– अन्वय सावंत

भारतीय संघाने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. यासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखणार हेदेखील सुनिश्चित झाले. भारताने २०१६ सालापासून बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. केवळ भारतात नाही, तर ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला नमवण्यातही भारताला यश आले आहे. भारताने हे वर्चस्व कशा प्रकारे प्रस्थापित केले, याचा आढावा.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या गेल्या चार मालिकांचे निकाल काय होते?

भारताने २०१६-१७मध्ये मायदेशात झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकाने सरशी साधली होती. त्यानंतर २०१८-१९मध्ये ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताने केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला होता. त्यानंतर २०२०-२१मध्ये सलग दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत धूळ चारली होती. सध्या मायदेशात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा भारताकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या चार मालिकांमध्ये आतापर्यंतचा सर्वांत खास विजय कोणता?

भारताने २०१८-१९मध्ये ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघ आता मायदेशाइतकीच दमदार कामगिरी परदेशातही करू शकतो, हे सिद्ध झाले होते. मात्र, आपले वर्चस्व अधोरेखित करण्यासाठी भारताने पुन्हा अशी कामगिरी करणे गरजेचे होते. २०२०-२१मध्ये भारतीय संघाने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यातील ॲडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत (दिवस-रात्र) भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या डावात आघाडी मिळवल्यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांवर आटोपला होता. भारताची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वांत नीचांकी धावसंख्या ठरली. मग ऑस्ट्रेलियाने हा सामना आठ गडी राखून जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळवली होती. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आणि त्याच्या जागी अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची धुरा सांभाळली. उर्वरित तीन सामन्यांत भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. बरेचसे प्रमुख खेळाडू जायबंदी झाले. मात्र, त्यानंतरही रहाणेचे कुशल नेतृत्व, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या आक्रमक योजना आणि सर्व खेळाडूंच्या जिद्दीमुळे भारताने कोणालाही अपेक्षा नसताना तीनपैकी दोन सामने जिंकले. यात गॅबावरील विजयाचाही समावेश होता. गॅबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ ३२ वर्षे अपराजित होता. मात्र, त्यांची ही मालिका भारताने खंडित केली होती.

भारताच्या यशामागची कारणे काय?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील वातावरण आणि प्रामुख्याने खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. ‘खेळपट्टीचा विचारच करू नका. आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे इतकेच ध्यानात ठेवा,’ असा सल्ला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंना दिला होता. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालीच भारताने ऑस्ट्रेलियात दोन्ही कसोटी मालिका जिंकल्या. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांसारख्या वेगवान गोलंदाजांची कामगिरीही भारतासाठी निर्णायक ठरली. भारताने परिस्थितीप्रमाणे खेळाडूंची निवड केली. तसेच रहाणे, कोहली, पुजारा आणि पंत यांसारख्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मोठ्या खेळी केल्या. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियातही यश मिळवता आले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला भारतातील खेळपट्ट्यांशी जुळवून घेता आलेले नाही. यंदाच्या मालिकेपूर्वी एकही सराव सामना न खेळण्याची त्यांची योजनाही अचंबित करणारी होती. तसेच रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या गुणवान फिरकीपटूंविरुद्ध धावा करण्यासाठी आवश्यक तंत्रही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडे नसल्याचे उघड झाले.

यंदाच्या मालिकेतील दोन सामन्यांत काय घडले?

भारतात कसोटी मालिका जिंकणे हे आमच्यासाठी ॲशेस जिंकण्यापेक्षाही मोठे असेल, असे ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू यंदाची मालिका सुरू होण्यापूर्वी म्हणाले होते. त्यांनी या मालिकेसाठी बराच सरावही केला होता. ऑस्ट्रेलियात भारताप्रमाणे खेळपट्टी तयार करून, तसेच भारतात आल्यावर ऑस्ट्रेलियन संघाची सराव शिबिरे झाली. मात्र, प्रत्यक्षात सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. डावखुरा फिरकीपटू जडेजा आणि ऑफ-स्पिनर अश्विन या भारताच्या फिरकी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना निष्प्रभ केले.

हेही वाचा : विश्लेषण : ऑस्ट्रेलिया संघाचे नेमके काय चुकले? का होतीये त्यांची इतकी खराब कामगिरी?

ऑस्ट्रेलियन फलंदाज धावा करण्यासाठी ‘स्वीप’ आणि ‘रिव्हर्स स्वीप’चा फटका अधिकाधिक मारता दिसले. मात्र, याचीच त्यांना किंमत मोजावी लागली. त्यांचे बहुतांश फलंदाज त्रिफळाचीत किंवा पायचीत झाले. तसेच ऑस्ट्रेलियाने संघ निवडीतही काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. पहिल्या कसोटीसाठी लयीत असलेल्या ट्रॅव्हिड हेडला वगळण्यात आले. तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाज आणि केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला. त्यामुळे दोन्ही सामन्यांत एक-दोन सत्र वगळता भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. भारताने नागपूर येथे झालेला पहिला सामना एक डाव आणि १३२ धावांनी, तर दिल्ली येथे झालेला दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला.