पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढू लागला आहे. भारत सरकारने अल्पकालीन व्हिसावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. तसेच दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या आणि भारतीय नागरिकत्व न मिळालेल्यांना त्यांच्या व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रेमाखातर भारतात आलेल्या सीमा हैदर हिला भारताचं नागरिकत्व मिळणार का याबाबत चर्चा होत आहे.
सीमा हैदर प्रकरण
सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला आहे. तिने दोन वर्षांपूर्वी तिच्या चार मुलांसह भारतात बेकायदा प्रवेश केला होता. त्यानंतर ती चर्चेत आली होती. भारत सरकारच्या हद्दपारीच्या आदेशानंतर सीमा हैदरविषयी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ३२ वर्षीय सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जेकबाबाद येथील रहिवासी आहे. मे २०२३ मध्ये ती तिच्या मुलांसह कराची येथील घरातून पळून नेपाळमार्गे भारतात आली. २०१९ मध्ये ऑनलाइन गेम खेळत असताना सीमा आणि सचिन मीना संपर्कात आले. सीमा हैदर आणि तिचा पाकिस्तानी पती यांना चार मुले आहेत. सीमा आणि सचिन यांच्या प्रेमसंबंधांमुळे ती भारतात आली. त्यानंतर तिचा पाकिस्तानी पती मुलांचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता. हैदर आणि सचिन मीना यांना जुलै २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. सीमा हैदरवर भारतात बेकायदा प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच सचिन मीना यांच्यावर बेकायदा स्थलांतरितांना आश्रय दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीमाने सचिन याच्याशी विवाह केल्यानंतर हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे.
भारतीय नागरिकत्वाचे नियम
भारतीय नागरिकत्व जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गीकरण किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)याद्वारे मिळवता येते.
जन्म: २६ जानेवारी १९५० रोजी किंवा १ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती पालकांचे राष्ट्रीयत्व विचारात न घेताही जन्माने भारतीय नागरिक असते. १ जुलै १९८७ ते ३ डिसेंबर २००४ दरम्यान, भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जर किमान एक पालक भारतीय नागरिक असेल, तर ती व्यक्तीही भारतीय नागरिक असते. ३ डिसेंबर २००४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांसाठी दोन्ही पालक भारतीय नागरिक असले पाहिजेत किंवा त्यापैकी एक भारतीय नागरिक असावा आणि दुसरा बेकायदा स्थलांतरित नसावा. २००४ च्या दुरुस्तीनुसार बेकायदा स्थलांतरित म्हणजे अशी परदेशी व्यक्ती जी कायदेशीर कागदपत्रांशिवाय भारतात आली किंवा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिली. तणावपूर्ण द्विपक्षीय संबंधांमुळे पाकिस्तानी नागरिकांची अनेकदा या कलमाच्या अंतर्गत छाननी केली जाते.
वंश: भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्ती जन्माच्या वेळी दोन्ही पालक जर भारतीय नागरिक असतील, तर ती व्यक्तीही भारतीय नागरिक ठरते. जर ते अपत्य १० डिसेंबर १९९२ रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्माला आले असेल आणि जन्माच्या एका वर्षाच्या आत परदेशातील भारतीय मिशनमध्ये नोंदणीकृत असेल, तर त्या अपत्याला वंशानुसार भारतीय नागरिक मानले जाते.
नोंदणी: जर व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी भारतात राहणारी भारतीय वंशाची व्यक्ती असणे किंवा भारतीय नागरिकाशी विवाहित असणे आणि विशिष्ट कालावधीसाठी भारतात राहणे यांसारखे काही निकष पूर्ण करीत असेल, तर ती व्यक्ती भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करू शकते. नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ५(१)(क)नुसार, भारतीय नागरिकाशी विवाहित असलेल्या किंवा झालेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक म्हणून नोंदणी करण्याची परवानगी मिळते. असे असतानाही नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यक्तीने आठ वर्षे भारतात सामान्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
नैसर्गिकरण: भारतात किमान १२ वर्षे वास्तव्य करणारा आणि इतर आवश्यकता पूर्ण करणारा परदेशी (बेकायदा स्थलांतरित नाही) भारतीय नागरिक म्हणून नैसर्गीकरण मिळवू शकतो.
CAA (Citizenship Amendment Act):
२०१९ च्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज सादर करण्यासाठी एक विशेष तरतूद अस्तित्वात आहे. ही तरतूद ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेशातून हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींसाठी आहे.
पाकिस्तानी नागरिकत्वाचे कायदे
पाकिस्तानचे नागरिकत्व पाकिस्तान नागरिकत्व कायदा १९५१ द्वारे नियंत्रित केले जाते. यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत…
वंशज: पाकिस्तान नागरिकत्व कायद्याचा कलम ४ नुसार, जन्माच्या वेळी किमान एक पालक पाकिस्तानी नागरिक असेल, तर जगात कुठेही जन्मलेले मूल पाकिस्तानी नागरिक असते.
नैसर्गिकरण: परदेशी नागरिक किमान पाच वर्षे देशात राहिल्यानंतर आणि पाकिस्तानच्या किमान एका स्थानिक भाषेत प्रावीण्य दाखवल्यानंतर पाकिस्तानी नागरिक म्हणून नैसर्गीकरण करू शकतात. राज्यात भरीव आर्थिक गुंतवणूक करणारे नागरिक नैसर्गीकरण प्रक्रियेसाठी पात्र आहेत.
पाकिस्तान दुसऱ्या पालकाच्या राष्ट्रीयत्वावर आधारित निर्बंध लादत नाही. त्यामुळे पाकिस्तानी आईचे मूल आपोआप पाकिस्तानी नागरिकत्वासाठी पात्र ठरते.
भारतात बेकायदा प्रवेश केल्यामुळे सीमा हैदरची परिस्थिती गुंतागुंतीची आहे. कायदेशीर व्हिसावर देशात प्रवेश करणाऱ्या इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे तिने मानक इमिग्रेशन नियम आणि प्रक्रियांचे पालन न करता, नेपळमधून सीमा ओलांडली. त्याशिवाय अद्याप तिला भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही आणि तिची कायदेशीर तपासणीही सुरू आहे.
दरम्यान, अशा अनेक पाकिस्तानी महिला आहेत, ज्या दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत आणि भारतात मुलांना जन्म देत आहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये किमान २२ पाकिस्तानी महिलांची ओळख पटली आहे. त्यांच्याकडे एकूण ९५ मुले आहेत. सर्व महिलांकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे आणि त्यांच्या मुलांकडे भारतीय नागरिकत्व आहे.
बुलंदशहरमधील दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या १८ पाकिस्तानी नागरिकांपैकी गर्भवती असलेल्या आमिर व मरियमसारख्या काहींनी भारताच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. मानवतावादी कारणास्तव राहण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. पोलीस आणि स्थानिक गुप्तचर पथके अशा सर्व प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत राहतील, असेही बोलले जात आहे.