डॉ. अंजय धनावडे
Konkan Kanakadity Sun Temple: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आडिवरे– कशेळी परिसरातील कनकादित्याचे मंदिर ही अशीच एक जागा आहे, जिथे सातव्या– आठव्या शतकांपासून सूर्योपासनेची अखंड परंपरा जपली गेली आहे. कोकणात सूर्योपासना ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. आजही दक्षिण कोकणात आढळणारी सूर्य मंदिरे, सुट्या सूर्यमूर्ती आणि रथसप्तमीसारखे उत्सव ही त्या परंपरेची उदाहरणे आहेत. कोकणचा इतिहास हा केवळ राजकीय घडामोडींपुरता मर्यादित नसून, तो धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि निसर्गाशी जोडलेल्या उपासनेचा इतिहासही आहे.
पुरातत्त्वीय आणि अभिलेखीय पुरावे
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आडिवरे– कशेळी परिसर हा सातव्या– आठव्या शतकांपासून सूर्योपासनेचे एक प्रमुख केंद्र असल्याचे विविध पुरातत्त्वीय आणि अभिलेखीय पुराव्यांतून स्पष्ट होते. कशेळी हे एक छोटेसे गाव आहे. येथे कनकादित्य सूर्यदेवाचे मंदिर आहे. स्थानिक कथेनुसार, गुजरातमधील प्रभासपाटण (वेरावळ) परिसरातील सूर्य मंदिरांवर संकट आले तेव्हा काही सूर्यमूर्ती समुद्रमार्गे दक्षिणेकडे हलविण्यात आल्या. सूर्योपासक असलेल्या आणि व्यवसायाने गणिका असलेल्या कनकाने यातील एका मूर्तीची स्थापना केली. नंतर सूर्यदेवाची ही मूर्ती कनकेचा आदित्य म्हणजे कनकादित्य म्हणून ओळखला जाऊ लागला.
गणिकेची आख्यायिका
या मूर्तीची कनकादित्य ही ओळख आजही कायम आहे. समुद्राकाठी असलेल्या कड्यातील ज्या गुहेत मूर्ती तात्पुरती ठेवली होती ती गुहा म्हणजे ‘देवाची खोली’ हे स्थान आजही समुद्रकिनारी अस्तित्वात आहे. एका सामान्य गणिकेने सूर्यमूर्ती स्थापन केल्याची आख्यायिका इथे ऐकायला मिळते. प्राचीन भारतात रुपजीविका पद्धतीने जगणारा गणिकांचा वर्ग वा समुदाय अस्तित्वात होता. त्या शास्त्र, कला, संगीत आणि चौसष्ठ विद्येत निपुण असत. हे वात्सायानाचे कामसूत्र, चातुर्भाणी अथवा वसंतसेना सारख्या साहित्यावरून लक्षात येते. तत्कालीन समाजात गणिकांना मान होता त्यांना सन्मानाने वागविले जात होते.
आदित्यवाडचा इतिहास
कशेळी हे आडिवरे पंचक्रोशीतील गाव आहे. आजच्या आडिवरे गावाचे प्राचीन नाव ‘आदित्यवाड’ असल्याचे प्रस्तुत लेखकाने त्याच्या संशोधनात दाखवून दिले आहे. ‘आदित्य’ म्हणजे सूर्य आणि ‘वाड’ म्हणजे वस्ती म्हणजेच सूर्यदेवाचे निवासस्थान. हे नाव केवळ दंतकथांवर आधारित नसून, थेट चालुक्यकालीन ताम्रपटांच्या पुराव्यावर आधारलेले आहे. काळ्या पाषाणातील सुमारे सव्वा मीटर उंच सूर्यमूर्तीवर चकाकी आहे. समभंग आणि स्थानक अवस्थेतील सूर्य दोन हातांचा असून त्याच्या डोक्यामागे लंबवर्तुळाकार प्रभावलय कोरले आहे. हातात आखूड सनाल पद्म पुष्पे धारण केली आहेत. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि करंडक मुकुट घातलेल्या सूर्याच्या हातात कंकणे, बाजूबंद, गळ्यात कंठहार, यज्ञोपवीत, कमरेत मेखला, उदरबंध इत्यादी अलंकार परिधान केले आहे. त्याचे लांब कान खांद्यापर्यंत आले असून त्यात कर्णकुंडले आहेत. त्याने अधोवस्त्र म्हणून वैशिष्ट्यपूर्ण आखूड ‘जंघिका’ किंवा ‘अर्धोरूक’ म्हणजे गुढग्याच्या वर परिधान केलेले एक प्रकारचे वस्त्र दिसते. त्याच्या पायाशी चामारधारिणी उभ्या असून त्या छाया आणि संध्या अथवा उषा आणि प्रत्युषा या सूर्य पत्नी असाव्यात. पीठावर सात घोड्यांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.

कोकणातील कारागिरी?
या सर्व वैशिष्ट्यांवरून ही मूर्ती इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या मध्यकाळातील असून, कर्नाटकातील ऐहोळे व पत्तडकल येथील चालुक्यकालीन सूर्यमूर्तींशी साधर्म्य दर्शवते. त्यामुळे गुजरातहून मूर्ती आणली गेली अशी आख्यायिका असली, तरी तिची कलात्मक घडण मात्र कोकणातीलच कारागिरांनी, चालुक्य प्रभावाखाली केली असावी, असे दिसते.
