोलनाचा परिणाम २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. भाजपाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, परंतु पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा १६ जागा कमी मिळाल्या आणि केवळ ९९ जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला गेल्यावेळच्या तुलनेत १६ जागा जास्त मिळाल्या. या काळात काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. गुजरातमधील काँग्रेसची तीन दशकांतील ही सर्वोत्तम निवडणूक कामगिरी होती.

याचे बक्षीसही हार्दिक पटले यांना मिळाले. मार्च २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जुलै २०२० मध्ये त्यांना गुजरातमध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले गेले. मात्र, दोन वर्षांत काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठे निर्णय घेताना त्यांचा सल्ला घेतला नाही, असा आरोप करत त्यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला.

हार्दिकच्या येण्याने भाजपाला किती फायदा होणार? –

गुजरातमध्ये पाटीदार मतदार १४ टक्के आहेत. यामध्ये कडवा आणि लेउवा पटेल यांचा समावेश आहे. पाटीदार समाज ही १९८४-८५ पासून भाजपाची एकनिष्ठ व्होट बँक आहे. काँग्रेसचे नेते आणि गुजरातचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले माधवसिंह सोलंकी यांचा ‘खाम’ सिद्धांत हे त्याचे कारण मानले जाते. ‘खाम’ म्हणजेच क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम युतीमुळे सोलंकी चार वेळा मुख्यमंत्री झाले. यामुळे पाटीदार हे काँग्रेसपासून दूर राहिले.

२०१५ मध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनापासून भाजपा पटेल मते टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. अशा स्थितीत हार्दिक पटेलच्या आगमनाने भाजपा २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढू शकते, कारण नाराजी असतानाही पाटीदार समाजाचा मोठा वर्ग भाजपाशी जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत हार्दिकच्या आगमनाने भाजपा पासून दूर गेलेले पाटीदार पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

याशिवाय हार्दिक पटेल यांच्या आगमनामुळे भाजपला नरेश पटेल यांच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी मदत होईल, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. नरेश पटेल हे राजकोटचे व्यापारी आहेत. नरेश पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये अनेक मुख्यमंत्री पाटीदार समाजातून –

त्यामुळेच भाजपा पाटीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दीड कोटी लोकसंख्येसह, १८२ विधानसभा जागांपैकी ७० जागांवर पाटीदारांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. गुजरातमध्ये अनेक मुख्यमंत्री पाटीदार समाजातून आले आहेत. यामध्ये चिमणभाई पटेल, केशुभाई पटेल, बाबूभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा समावेश आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला म्हणजेच ‘आप’चा मुकाबला करण्यासाठी भाजपा नेतृत्वही हार्दिककडे एक शस्त्र म्हणून पाहत आहे. त्याचबरोबर पक्ष हार्दिककडे एक प्रभावी नेता म्हणून देखील पाहत आहे. भाजपाने हार्दिक पटेल यांना पक्षात प्रवेश देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्सने आधीच म्हटलेले आहे. याद्वारे भाजपाचा माधवसिंह सोलंकी यांचा १९८५ मध्ये १४९ जागा जिंकण्याचा विक्रम मोडून सौराष्ट्रात मोठा प्रभाव पाडण्याचा आणि आम आदमी पक्षाचा राज्यातील वाढता शिरकाव रोखण्याचा प्रयत्न दिसत आहे.