Lohagad Ganesh Darwaza: लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर अलीकडे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका पर्यटकाच्या मृत्यूनंतर हा परिसर चर्चेचा विषय ठरला. सुरुवातीला हा मृत्यू दरीत पडून झालेला अपघात असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र नंतर पोलीस तपासात इतर शक्यतांचाही विचार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. या घटनेचा किल्ल्याशी जोडल्या जाणाऱ्या अलौकिक किंवा भुतांच्या कथांशी कोणताही संबंध नसला, तरी या नव्या चर्चेमुळे लोहगडाशी संबंधित लोककथांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

भुतांच्या कथा आणि आख्यायिका

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उंचावर वसलेला लोहगड किल्ला लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात इथून दिसणारी नाट्यमय निसर्गदृश्ये, शतकानुशतके उभी असलेली तटबंदी आणि मराठा इतिहास यांसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. पण या इतिहासाच्या पलीकडे स्थानिक लोक, गाईड आणि प्रवाशांमध्ये अनेक दशकांपासून फिरत आलेल्या आख्यायिका, भुतांच्या कथा आणि अनुत्तरित रहस्यकथांचाही एक वेगळा पट लोहगडाभोवती तयार झाला आहे.

पश्चिम घाटांच्या कुशीतला पहारेकरी

‘लोहगड’ या नावाचा शब्दशः अर्थ ‘लोखंडी किल्ला’ असा होतो. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ वसलेल्या या किल्ल्याचा इतिहास सुमारे २,००० वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो. या किल्ल्याची सुरुवातीची पायाभरणी सातवाहन काळात झाल्याचे मानले जाते. मात्र इतिहासकारांच्या मते, या डोंगराला प्रारंभीच्या मध्ययुगीन काळात म्हणजे इ.स. १०व्या ते १४व्या शतकादरम्यान तटबंदीचे स्वरूप मिळाले. त्यानंतर वेगवेगळ्या सत्तांनी या किल्ल्याचा विस्तार करून तो अधिक भक्कम केला.

दख्खनी सत्तांचे नियंत्रण

पश्चिम घाटांमधून जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर नजर ठेवण्यासाठी लोहगडाचे स्थान रणनीतिच्या दृष्टिने महत्त्वाचे होते. त्यामुळेच हा किल्ला महत्त्वाचा लष्करी ठाणे मानला जात असे. शतकानुशतके या किल्ल्यावर विविध दख्खनी सत्तांचे नियंत्रण होते. त्यामध्ये निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल सत्तेचाही समावेश होता.

खजिना सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोहगडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. १७व्या शतकात मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि अधिक बळकट केला. मराठ्यांच्या संरक्षण व्यवस्थेत लोहगड हा एक महत्त्वाचा दुवा ठरला. ऐतिहासिक नोंदींनुसार, प्रदेशातील मराठा विजयांनंतर हा किल्ला राज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण आणि प्रशासकीय केंद्र म्हणूनही वापरला जात होता.

प्रसिद्ध विंचूकाटा

पुढे मराठा सत्तेचा ऱ्हास आणि आंग्ल-मराठा युद्धांनंतर लोहगड अखेर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. काळाच्या ओघात त्याचे लष्करी महत्त्व कमी होत गेले; मात्र त्याची अनेक वैशिष्ट्ये आजही टिकून आहेत. आजही लोहगडाला भेट देणारे पर्यटक भक्कम दगडी दरवाजांतून आत प्रवेश करू शकतात, प्राचीन पाण्याच्या टाक्या पाहू शकतात आणि आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये विंचवाच्या शेपटासारखा पसरलेला प्रसिद्ध विंचूकाटा न्याहाळू शकतात.

गणेश दरवाजाची थरारक आख्यायिका

लोहगडाशी जोडल्या गेलेल्या अनेक कथांपैकी गणेश दरवाज्याशी संबंधित कथा सर्वाधिक सांगितली जाते. गणेश दरवाजा हा लोहगडाच्या चार मुख्य दरवाजांपैकी पहिला दरवाजा आहे. स्थानिक लोककथेनुसार, किल्ल्याच्या एका अधिकाऱ्याला स्वप्न पडले होते की, या दरवाज्याचा पाया अस्थिर आहे आणि त्यावर शाप आहे. त्यामुळे दरवाज्याची रचना मजबूत राहावी, यासाठी मानवी बळी देण्याचा सल्ला देण्यात आल्याचे या कथेत सांगितले जाते. या आख्यायिकेनुसार, एका पुरुषाला आणि एका स्त्रीला दरवाज्याच्या पायाखाली जिवंत पुरण्यात आले. मात्र अशी घटना प्रत्यक्षात घडल्याचे सिद्ध करणारा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. तरीही ही कथा आजही स्थानिक गाईड आणि लोहगडाला भेट देणारे कंटेंट क्रिएटर्स सांगताना दिसतात.

