निखिल अहिरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील प्रवाशांचा प्रवास वेगवान करण्याच्या दृष्टीने ऐरोली-काटई मार्ग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या १२ किलोमीटरच्या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गांतर्गत असलेल्या पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा पुढील कामासाठी दोन्ही बाजूने नुकताच खुला करण्यात आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात या मार्गाचे काम पूर्ण होणार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ऐरोली-काटई मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कल्याण ते ऐरोली अगदी १५ ते २० मिनिटांत गाठणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे. ते नेमके कसे हे जाणून घेऊया.

ऐरोली-काटई नाका मार्गाच्या कामाला सुरुवात कशी झाली?

अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागातून नवी मुंबई आणि मुंबईमध्ये कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र या नागरिकांना महापे, शिळफाटा मार्गावर कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांकडून याबाबत कायम तीव्र नाराजीदेखील व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी ऐरोली ते काटई नाका असा १२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम एमएमआरडीएतर्फे २०१८ साली हाती घेण्यात आले होते. या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

हा मार्ग नेमका कसा आहे ?

ऐरोली-काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागला गेला असून भाग-१ अंतर्गतचा रस्ता हा ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. या भागाची लांबी ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. तर या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४-४ मार्गिकेचा आहे.( त्यामध्ये १-१ रेफ्युजी मार्गिका आहे.) यातील बोगद्यांचे भुयारीकरण ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ या नियंत्रित स्फोट पद्धत तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. ऐरोली ते ठाणे बेलापूर मार्ग, ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास आणि मुंब्रा बायपास ते कल्याण-काटई असा बारा किलोमीटरचा प्रत्येकी तीन मार्गिका असलेला हा रस्ता आहे.

विश्लेषण: गायी व मेंढ्यांच्या ढेकर देण्याने, लघवीने हवामानाला कसा धोका पोहोचतो?

या मार्गाचा फायदा काय आहे?

कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली-काटई प्रकल्पामुळे कल्याण,डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे ७ किलोमीटरने अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या तसेच कल्याण येथून नवी मुंबई आणि मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे हा प्रवास अत्यंत कमी वेळेत पार करता येणार आहे.

महत्त्वाचा टप्पा कधी पार पडणार?

हा मार्ग उभारणीसाठी मुंब्रा पारसिक डोंगर फोडून बोगदा तयार करण्यात आला आहे. हा या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा होता. पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. यातील डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे कामदेखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल. असे एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे.

मार्ग वाहतुकीसाठी केव्हा खुला होणार?

एप्रिल महिन्यात यातील एक बोगदा मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शनपर्यंतचा टप्पा नोव्हेबरपर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या मार्गातील मुंब्रा वाय जंक्शन ते काटई नाका या मार्गाच्या उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांकडे होणारी वाहतूक गतिमान आणि कोंडी विरहित होईल. मुंबईच्या फ्री वेच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल असा हा उन्नत मार्ग असणार आहे.

विश्लेषण : जगातली पहिली नाकावाटे घेतली जाणारी करोना प्रतिबंधक लस भारतात, काय आहे किंमत? कोण घेऊ शकणार?

या मार्गाप्रमाणे इतर कोणते प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत?

शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेला मार्गाचे नियोजन करण्यात आले. याशिवाय माणकोली-डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्रीवे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरून बायपास उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबई व मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबवून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan navi mumbai by road airoli katai mmrda construction print exp pmw
First published on: 31-01-2023 at 09:04 IST