प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान ४५ डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची 'मे' महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिंमत करत नाहीत. देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या चार ते पाच शहरांमध्ये तापमान इतके का वाढते? या मागील कारणे कोणते आहेत? याचा शोध घेतला तेव्हा काही माहिती पुढे आली आहे. विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणांचा थेट मारा विदर्भावर होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग आहे. त्यामुळे उत्तरंच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत येत असल्याने देखील येथील तापमान इतर शहरांच्या तुलनेत जास्त नोंदवले जाते. राजस्थाननंतर सर्वाधिक उष्ण प्रदेश म्हणजे विदर्भ असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. यावर्षी विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा शहराचे दिवसांचे तापमान ४५ ते ४६ डिग्री पर्यंत गेले होते. तर रात्रीच्या वेळी ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर भागांमध्ये देखील अनुभवायला मिळते. राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट कायम आह़े या भागांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भात उष्णतेची लाट आणि देशातील उच्चांकी तापमान कायम आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत तापमानात वाढ झाल्याने होरपळ वाढली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशपासून विदर्भापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भासह या सर्व भागांतील कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, तमिळनाडू आदी राज्यांतील तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर आहे.