व्यापारी संबंध
प्राचीनकाळी कोकणात अनेक बंदरे वसली होती. ती व्यापारी मार्गानी भरूकच्छ (भडोच), उज्जैन, तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण) इत्यादी व्यापारी केंद्रांना जोडली गेली होती. आडिवरे हे असेच मुचकुंदी नदीच्या काठावरील व्यापारी मार्गावरचे एक सक्रिय बंदर असावे. या बंदरामुळे व्यापारी, प्रवासी आणि सार्थवाह यांची येथे सतत ये-जा चालू असे आणि त्यामुळे धार्मिक केंद्र म्हणूनही या गावाचा विकास झाला असावा. व्यापाराच्या निमित्ताने देशविदेशातून अनेक प्रवासी, सार्थवाह, व्यापारी यांची बंदर किनारी वसलेल्या नगरातून सतत ये-जा सुरु असे. त्यामुळे येणाऱ्या धनाढ्य व्यापारी, राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी वर्गास काव्य, गायन, नृत्यादी मनोरंजनासारखी सेवा पुरविणारा गणिकांचा वर्ग अस्तित्वात असावा.
ताम्रपटाचा संदर्भ
चालुक्य काळात आडिवरे हे ‘आदित्यवाड’ या नावाने ओळखले जात होते असे ठामपणे म्हणता येते कारण बदामी चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा याने शके ६६४ (इ.स. ७४१–७४२) मध्ये दिलेल्या नरवण ताम्रपटामध्ये आलेली गावे कोकणातील चिपळूण,गुहागर परिसरातील आहेत. ताम्रपटामध्ये तो आदित्यवाड या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दान देत असल्याचा उल्लेख आहे. स्वत चालुक्य सम्राटाने दान दिलेले असल्याने आडिवरे हे केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र होते, असे म्हणता येते.
डिसेंबरमधील मकर संक्रांत
या ताम्रपटातील आणखी एक अधोरेखित करण्यासारखी आणि महत्त्वाची बाब म्हणजे दान दिल्याची तिथी सूर्याशी संबधित म्हणजे मकर संक्रांत होती. आज संक्रांत १४ जानेवारीला साजरी होते; मात्र ताम्रपटातील तारीख २१ डिसेंबर ७४१/४२ अशी होती. यातील खगोलशास्त्रीय संदर्भांनुसार त्या काळात मकर संक्रांत डिसेंबर महिन्यात येत असे, हे देखील लक्षात येते. यावरून सूर्यगती आणि उत्तरायणाला त्या काळी किती महत्त्व दिले जात होते, हे लक्षात येते. पुढील काळात म्हणजे शिलाहार राजवटीतही हा परिसर धार्मिकदृष्ट्या सक्रिय राहिला. शिलाहार काळातील उल्लेखांवरून कनकादित्य मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे संभवते. त्यामुळेच सूर्योपासनेची परंपरा अखंड सुरू राहिल्याचे दिसते.
कोकणातील सूर्यपूजेची पार्श्वभूमी
कोकणात शिलाहारांच्या पूर्वी कदाचित बदामी चालुक्य काळात (सन ५४३-७५७) सूर्यपूजा जास्त लोकप्रिय झाली असण्याची शक्यता आहे. बदामी चालुक्यांनी त्यांच्या राज्यात आदित्य म्हणजे सूर्याला समर्पित अनेक मंदिरे बांधली. त्यांनी आदित्य हे नाव आपल्या राजपुत्रांच्या नावांसाठी उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणूनही वापरले. उदाहरणार्थ आदित्यवर्मन, चंद्रादित्य आणि विक्रमादित्य. सन ६९१-६९२ च्या मनोर ताम्रपटानुसार उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यातील मानपूर म्हणजे आजच्या मनोर येथे सूर्याचे मंदिर होते. या ताम्रपटानुसार गुजरात शाखेचा चालुक्य सम्राट विनयादित्य- मंगलरसने ‘दीधितीमालीन’ नावाच्या सूर्यदेवाच्या मंदिराला रोजच्या पूजोपचारासाठी अत्तर, फुले, धूप, दिवे, संगीत अर्पण करण्यासाठी आणि मंदिराच्या दुरुस्तीसाठी काही गावे आणि स्थळांचे अनुदान दिले.
कांदळगाव ताम्रपटात रथसप्तमीचा उल्लेख
चालुक्य पुलकेशी दुसरा याच्या कांदळगाव (सिंधुदुर्ग) ताम्रपटात रथसप्तमीचा आलेला उल्लेख महत्वाचा आहे. स्पष्ट अशा अभिलेखीय पुराव्यामुळे कोकणच्या किनारी भागात सूर्य पूजा अगदी मंदिरात विधिवत मूर्ती स्थापना करून होत होती, असे दिसते. त्यामुळेच चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा याने स्वतः कोकणातील ‘आदित्यावाड’ येथून कोकणातील गावे दान दिल्याचे दिसते. आजही कशेळी येथे साजरी होणारी रथसप्तमी ही या प्राचीन परंपरेची साक्ष आहे. या उत्सवात आडिवरेच्या स्थानिक ग्रामदेवता महाकाली, जाखादेवी आणि भगवती विधिवत सहभागी होतात. सूर्यदेव आणि ग्रामदैवतांचा हा सहवास कोकणच्या धार्मिक संस्कृतीतील सुंदर समन्वय दर्शवतो.
एकूणच, आदित्यवाड ते आडिवरे, चालुक्य सम्राटाची प्रत्यक्ष उपस्थिती, कनकादित्याची सातव्या शतकातील सूर्यमूर्ती, कनका या गणिकेची भक्ती आणि आजही साजरी केली जाणारी रथसप्तमीची परंपरा या सगळ्यांमुळे कशेळी- आडिवरे परिसर कोकणातील सूर्योपासनेचा एक तेजस्वी आणि अभिमानास्पद अध्याय ठरतो.
