From 1872 to the Upcoming Caste-Based Data Collection: भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आराखड्याचा आरसा असते. १८७२ साली सुरू झालेल्या या ऐतिहासिक उपक्रमात प्रत्येक दशकागणिक बदल होत गेले आहेत. सुरुवातीला वय, धर्म, जात, व्यवसाय यांसारख्या मूलभूत गोष्टी विचारल्या जात होत्या. तर, नंतरच्या जनगणनेमध्ये स्थलांतर, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि कौटुंबिक रचनेविषयीची माहितीही संकलित होऊ लागली. मात्र, गेल्या काही दशकांपासून जातीनिहाय माहिती संकलनाच्या प्रश्नावलीला मर्यादा आल्या. म्हणूनच आगामी जनगणना या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची ठरणार आहे. विद्यमान केंद्र सरकार जातीविषयीची सविस्तर माहिती पुन्हा एकदा गोळा करणार आहे. त्यामुळे दशकागणिक बदलत गेलेल्या या ऐतिहासिक प्रवासाविषयी जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरणारे आहे.
नागरिकांकडून त्यांच्या जातीविषयीची माहिती गोळा करण्यासाठी सरकारला मागील जनगणनेत वापरलेल्या प्रश्नावलीचा विस्तार करावा लागेल.
जनगणनेतील माहिती ही नागरिकांनी स्वतः दिलेली माहिती असते. म्हणजेच, नागरिकांकडून मिळालेली माहिती गणक (enumerators) नोंदवतात. भारतात दर १० वर्षांनी (दशकानंतर) राष्ट्रीय स्तरावर जनगणना घेतली जाते. ही परंपरा १८७२ पासून सुरू झाली असून, १८८१ पासून नियमितपणे दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. भारतातील पहिली जनगणना १८७२ साली झाली. ती देशभर एकाच वेळी न घेता विविध भागांत वेगवेगळ्या वेळी घेतली गेली होती. त्यावेळी १७ प्रश्न विचारले गेले. २०११ मधील शेवटच्या जनगणनेत २९ प्रश्न विचारण्यात आले. ज्यामुळे अधिक माहिती जमा झाली. हे २९ प्रश्न २००१ मधील जनगणनेतील प्रश्नांशी जवळपास सारखेच होते. त्याच पार्श्वभूमीवर १८७२ पासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.
१८७२ साली विचारलेले प्रश्न:
१८७२ साली घरांची संख्या (टेरस असलेली, टाईल्स असलेली किंवा गवताचे छप्पर असलेली), पुरुष आणि महिलांची नावे, वय, धर्म, जात किंवा वर्ग, वंश, राष्ट्रीयत्व किंवा जन्मस्थान, पुरुषांचे व्यवसाय, २० वर्षांपर्यंतचे युवक शाळा, महाविद्यालय किंवा खासगी शिक्षण घेतात का?, वाचन-लेखनाची क्षमता, अंध, बहिरे, मुकबधीर, वेडे किंवा कुष्ठरोगी पुरुष व महिलांची संख्या असे प्रश्न विचारण्यात आले होते.
१८८१ सालातील प्रश्न:
या वर्षी नवीन चार मुद्दे समाविष्ट झाले. त्यात वैवाहिक स्थिती, मातृभाषा, महिलांचे व्यवसाय, हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मीयांचे पंथ इत्यादी विषयी प्रश्न विचारण्यात आले.
१८९१ साली विचारलेले प्रश्न:
या वर्षी १४ प्रश्न विचारले गेले. त्यात जात आणि वंशासह परकीय भाषा येते का हे विचारले गेले.
१९०१ साली विचारलेले प्रश्न:
या वर्षी १६ प्रश्न विचारले गेले. हिंदू व्यतिरिक्त जैनांची जात आणि इतरांची जमात/ वंश विचारला गेला. कुटुंबातील सदस्यांची उपजीविका कोणावर अवलंबून आहे ते विचारले गेले. इंग्रजी भाषा येते का, यावरही प्रश्न होता.
१९११ व १९२१ साली विचारलेले प्रश्न:
ख्रिश्चनांना त्यांच्या पंथासंबंधी विचारले गेले.
१९३१ साली विचारलेले प्रश्न:
संघटित क्षेत्रातील कर्मचार्यांचे उद्योग क्षेत्र विचारले गेले. मातृभाषेव्यतिरिक्त कोणत्या भाषा वापरता हेही विचारले गेले.
१९४१ स्वातंत्र्यपूर्व शेवटची जनगणना:
या वर्षी २२ प्रश्न विचारले गेले. विवाहित महिलांना किती मुले झाली आणि त्यातील किती जिवंत आहेत याची माहिती विचारली गेली, पहिले मूल झाले तेव्हाचे वय, घरगुती मदतनीस किंवा पगारी मदतनीस आहेत का?, नोकरी आहे की नोकरीच्या शोधात आहेत आणि किती कालावधीपासून नोकरीच्या शोधात आहेत असे प्रश्न विचारले गेले. कोणती परीक्षा उत्तीर्ण केली आहे याचीही विचारणा झाली.
१९५१ फाळणी आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना:
या वर्षी राष्ट्रीयत्व आणि विस्थापित व्यक्तींविषयी प्रश्न विचारले गेले. १९३१ व १९४१ मध्ये विचारलेल्या जात विषयक प्रश्नांचा समावेश यावेळी झाला नाही. आरोग्य व कुटुंबाविषयी फलनक्षमता (fertility), विवाहाचा कालावधी, कुटुंबाचा आकार, पहिल्या प्रसूतीचे वय, मुले किती आहेत व त्यातील किती जिवंत आहेत, अपंगत्व आणि कुटुंब प्रमुखाशी नातेसंबंध, नोकरीसंबंधी-९ फेब्रुवारी १९५१ पासून बेरोजगार आहात का? असल्यास कारण काय?, घराच्या मालकीतील किंवा कसणाऱ्या जमिनीचे क्षेत्र, आसामातील स्थानिक (indigenous) व्यक्तींविषयी माहिती इत्यादी संदर्भात प्रश्न विचारले गेले. महत्त्वाचे म्हणजे याच डेटावर आधारित रजिस्टर तयार करण्यात आले आणि पुढे आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रसिद्ध करण्यात आली.
१९६१ व १९७१ साली विचारलेले प्रश्न:
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST) या सदराचा प्रथम समावेश केला गेला. मात्र, यात व्यक्तीच्या जातीची विशेष विचारणा नव्हती. कामाच्या स्वरूपासंबंधी माहिती विचारली गेली (जसे की शेतकरी, शेती मजूर, उद्योग, व्यवसाय).
१९८१ साली विचारलेले प्रश्न:
अनुसूचित जाती व जमातींमध्ये जाती/ जमातीचे नाव विचारले गेले. स्थलांतराचे कारण विचारले गेले. मुलांचे लिंग प्रथमच विचारण्यात आले.
१९९१ साली विचारलेले प्रश्न:
पूर्वीप्रमाणेच माहिती विचारली गेली. अतिरिक्त माहितीत माजी सैनिकांबद्दल (पेन्शनधारक / गैर-पेन्शनधारक) विचारणा झाली.
२००१ साली विचारलेले प्रश्न:
या वर्षी मुख्य आणि गौण कामगारांची आर्थिक क्रियाशीलता, कामगाराचा प्रकार (नियोक्ता/कर्मचारी/ स्वतंत्र कामगार/कुटुंबातील कामगार), non-economic activities, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करावा लागतो का? असल्यास अंतर (किलोमीटरमध्ये) आणि प्रवासाचा प्रकार विचारण्यात आला.
२०११ साली विचारलेले प्रश्न:
२०११ साली पूर्वीप्रमाणेच २९ प्रश्न विचारले गेले.
भारताच्या जनगणना प्रक्रियेने गेल्या दीडशे वर्षांत समाजाच्या बदलत्या गरजांनुसार आपली प्रश्नावली सातत्याने बदलत गेली आहे. सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी आणि धोरणात्मक निर्णय यांमुळे प्रत्येक जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपात बदल झाले. मात्र, गेल्या काही दशकांपासून व्यक्तीगत जातीची माहिती संकलित करण्यात आलेली नव्हती किंवा ती केवळ अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) यापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे आता आगामी जनगणनेत जातीनिहाय माहिती पुन्हा सविस्तरपणे गोळा करण्याची गरज निर्माण झाल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.