भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच झालेल्या पतनिर्धारण बैठकीमध्ये एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. तो म्हणजे, कुठल्याही बँकेच्या एटीएममधून कार्डशिवाय युपीआय (Unified Payment Interface) च्या माध्यमातून रोख पैसे काढता येण्याचा. "सध्या कार्डखेरीज रोख पैसे काढता येण्याची सुविधा मोजक्या बँका देतात. आता ही सेवा सगळ्या बँकांसाठी व संपूर्ण एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून युपीआयचा वापर करून देण्याचा प्रस्ताव आहे," असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले आहे. ही यंत्रणा कशी काम करेल, त्याचा डेबिट कार्डच्या वापरावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊया… युपीआयच्या माध्यमातून रोख पैसे कसे काढता येणार? - ही यंत्रणा कशी काम करेल हे आरबीआयनं अद्याप जाहीर केलेलं नसलं, तरी एका संबंधित जाणकार तज्ज्ञानं सांगितलं की, “एटीएममध्ये लवकरच एक पर्याय दिसेल की युपीआय वापरून कॅश काढा. हा पर्याय निवडल्यावर ग्राहकाला किती रक्कम काढायची आहे ते द्यावं लागेल. त्यानंतर एटीएम मशिनवर क्युआर कोड येईल. ग्राहकाला युपीआय अॅपच्या माध्यमातून तो क्युआर कोड स्कॅन करावा लागेल व पिन नंबर भरावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली की एटीएममधून रोख रक्कम मिळेल.” तर दास यांनी सांगितले आहे की, "युपीआयच्या माध्यमातून रोख रक्कम काढल्यास अशा व्यवहारांची सुरक्षितता वाढेल. प्रत्यक्ष कार्डचा वापर होत नसल्यामुळे कार्ड स्किमिंग वा कार्ड क्लोनिंगच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीला आळा बसेल." सध्या एटीएमच्या माध्यमातून कार्ड न वापरता रक्कम कशी काढता येते? - सध्या, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक व एसबीआय त्यांच्या एटीएममधून त्यांच्या ग्राहकांना कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा देते. करोना महामारीच्या काळात ही सुविधा सुरू करण्यात आली होती. परंतु ही एक किचकट प्रक्रिया आहे. ग्राहकाला त्यांच्या मोबाइलवर बँकेचं अॅप डाउनलोड करावं लागतं. अॅपवर कार्डशिवाय रोख काढण्याचा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर बेनिफिशियरी डिटेल्स व रक्कम नमूद करावी लागते. नंतर मोबाइल नंबर दिला की बँक ओटीपी व नऊ अंकी ऑर्डर आयडी पाठवते. मग ग्राहक एटीएममध्ये जाऊन ओटीपी, ऑर्डर आयडी, रक्कम व मोबाइल क्रमांक भरून रोख रक्कम काढू शकतो. इतकी किचकट प्रक्रिया करायची ठरवली तरी त्यालाही काही अटी आहेत. म्हणजे किमान शंभर रक्कम व बँकनिहाय कमाल रक्कम किती काढता येईल वगैरे. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना या प्रकारे प्रति दिन कमाल १० हजार व महिन्याला २५ हजार रुपयांची मर्यादा आहे. तसंच प्रति व्यवहार २५ रुपये सेवा शुल्क द्यावं लागतं. अर्थात, युपीआयच्या माध्यमातून अशाप्रकारची सुविधा दिल्यानंतर काही निर्बंध असतील का?, सेवा शुल्क असेल का? हे स्पष्ट झालेलं नाही. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आवश्यक ते यंत्रणेतील बदल करून सर्व गोष्टी स्पष्ट करण्यात येतील, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी राबी यांनी सांगितले आहे. याचा डेबिट कार्डच्या वापरावर काही परिणाम होईल? - सध्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्वात लोकप्रिय पर्याय डेबिट कार्ड आहे. देशामध्ये ९० कोटींपेक्षा जास्त लोक डेबिट कार्ड वापरतात. युपीआयच्या माध्यमातून ही सेवा दिल्यानंतर त्याचा डेबिट कार्डच्या वापरावर परिणाम होईल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. डेबिट कार्ड बाळगण्याचीच गरज कमी होईल असे मत एका अॅनालिस्टनं व्यक्त केलं आहे. युपीआयचा आवाका काय आहे? - असा अंदाज आहे की येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये युपीआयच्या माध्यमातून दर दिवशी एक अब्ज व्यवहार होतील. हे शक्य होण्यासाठी अनेक नवीन योजना प्रस्तावित आहेत, जसं ऑटोपे फीचर. तज्ज्ञांच्या मते दैनंदिन व्यवहार वाढीमध्ये ऑटोपे फीचर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. इंटरनेट कनेक्शन नसलेल्या फीचर फोनवरही युपीआय व्यवहार करण्याची घोषणा आरबीआयनं केली आहे. सुमारे ४० कोटी भारतीय फीचर फोन वापरतात, ते ही युपीआयचे व्यवहार यामुळे करू शकणार आहेत. यामुळेही युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या रोजच्या व्यवहारांमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.