Mahakumbh Mela 2025: भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा हा सोहळा देशाचा सांस्कृतिक परिचय ठरला आहे. १९५४ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक घटनेवर एका भयानक चेंगराचेंगरीचे सावट आले, त्यात शेकडो भाविकांचे प्राण गेले. या घटनेने देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाचे धडे दिले, जे पुढील महाकुंभांच्या आयोजनासाठी उपयुक्त ठरले.

महाकुंभमेळ्याचा पारंपरिक इतिहास

महाकुंभमेळ्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. प्रत्येक १२ वर्षांनी चार पवित्र ठिकाणी (प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक) हा मेळा भरतो. या मेळ्याला हिंदू धर्मात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे.

devendra fadnavis pimpri chinchwad news in marathi
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Narendra Modi Mahakumbh
MahaKumbh Mela 2025 : हातात रुद्राक्षांच्या माळा अन् नामस्मरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
कुंभ मेळा  (Express archive photo)

१९५४ चा महाकुंभ: एक ऐतिहासिक पर्व

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशातील पहिला महाकुंभ मेळा १९५४ मध्ये आयोजित करण्यात आला. या मेळ्याचे खास आकर्षण म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची संधी. लाखो लोकांनी या संधीचा लाभ घेतला. परंतु, यावेळी व्यवस्थापनातील त्रुटी आणि काही महत्त्वाच्या घटना यामुळे महाकुंभावर परिणाम झाला.

अधिक वाचा: Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?

मेळ्याच्या आयोजनाची तयारी

महाकुंभाच्या आयोजनासाठी प्रयागराजमध्ये एका तात्पुरत्या शहराची उभारणी करण्यात आली. या नगरीला कुंभनगरी असे नाव देण्यात आले. १,३०० एकरांवर विस्तारलेली ही नगरी अनेक विभागांमध्ये विभागली होती. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. प्रयागराजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे. एन. उग्रा यांनी कुंभनगरीचे व्यवस्थापन सांभाळले, तर वरिष्ठ पोलीस अधीक्षक जे. पी. त्रिपाठी यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. तरीदेखील, १९५४च्या कुंभासाठी तयारी उशिरा सुरू झाल्याचा उल्लेख चौकशी अहवालात सापडतो. सप्टेंबर १९५३ पर्यंत योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात अद्याप ठोस काही ठरले नव्हते. मात्र, उर्वरित वेळेत जलदगतीने काम करण्यात आले.

कुंभ मेळा (Express archive photo)

धार्मिक महत्त्व आणि भक्तांची उत्सुकता

१९५४ चा महाकुंभमेळा हा धार्मिकदृष्ट्या खास होता. त्या वर्षी मकरसंक्रांती, पौष पौर्णिमा, अमावस्या, महाशिवरात्री, आणि सप्तस्नानाचे (सात पवित्र स्नानाचे) शुभयोग येत होते. याशिवाय, १०८ वर्षांनंतर शर्वण नक्षत्राचा योग जुळून आला होता. या सर्व कारणांमुळे भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली होती.

आरोग्यविषयक उपाययोजना आणि अडथळे

कॉलराच्या साथीचा धोका लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने कुंभनगरीच्या परिसरात कडक आरोग्य नियम लागू केले. लस न घेतलेल्या (अनवॅक्सिनेटेड) व्यक्तींना मेळ्यात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. शहराच्या बाहेर लसीकरण केंद्रे उभारण्यात आली, त्यात सुमारे ५०० पोलीस तैनात होते. परंतु, या उपाययोजनांमुळे भक्तांमध्ये रोष निर्माण झाला. परिणामी, २६ जानेवारी रोजी ही केंद्रे बंद करण्यात आली.

 कुंभ मेळा (Express archive photo)

३ फेब्रुवारी १९५४: चेंगराचेंगरीचा काळा दिवस

अमावस्येच्या दिवशी ३ फेब्रुवारी १९५४ रोजी संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भक्त जमले होते. त्या दिवशी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर व्हीआयपी व्यक्तींनी संगमाला भेट दिली होती. व्हीआयपींच्या आगमनामुळे झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सकाळी ९ वाजता चेंगराचेंगरी सुरू झाली. स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुले यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. अपुऱ्या नियोजनामुळे हजारो लोकांचे हाल झाले. यामुळे शेकडो भविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक वाचा: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?

प्रशासनावर टीका

चेंगराचेंगरीच्या घटनेने देशभरात खळबळ माजली. संसद आणि उत्तर प्रदेश विधानसभेत या घटनेवर चर्चा झाली. विरोधकांनी प्रशासनावर व्यवस्थापनातील अपयशाचा आरोप केला. पंतप्रधान नेहरूंनीही या घटनेसाठी दु:ख व्यक्त केले. लोकसभेत बोलताना पंतप्रधान नेहरू म्हणाले, “अशा प्रचंड जमावाच्या वेळी अशी घटना घडणे अत्यंत दुःखद आहे.”

चौकशी समितीचा अहवाल

न्यायमूर्ती कमलकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने या घटनेचा अहवाल सादर केला. अहवालात प्रशासनाच्या तयारीतील उणीवा स्पष्टपणे मांडल्या, त्यातील महत्त्वाच्या उणीवा याप्रमाणे:

  1. गर्दी व्यवस्थापनाचे अपयश.
  2. व्हीआयपींच्या भेटींसाठी सुरक्षित व्यवस्था योग्य पद्धतीने आखली गेली नाही.
  3. पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी.
 कुंभ मेळा (Express archive photo)

घटनेनंतरचे बदल

१९५४ च्या महाकुंभातील चुकांमुळे पुढील महाकुंभांसाठी प्रशासनाने अनेक सुधारणा केल्या. त्यातील प्रमुख बदल याप्रमाणे:

  1. गर्दी व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग.
  2. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा तयार करणे.
  3. अधिक प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची नेमणूक.
 कुंभ मेळा (Express archive photo)

नवीन महाकुंभ: एक आदर्श

१९५४ च्या घटनेनंतरच्या कुंभमेळ्यांमध्ये आधुनिक यंत्रणा, योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर दिसून आला. सार्वजनिक सुरक्षितता आणि भक्तांच्या सोयीसाठी अधिक चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी, महाकुंभ केवळ धार्मिक मेळा न राहता व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल ठरले.

१९५४ च्या महाकुंभाने स्वतंत्र भारताला एक महत्त्वाचा अनुभव दिला. ही घटना दु:खद होती, तरी त्यातून शिकलेल्या धड्यांमुळे आजचे कुंभमेळे अधिक सुयोजित आणि सुरक्षित झाले आहेत. श्रद्धा, भक्ती आणि व्यवस्थापनाचा सुंदर मिलाफ म्हणून महाकुंभ आजही भारताची ओळख आहे

Story img Loader