पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन टाकले. शुक्रवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच शत्रुत्व सुरू राहिल्याने शेजारील देशालाच नुकसान होईल, असेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
“गुरुवारी रात्री सीमेपलीकडून रात्री ९ वाजता आणि पहाटे ४.३० वाजता सलग हल्ले झाले. त्यावरून पाकिस्तान तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट होतंय. असं करण्यामुळे सर्वांत जास्त नुकसान त्यांचंच होणार आहे आणि पाकिस्तानला काहीही फायदा होणार नाही. ते त्यांच्या प्रयत्नांत यशस्वीही होणार नाहीत,” असेही अब्दुल्ला म्हणाले. हे संकट भारताने निर्माण केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “पहलगाममध्ये आमच्या लोकांवर हल्ला झाला आणि निष्पाप नागरिक मारले गेले म्हणून आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं”, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर गुरुवारी रात्री झालेल्या जम्मूवरील हल्ल्यांना सर्वांत गंभीर हल्ल्यांपैकी एक म्हणता येईल. “ज्या प्रकारे नागरिकांना लक्ष्य केलं गेलं आहे आणि शहरात ज्या प्रकारचे हल्ले केले गेले ते पाहता, जम्मूला अशा प्रकारे कधीही लक्ष्य केलं गेलेलं नाही”, असेही अब्दुल्ला म्हणाले.
पाकिस्तानकडून हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून सर्वांत जास्त नुकसान आणि जीवितहानी झालेल्या पूंछमधील परिस्थिती गंभीर आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्रीच्या वेळी झालेल्या गोळीबारात मोहम्मद अबरार नावाचा एक नागरिक ठार झाला. आतापर्यंत १३ नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पूंछ शहरातील ८० लोक सुरनकोट, राजौरी व जम्मू शहरासारख्या ठिकाणी आश्रय घेत आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि तिथले मुख्य धर्मगुरू मीरवाईज उमर फारूख यांनीही तणाव कमी करण्याचे आणि भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. “सीमेच्या दोन्ही बाजूंना लहान मुले, महिला व वृद्धांचा मृत्यू होत आहे आणि ते विस्थापित होत आहेत. संयम राखण्याची नितांत गरज आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा”, असे मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे म्हटले आहे. “लष्करी कारवाई फक्त आजाराची लक्षणे दूर करते; आजार बरा नाही करत. अशी कारवाई तोडगा आणि शांतीची हमी देत नाही”, असेही त्या पुढे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्र्यांनीही दिली भेट
“जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे तेव्हा तेव्हा त्याचा फटका प्रामुख्याने जम्मू-काश्मीरच्या लोकांना सहन करावा लागतो. या धोकादायक मार्गावर जाऊ नये, तो केवळ विनाशाकडे नेऊ शकतो,” असे मीरवाईज यांनी म्हटले आहे. नौशेरा येथील नियंत्रण रेषेजवळील रहिवासी, तसेच पूंछमधील हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती यांची उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, “सध्या सुरू असलेले शत्रुत्व हा भारताचा पाकिस्तानशी शेवटचा संघर्ष असायला हवा. याबाबत निर्णय एकदा झाला पाहिजे. त्यामुळे किमान येणाऱ्या पिढ्या तरी निवांत राहतील”.
जेव्हाही भारत-पाकमधील तणाव वाढतो तेव्हा त्यात पहिले बळी सीमावर्ती भागातील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील लोकांचेच असतात. त्यावर चौधरी म्हणाले, “लोक आता कंटाळले आहेत. आमच्या पूर्वजांनी हे पाहिले, आम्हीही तेच पाहत आहोत आणि आपली मुलेही तेच पाहतील… युद्धच आपल्या नशिबात आहे का?” हा संघर्ष शेवटचा ठरावा, अशी सीमावर्ती भागातील लोकांची इच्छा आहे, असेही चौधरी यांनी यावेळी म्हटले.
माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना राजकीय हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “शत्रुत्वाची खूप मोठी किंमत सीमेच्या दोन्ही बाजूंच्या नागरिकांना मोजावी लागत आहे. मी दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांना हे हल्ले थांबविण्याची विनंती करते.” पुढे त्या भावनिक होत म्हणाल्या, “सीमेवर राहणारे लोक किती वेळ या त्रासाला तोंड देणार? माता किती काळ आपल्या मुलांना गमावणार? या सगळ्यात त्यांची काय चूक आहे?”. काश्मीरच्या सीमावर्ती भागातील उरीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुफ्ती यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचा यावेळी उल्लेख केला. “हा युद्धाचा काळ नाही आणि राजकीय हस्तक्षेपाने संघर्ष हाताळले पाहिजेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.
ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सीमावर्ती भागातून स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी उभारण्यात आलेल्या सांबा जिल्ह्यातील मदत छावण्यांना भेट दिली. या छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधांसह आवश्यक त्या सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी जम्मूमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींचीही भेट घेतली.