उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जोशीमठ शहरात ७०० हून अधिक घरं, दुकानं, हॉटेलांना मोठमोठ्या भेगा पडत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना आपली घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे १९७६ पासूनच या भागात अशाप्रकारच्या घटनाक्रमांचे इशारे देण्यात आले होते. चार दशकांपूर्वी दिलेला इशारा नेमका काय होता? जोशीमठातील घरं,दुकानं आणि इतर इमारतींना भेगा का जात आहेत? या परिस्थितीत उत्तराखंड नेमक्या काय उपाययोजना करत आहे? आणि यावर नागरिकांचा नेमका काय प्रतिसाद आहे या सर्व प्रश्नांचा हा आढावा…

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठातील घरांना भेगा पडल्यानंतर शुक्रवारी (६ जानेवारी) भूस्खलन झालेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती दलाला (NDRF) तैनात करण्याचे आदेश दिले. एनडीआरएफचे कर्मचारी जोशीमठातील भेगा पडलेल्या घरांची पाहणी करत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीप्रमाणे जोशीमठातील ७०० हून अधिक घरांना तडे गेले आहेत. घरंच नाही, तर रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

जोशीमठातील भूस्खलनावर स्थानिक नागरिकांचं म्हणणं काय?

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ शहरात घरांना तडे जाण्याला स्थानिक नागरिकांनी या परिसरात सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्प आणि भूगर्भातील बांधकामे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घरांचं नुकसान झालं आहे अशा नागरिकांसाठी शहरात पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मंत्रालय सचिवालयात याबाबत एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली आहे.

जमिनीखालील एनटीपीसी बोगद्याच्या चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी (७ जानेवारी) जोशीमठाचा दौरा केला. यात त्यांनी घरांचं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. ठिकठिकाणी घरांना भेगा का पडल्या याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली आहे. या पथकाने तपास सुरू केला आहे. एनटीपीसीच्या पॉवर प्रोजेक्टबरोबर जोशीमठ शहराखाली तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं कामही बंद करण्यात आलं आहे. तसेच एनटीपीसी बोगद्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

विकासकामांमुळे शहर उद्ध्वस्त?

जोशीमठातील लोकांनी शहरातील घरांना भेगा पडण्याला बोगदा आणि त्याच्याशी संबंधित योजना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच घरांना तडे गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूगर्भातील बोगदे, बेकायदेशीर बांधकामं आणि विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेली बांधकामं यामुळे जोशीमठ उद्ध्वस्त झालं, असा आरोप हे स्थानिक नागरिक करत आहेत.

जोशीमठाचं महत्त्व काय?

जोशीमठ शहर देशातील पुरातन शहरांपैकी एक आहे. हे शहर ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर आहे. बद्रीनाथ, ओली आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या पर्यटकांना निवाऱ्यासाठी हे सोयीचं ठिकाण आहे. पर्यटक रात्री येथे थांबतात. याशिवाय सैन्यासाठीही हे महत्त्वाचं ठिकाण आहे. भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या छावण्यापैकी एक छावणी जोशीमठात आहे.

जोशीमठात भूस्खलन होण्याचं कारण काय?

हे शहर धोलीगंगा आणि अलकनंदा नद्यांच्या संगमावर आहे. २०२२ च्या एका अहवालात जोशीमठाच्या जमिनीवर अधिक भार (वजन) असल्याचं म्हटलं होतं. आता वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे हे वजन वाढून आता मर्यादा संपल्याने या परिसरातील इमारतींना तडे जात आहेत.

हे शहर एका दिवसात उद्ध्वस्त झालं असंही नाही. याबाबत सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या एका आयोगाने पहिला इशारा १९७६ मध्ये दिला होता. या मिश्रा आयोगाने जोशीमठ एका भूस्खलन होणाऱ्या जमिनीवर वसलेलं असल्याचं सांगितलं होतं. मात्र, शास्त्रज्ञ मागील चार दशकांपासून शहर उद्ध्वस्त होत असल्याचं लक्षात आणून देत असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता अनियंत्रित बांधकामांनी शहरच उद्ध्वस्त झालं आहे.

जोशीमठ शहराची अशी अवस्था होण्यामागे त्याचं भौगोलिक स्थान आहे. हे शहर भूस्खलनानंतर तयार झालेल्या प्रदेशावर उभं राहिलं आहे. त्यामुळे या परिसरातील वाढत्या बांधकामांमुळे भूस्खलनाचा धोका नेहमीच होता. बांधकाम, वीजनिर्मिती प्रकल्प याशिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आणि डोंगरही उद्ध्वस्त करण्यात आले. तेथूनच या शहराचा धोका वाढला.

हे शहर वाचवलं जाऊ शकतं का?

या टप्प्यावर जोशीमठ शहर पूर्णपणे वाचवणं अवघड काम आहे. हे शहर भूस्खलनानंतर तयार झालेल्या जमिनीवर वसलं आहे. या जमिनीखाली अस्थिर मोठे दगडं आहेत. ते आता निसटत आहेत. त्यामुळेच हा परिसर भूस्खलन होऊन खाली कोसळू शकतो.

जोशीमठातील जमिनीतून पाणी निघत आहे. रस्त्यांना भेगा पडत आहेत. हा जमीन कमकुवत झाल्याचं लक्षण मानलं जात आहे. त्यामुळेच त्यावर मोठमोठ्या इमारती टिकणं अशक्य आहे. भूजलही जमिनीच्या दिशेने वर येत आहे. यावरून हे शहर अखेरच्या टप्प्यात असल्याचं स्पष्ट होत आहे.