सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिलांच्या शिक्षणासाठी मोठं काम केलं. त्यामुळे भारतीय समाजात क्रांती घडली. विशेष म्हणजे वयाचा विचार केला तर अत्यंत कमी वयात सावित्रीबाईंनी डोंगराएवढं काम उभं केलं. तत्कालीन रुढी-परंपरांप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षीच लग्न झालेलं असतानाही त्यांनी जोतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः शिक्षण घेतलं आणि नंतर इतिहास घडला. असं असलं तरी अनेकांना सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनेक कामांबद्दल माहिती नसते. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंच्या कामाचा आढावा घेणारं हे खास विश्लेषण…

सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाल. त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी सिंदूजी नेवसे पाटील आणि आईचं नाव लक्ष्मीबाई असं होतं. १८४० मध्ये सावित्रीबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फुले यांच्याशी विवाह केला. यानंतर जोतिबांच्या पुढाकारातून सावित्रीबाईंनी १८४१ पासून शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
sharad pawar health in loksabha
वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

पुढे सावित्रीबाईंनी ‘नार्मल स्कूल’मधून शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १ जानेवारी १८४८ रोजी फुले दाम्पत्याने पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. या शाळेत सावित्रीबाई फुले शिक्षिका झाल्या, तर फातिमा शेख सहशिक्षिका झाल्या. ‘सावित्री वदते’ या पुस्तकातील माहितीनुसार, या शाळेत दाखल झालेल्या पहिल्या विद्यार्थिनींमध्ये विविध जातीतील मुली होत्या. त्यात ४ ब्राम्हण, १ धनगर, १ मराठा अशा ६ विद्यार्थीनींचा समावेश होता. अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी करडिले अशी सावित्रीबाईंच्या पहिल्या विद्यार्थिनींची नावं होती.

भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू करून फुले दाम्पत्य तेवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी १५ मे १८४८ रोजी पुण्यात महारवाड्यात दुसरी शाळा सुरू केली. १८४८ मध्ये फुले दाम्पत्य व सहकाऱ्यांनी पुण्यात ‘नेटिव्ह फिमेल स्कूल्स’ ही स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली.

शूद्रांना शिक्षण दिले म्हणून जोतिबा-सावित्रीबाईंवर घर सोडण्याची वेळ

१८४९ शूद्रांना शिक्षण दिले म्हणून जोतिबा फुले यांच्या वडिलांनी जोतिबा-सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. सावित्रीबाईंच्या माहेरचाही या कामाला विरोध होता. पुढे १ मे १८४९ रोजी पुणे येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना करण्यात आली. येथे सावित्रीबाईंनी शिकवण्याचं काम केलं. १८४९-१८५० या काळात पुणे, सातारा, नगर या जिल्ह्यांमध्येही शाळांची स्थापना करण्यात आली. त्यातील काही शाळेंमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम केलं. १८५१ मध्ये महारवाड्यात हरिजन मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. ३ जुलै १८५९ रोजी पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची शाळा सुरू करण्यातआली.

सावित्रीबाई फुलेंच्या याच शैक्षणिक कामाची दखल घेत १८५२ मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात इंग्रज सरकारकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

२८ जानेवारी १८५३ रोजी फुले दाम्पत्याने बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तसेच या विषयावर मोठा काळ काम केलं. १२ फेब्रुवारी १८५३ रोजी मेजर कँडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा विश्रामबाग वाड्यात सन्मान करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या बक्षीस समारंभात मुलामुलींनी सावित्रीबाईंनी रचलेली पदये गायली.

विधवांच्या सुरक्षित बाळंतपणासाठी काम

सावित्रीबाईंनी १८५३ ते १८७३ या काळात १०० विधवांची बाळंतपणे केली. १८५४ मध्ये सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी, तर जोतिबांनी पुरुषांसाठी प्रौढांची पहिली रात्रशाळा सुरू केली. १८५४ मध्ये सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इतकंच नाही, तर १ डिसेंबर १८५४ रोजी त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा काढली. दरम्यान, १८६० मध्ये फुले दाम्पत्याच्या हत्येचाही कट झाला. मात्र, हत्या करणाऱ्यांचेच मतपरिवर्तन झाल्याने हा कट फसला.

सावित्रीबाईंच्या कामांचा थोडक्यात आढावा –

१८५५ – शेतकरी व मजूर स्त्री-पुरुषांसाठी रात्रशाळा सुरू केली.

२५ डिसेंबर १८५६ – ‘जोतीबांची भाषणे’ हे पुस्तक प्रसिध्द केले.

१८६४ – अनाथ बालकाश्रम चालविला.

१८६८ – घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

२४ सप्टेंबर १८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना.

२५ डिसेंबर १८७३ – सीताराम माळी अल्हाट आणि बजूबाई निंबकर यांचा विवाह भटजींना न बोलावता प्रथमच करण्यात आला. यानंतर सनातन्यांकडून जोरदार टीकाही झाली.

१८७३ – काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं आणि यशवंत नावाच्या या मुलाला डॉक्टर बनवलं.

१८७५ ते १८७७ – सत्यशोधक समाजातर्फे पुणे परिसरात ५२ अन्नछत्रे उघडली आणि दुष्काळात गरजूंना मदत केली. सावित्रीबाईंनी १८९६ पर्यंत दुष्काळ निवारणाच्या कामात स्वतःला झोकून दिलं.

२८ नोव्हेंबर १८९० – जोतिबांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाल्यानंतर सावित्रीबाईंनी स्वत:च्या हाताने जोतिबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

१८८९ – केशवपनविरोधी प्रबोधन करुन नाभिकांचा संप घडवून आणला.

१५ नोव्हेंबर १८९१ – जोतीरावांचा पहिला स्मृतिदिन ओतूर येथे सावित्रीबाईंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जोतिबा फुलेंचे पहिले चरित्र ‘अमरजीवन’ प्रकाशित करण्यात आले.

७ नोव्हेंबर १८९२ – सावित्रीबाईंचा ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा दुसरा काव्यसंग्रह मुंबईच्या ओरिएंटल छापखान्यात प्रथम छापला गेला.

हेही वाचा : विश्लेषण : महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला ‘सत्यशोधक समाज’ काय आहे? वाचा इतिहास…

विशेष म्हणजे १८९३ मध्ये सावित्रीबाईंनी सासवड येथे भरलेल्या सत्यशोधक परिषदेचं अध्यक्षपद भुषवलं. १८९७ मध्ये सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीत प्रचंड मेहनत घेत गरजुंना सेवा दिली. मात्र, त्याचा फटका स्वतः सावित्रीबाईंनाही बसला आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता प्लेगच्या संसर्गाने त्यांचं निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.