इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या चार दिवसीय सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विचित्र गोष्टी घडल्या. भारताचा विरोधी संघ लीसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भारताकडूनही फलंदाजीची संधी मिळाली. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर हे एकाच डावात दोनदा फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. इंग्लंडमध्ये भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यात सराव सामना खेळवला गेला. भारताने पहिल्या डावात ८ बाद २४६ धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून लीसेस्टरशायरचा संघ पहिल्या डावात २४४ धावा करु शकला होता. दरम्यान, चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ७ बाद २६४ धावा केल्या होत्या. या सामन्यातील तिसर्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दोन्ही संघांसाठी फलंदाजी केली होती. या सराव सामन्यात पुजाराने भारतीय संघ आणि लीसेस्टरशायर या दोन्ही संघांसाठी फलंदाजी केली. पहिल्या डावात लेस्टरशायरकडून पुजाराने फलंदाजी केली आणि खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मोहम्मद शमीने बोल्ड केले होते. लेस्टरशायरविरुद्ध शनिवारी भारताच्या दुसऱ्या डावात पुजाराही फलंदाजीला आला होता. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पुजाराने २२ धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. तत्पूर्वी, तो पहिल्या डावात लीसेस्टरशायरविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, जेथे तो खाते न उघडता बाद झाला होता. त्याला मोहम्मद शमीने बाद केले होते. भारतीय संघातील सर्व खेळाडूंना सराव सामन्यात खेळण्याची संधी मिळावी यासाठी पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रणभव कृष्णा या चार भारतीय खेळाडूंना लीसेस्टरशायरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. तर तीन भारतीय गोलंदाज नवदीप सैनी, आर. साई किशोर आणि कमलेश नागरकोटी यांनीही लेस्टरशायरसाठी क्षेत्ररक्षण केले आणि दुसऱ्या डावात त्यांच्यासाठी गोलंदाजी केली. बहुतेक गली क्रिकेटमध्ये असे घडते की कधी कधी फलंदाज दोन्ही संघांसाठी फलंदाजी करतो. परंतु पुजाराला दोन्ही संघांसाठी फलंदाजी करताना पाहून क्रिकेट चाहतेही गोंधळून गेले. हे कसे घडले? हा सामना अधिकृत प्रथम श्रेणी खेळ नसल्यामुळे दोन्ही संघांनी खेळण्याच्या परिस्थितीवर परस्पर करार केला आहे. पुजारा पहिल्या डावात लवकर बाद झाल्यानंतर, संघ व्यवस्थापनाला वाटले की त्याने क्रीजवर अधिक वेळ घालवणे आवश्यक आहे. कदाचित त्यामुळेच पुजाराला दुसऱ्या डावात दुसऱ्या संघासाठी फलंदाजी करण्यास सांगितले गेले होते. सराव सामना ही दोन्ही संघांसाठी १ जुलैपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटीच्या तयारीसाठी शेवटची संधी आहे.