Ganesh Darwaja, Lohagad, Maharashtra
लोहगड

स्थानिक समजूत

अलीकडच्या काही वर्षांत ट्रॅव्हल व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील रील्समुळे या कथेला पुन्हा नव्याने प्रसिद्धी मिळाली आहे. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर लियाम रिचर्ड्स यांनी सांगितलेल्या एका अशाच कथनात, पहिल्या दरवाज्याचा पाया मजबूत करण्यासाठी दोन व्यक्तींचा बळी देण्यात आल्याची स्थानिक समजूत मांडली आहे.

मात्र इतिहासकार आणि पुरातत्त्व अभ्यासक या कथेकडे दस्तऐवजीकृत इतिहास म्हणून नव्हे, तर लोककथा म्हणून पाहण्याचा सल्ला देतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांत अशा प्रकारच्या पायाभरणीच्या वेळी मानवी बळी देण्यात आल्याच्या आख्यायिका आढळतात. काळाच्या ओघात त्या जुन्या किल्ल्यांशी, पुलांशी आणि मंदिरांशी जोडल्या जातात. गणेश दरवाज्याच्या परिसराशी संबंधित आणखी एक स्थानिक परंपरा सावळे कुटुंबातील एका व्यक्तीच्या कथित बळीशी जोडली जाते. जवळच्या वस्तीतील काही हक्क आणि विशेषाधिकारांच्या बदल्यात हा बळी दिल्याचे या कथेत सांगितले जाते. आधीच्या कथेसारखीच ही कथाही प्रामुख्याने मौखिक परंपरेतून जिवंत राहिली असून, तिचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत.

भुताटकीच्या आकृत्या आणि अनाकलनीय अनुभव

गणेश दरवाज्याच्या आख्यायिकेपलीकडेही लोहगड अनेक अलौकिक कथांचा विषय ठरला आहे. ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये या किल्ल्याशी जोडलेल्या अनेक भुताटकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. काही जण पहाटेच्या वेळी किल्ल्याच्या तटबंदीवरून चालणाऱ्या सावलीसारख्या आकृत्या दिसल्याचा दावा करतात. तर काहींच्या मते, किल्ल्याच्या काही भागात रहस्यमय व्यक्ती क्षणभर दिसतात आणि नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता अदृश्य होतात.

केवळ सोशल मीडियावरूल चर्चा

यापैकी एक प्रचलित कथा एका पहारेकऱ्यासारख्या दिसणाऱ्या आकृतीशी संबंधित आहे. ऑनलाइन फिरणाऱ्या कथनांनुसार, ही आकृती दूरवर दिसते, प्रवाशांकडे हातवारे करते आणि कोणी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की अचानक गायब झाल्यासारखी वाटते. मात्र या दाव्यांना आधार देणारा कोणताही दस्तऐवजीकृत पुरावा उपलब्ध नाही. अशा बहुतेक कथा वैयक्तिक अनुभव, ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि सोशल मीडियावरील चर्चांमधूनच पुढे आल्या आहेत.

सूर्यास्तानंतर ऐकू येणारे आवाज

लोहगडाशी जोडल्या गेलेल्या लोककथांमधील आणखी एक वारंवार सांगितला जाणारा भाग म्हणजे अंधार पडल्यानंतर ऐकू येणारे विचित्र आवाज. काही पर्यटकांनी किल्ल्याच्या शांत आणि कमी वर्दळीच्या भागांजवळ शिट्ट्यांचे आवाज, दूरवरून येणाऱ्या पावलांचे आवाज किंवा स्पष्टीकरण न देता येणारे काही आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा कथा अधिक ऐकायला मिळतात. कारण त्या काळात धुके, जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण संपूर्ण किल्ल्याला वेढून टाकते. मात्र संशयवादी लोकांच्या मते, किल्ल्याची रचना, बदलते हवामान आणि डोंगरातील वारे यांमुळे असे अनोखे ध्वनी-परिणाम सहज निर्माण होऊ शकतात.

गुप्त बोगदे आणि गाडलेला खजिना

भारतातील अनेक प्राचीन किल्ल्यांप्रमाणेच लोहगडाशीही गुप्त मार्ग आणि लपवलेल्या खजिन्याच्या अफवा जोडल्या गेल्या आहेत. स्थानिक आख्यायिकांनुसार, एकेकाळी किल्ल्याचे काही भाग आजूबाजूच्या परिसराशी भूमिगत बोगद्यांद्वारे जोडलेले होते. वेढा पडल्यास राजे, सरदार किंवा सैनिकांना पळून जाण्यासाठी हे मार्ग वापरले जात असावेत, असे सांगितले जाते.

लपवलेला मौल्यवान खजिना?

काही कथांमध्ये तर लष्करी मोहिमांमधून मिळालेला मौल्यवान खजिना किल्ल्याच्या दगडी भिंतींच्या आत कुठेतरी लपवून ठेवण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही ठोस पुरावा आजवर समोर आलेला नाही. तरीही या कथा लोहगडाच्या अवशेषांमध्ये फिरणाऱ्या पर्यटकांच्या कुतूहलाला सतत खतपाणी घालत राहतात.