अभिनेत्री अदाह शर्मा अभिनित आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यावर वादही निर्माण झाले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण ती याचिका फेटाळून लावण्यात आली. द काश्मीर फाईल्सप्रमाणेच द केरल स्टोरीलादेखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपटाने दोन दिवसांतच कोट्यवधींची कमाई केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी (दि. ३० एप्रिल) चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर मागच्या आठवड्यात यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बरेच वादंग माजले आहे. अनेकांनी या चित्रपटाची कथा बिनबुडाची आणि अपप्रचार करणारी असल्याचे सांगितले. तर काहींनी केरळमध्ये होणाऱ्या धर्मांतरावर या चित्रपटामुळे प्रकाश पडेल, अशी आशा व्यक्त केली आहे. चित्रपटातून ३२ हजार महिलांचे धर्मांतर केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. केरळमध्ये एवढ्या प्रमाणात खरेच धर्मांतर झाले आहे का? तेथील युवतींना इसिसमध्ये सामील केले आहे का? यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
kolkata accident , kolkata building collapse
कोलकात्यात इमारत कोसळून सात ठार; दुर्घटनेवरून तृणमूल काँग्रेस, भाजपदरम्यान शाब्दिक युद्ध

हे वाचा >> PM मोदींनी ‘द केरल स्टोरी’बद्दल वक्तव्य केल्यावर निर्माते विपुल शाह म्हणाले, “पंतप्रधानांशिवाय कोणीही…”

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी चित्रपटाला विरोध करताना सांगितले, “या चित्रपटाच्या माध्यमातून काही लोक खोट्या गोष्टींचा प्रचार आणि धार्मिक तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. संपूर्ण संघ परिवार कोणत्याही पुराव्याशिवाय या खोट्या गोष्टी पसरवत आहे. केरळच्या ३२ हजार महिलांनी ‘इस्लाम कबूल केला’ हे धादांत खोटे आहे. हे खोटे कथानक संघ परिवारानेच रचलेले आहे. अशा प्रचारकी चित्रपटांमधून मुस्लिमांप्रति निर्माण होणारा द्वेष हा त्यांना केरळच्या राजकारणात फायद्याचा ठरू शकतो.” पिनराई विजयन पुढे म्हणाले की, लव्ह जिहादच्या विषयात तथ्य नसल्याचे तपास यंत्रणा, न्यायालये आणि गृहखात्याने स्पष्ट केले आहे. जगासमोर केरळला बदनाम करण्यासाठी या सर्व गोष्टींचा आमच्या राज्याशी संबंध जोडला जात आहे.

चित्रपटाची कथा काय आहे?

ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे, केरळमधील युवतींच्या एका गटाचे धर्मपरिवर्तन करून त्यांना बळजबरीने इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया (ISIS) या संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते. अभिनेत्री अदाह शर्माने या चित्रपटात एका हिंदू मल्याळी नर्सचे पात्र साकारले आहे. या पात्राने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिचे नाव फातिमा असे ठेवले जाते. फातिमा लग्नानंतर इसिस या संघटनेत सामील होते. अफगाणच्या तुरुंगात चौकशीदरम्यान फातिमाचे सत्य उलगडू लागते. फातिमासारख्या हिंदू आणि ख्रिश्चन असलेल्या ३२ हजार तरुणींची फसवणूक करून त्यांचे धर्मांतर केल्याची बाब समोर येते. (हा आकडा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पोस्टरवर दाखविण्यात आला होता. तसेच यूट्यूबच्या ट्रेलरमधील डिस्क्रिप्शनमध्येही होता. मात्र आता तो बदलण्यात आला आहे.)

हे ही वाचा >> “जागे व्हा, आपल्या ह्या हिंदू धर्माला…” शरद पोंक्षे यांची ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठी प्रतिक्रिया

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ‘आजवर लपवून ठेवण्यात आलेल्या सत्यावरचा पडदा उठतोय,’ अशी ओळ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दाखविली जाते. चित्रपट सादर करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे याबाबतचे पुरेसे पुरावे आहेत. चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होईल. विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. अभिनेत्री अदाह शर्मासह, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इदनानी या महिला कलाकारदेखील आहेत.

पीडितांचा आकडा खरा आहे?

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आतापर्यंत धर्मांतर केलेल्या आणि बेपत्ता असलेल्या तरुणींचा आकडा ३२ हजार असल्याचे दाखविण्यात येत होते. या आकड्यावरूनच सध्या गदारोळ सुरू आहे. टीकाकारांनी हा आकडा खोटा असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सांगितले की, त्यांच्याकडे या दाव्याबाबत पुरावे आहेत. मात्र ते सार्वजनिक करण्यास त्यांची हरकत आहे. ‘फेस्टिव्हल ऑफ भारत’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन म्हणाले की, २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री ओमेन चांडी यांनी केरळ विधानसभेत एक अहवाल मांडला होता. केरळमध्ये दरवर्षी २८०० ते ३२०० मुलींचे इस्लामध्ये धर्मांतर होत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. सेन मुलाखतीत पुढे म्हणाले की, या अहवालाचा आधार घेतल्यास २०१० पासून आतापर्यंत किमान ३२ ते ३३ हजार मुलींचे धर्मांतर नक्कीच झाले असेल, असा अंदाज काढता येतो. त्यामुळेच हा आकडा चित्रपटात दाखविण्यात आला.

सेन पुढे म्हणाले की, मी या आकडेवारीबाबत चांडी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आकडेवारी मान्य करण्यास नकार दिला. पण माझ्याकडे याबाबतची कागदपत्रे आहेत. सेन यांनी दावा केल्याप्रमाणे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने २०१० सालचा तो तथाकथित अहवाल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र सेन यांनी आकडेवारी सांगितलेला असा कोणताही अहवाल हाती लागला नाही.

आणखी वाचा >> ‘द केरल स्टोरी’ची दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

योगायोगाने, सुदीप्तो सेन हे मागच्या वर्षी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी होते. ज्युरींचे अध्यक्ष असलेल्या नदाव लॅपिड यांनी महोत्सवाच्या सांगता समारंभात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला प्रचारकी चित्रपट म्हटले होते. त्या वेळी सेन यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. लॅपिड यांच्या त्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण चित्रपट महोत्सवाला गालबोट लागले आहे, असेही ते म्हणाले होते.

केरळमधून इसिसमध्ये भरती झाली का?

‘द केरल स्टोरी’मध्ये फक्त इस्लाममध्ये धर्मांतर झाल्याचा मुद्दा सांगून कथा संपत नाही, तर या मुली केरळमधून बेपत्ता झाल्याचे आणि नंतर इसिस या संघटनेत जिहादींना सेवा देण्यासाठी सामील झाल्याचे दाखविण्यात आले आहे. इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेत काही भारतीय नागरिक असल्याची बाब पहिल्यांदा २०१३ साली उजेडात आली होती. तेव्हापासून अनेक भारतीय इराक आणि सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी दाखल झाले असल्याचे समोर आले. यंत्रणांनी १०० हून अधिक लोकांना अटक करून सिरीयाच्या बाहेर काढले. इस्लामिक स्टेटची प्रेरणा घेऊन काहींनी भारतावर हल्ला करण्याची योजना आखली होती, अशाही काही लोकांना अटक झालेली आहे.

२०१९ मध्ये, परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात सांगितले की, सबंध देशभरातून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि विविध राज्य पोलीस दलांनी इसिसचे हितचिंतक आणि मदतनीस असणाऱ्या १५५ जणांना अटक केली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इस्लामिक स्टेटच्या भारतीय नागरिकांवर होत असलेल्या प्रभावाबाबत सावध भूमिका घेतलेली आहे. इसिसमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा होऊ इच्छिणाऱ्या लोकांचे समुपदेशन करण्यात येते. इसिसमध्ये सुरू असलेल्या विकृतीची त्यांना जाणीव करून देण्यात येते.

भारतातील मुस्लिमांची संख्या ही पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्यापेक्षा थोडी कमी आहे. त्या तुलनेत इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या अतिशय किरकोळ आहे. २०१९ साली ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने एका अहवालातून सांगितले की, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते इस्लामिक स्टेटमध्ये परदेशी योद्ध्यांना सामील करण्यासाठी त्यांना भारत ही सुपीक जमीन वाटत होती. पण, विश्लेषकांचे हे मत खोडून निघाले आहे. हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच प्रकरणे आतापर्यंत समोर आलेली आहेत. यूएसच्या स्टेट डिपार्टमेंटने ‘भारतातील दहशतवाद – २०२०’ हा अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये भारतीय वंशाचे ६६ लोक नोव्हेंबर २०२० पर्यंत इसिसमध्ये सामील झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

तपास यंत्रणांच्या मते, इसिसमध्ये अतिशय कमी संख्येने भारतीय नागरिक सहभागी झाले आहेत, त्यातही दक्षिण भारतातील सहभागी झालेल्यांची संख्या ९० टक्के आहे. ओआरएफ या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार या ९० टक्क्यांमधील बहुतेक लोक केरळ राज्यातील आहेत. देशभरातील १८० ते २०० प्रकरणांपैकी ४० प्रकरणे एकट्या केरळ राज्यातील होती. इस्लामिक स्टेटशी संबंध असणारे केरळमधील बहुतेक लोक आखाती देशांत नोकरी करण्यासाठी गेले होते. जे लोक आखाती देशांतून परत आले, त्यांच्यावर आधीच इस्लामिक स्टेटच्या कट्टरतावादी विचारसरणीचा प्रभाव होता.

‘द केरल स्टोरी’मध्ये दाखविण्यात आलेल्या चार मुलींचे काय?

‘द केरल स्टोरी’मध्ये चार मुलींची कथा सांगण्यात आली आहे. या महिला २०१६ ते २०१८ दरम्यान त्यांच्या पतीसोबत अफगाणिस्तानात प्रवास करून तिथून पुढे इसिसमध्ये सामील होतात. या महिला सध्या अफगाणी तुरुंगात असल्याचे दाखविले गेले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये, ‘स्टारन्यूजग्लोबल’ या संकेतस्थळाने चार महिलांची मुलाखत घेतली होती. ‘खोरासन फाईल्स : द जर्नी ऑफ इंडियन इस्लामिक स्टेट विडोज’ या शीर्षकाखाली ही मुलाखत प्रकाशित झाली होती. निमिषा ऊर्फ फातिमा इसा, मेरीन ऊर्फ मरियम, सोनिया सेबास्टियन ऊर्फ आयेशा आणि राफेला अशी या चार महिलांची नावे होती. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने या चार महिलांच्या मुलाखतीतून प्रेरणा घेत इस्लामिक स्टेटच्या केरळमधून होत असलेल्या भरतीबद्दल भाष्य केले आहे.