Mahatma Gandhi vs Ravindranath Tagore-Cult of the Charkha: महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर ही भारतीय इतिहासातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वं आहेत. १९१४-१५ या कालखंडात सुरू झालेली त्यांची मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकली. पण ही मैत्री केवळ ‘हो’ ला ‘हो’ करणारी नव्हती. राजकीय विचार असोत, सामाजिक जाणिवा किंवा आर्थिक प्रश्न, अशा अनेक मुद्द्यांवर या दोन महापुरुषांमध्ये टोकाचे आणि गंभीर मतभेद होते.

कापसाचं वाटोळं करून बसेन

१९२१ (सप्टेंबर) साली महात्मा गांधीं कलकत्त्याच्या (आताचे कोलकाता) दौर्‍यावर होते. यावेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांशी त्यांची भेट झाली. त्यावेळी गांधीजींच्या हातातलं सूत आणि चरख्याचा आग्रह पाहून टागोर मिश्किलपणे म्हणाले, “गांधीजी, मी शब्दांची गुंफण करू शकतो, कविता आणि नाटक विणू शकतो; पण तुमच्या या अमूल्य कापसाचं काय करायचं हे मात्र मला ठाऊक नाही. त्याचं तर मी अक्षरशः वाटोळं करून बसेन!”

मतभेदांचे सर्वात मोठे प्रतीक: चरखा

या दोन महापुरुषांमधील वैचारिक संघर्षाचे आणि सखोल तात्त्विक मतभेदांचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे ‘चरखा’. प्रत्येक भारतीयाने सूत कातलेच पाहिजे, या गांधीजींच्या आग्रही भूमिकेशी टागोर कधीच सहमत होऊ शकले नाहीत. किंबहुना, या विचारापासून ते कायम लांबच राहिले.

दुसरीकडे, गांधीजी मात्र आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम होते. त्यांच्या दृष्टीने सूत कातणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नव्हती, तर त्याला एक सखोल नैतिक अधिष्ठान आणि प्रबळ प्रतीकात्मक महत्त्व होते. याच मुद्द्यावरून या दोन मित्रांमध्ये विचारांच्या दोन वेगळ्या दिशा स्पष्टपणे दिसत होत्या.

अटळ संघर्ष

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकदा या दोन महापुरुषांविषयी अतिशय मार्मिक निरीक्षण नोंदवले होते. ते म्हणाले होते, “गांधी आणि टागोर यांच्याइतकी टोकाची भिन्न व्यक्तिमत्त्वं कदाचित दुसरी कोणतीच नसावीत!” त्यांच्यात परस्परांविषयी अपार आदर आणि गाढ मैत्री असली, तरी त्यांच्यातील हा वैचारिक संघर्ष जणू अटळच होता.

संघर्षाची पहिली ठिणगी

१९१५ साली दक्षिण आफ्रिकेतील लढा संपवून गांधीजी मायदेशी परतले होते. त्याच वेळी गांधीजी आणि टागोर यांच्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडली. गांधीजी शांतिनिकेतनमध्ये गेले होते. तिथे वास्तव्यास असताना राष्ट्रवाद, शिक्षण पद्धती आणि सक्रिय राजकारण अशा अनेक विषयांवर दोघांचे विचार एकमेकांपासून वेगळे असल्याचे स्पष्ट झाले.

असहकार चळवळ ते ‘नाइटहूड’ किताब परत करणे

पुढच्या काळात, अमृतसर येथील भीषण हत्याकांडानंतर गांधीजींनी ‘असहकार चळवळ’ पुकारली, त्यावेळी या दोन मित्रांमधील वैचारिक दरी अधिकच रुंदावली. अशा जनआंदोलनांमुळे देशात ‘आंधळा राष्ट्रवाद’ फोफावेल, अशी रास्त भीती टागोरांना वाटत होती. टागोरांचा निषेध करण्याचा मार्गही वेगळा होता; त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी आपला ‘नाइटहूड’ किताब परत केला, पण ते गांधीजींच्या सामूहिक आंदोलनाच्या मार्गाशी पूर्णतः सहमत होऊ शकले नाहीत.

गांधीजींच्या तुलनेत अधिक निर्भीड आणि स्पष्टवक्ते

गंगेय मुखर्जी यांनी त्यांच्या ‘गांधी अँड टागोर: पॉलिटिक्स, ट्रुथ अँड कॉन्शन्स’ (२०१६) या पुस्तकात एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. अनेक चरित्रकारांच्या मते, टागोर हे गांधीजींच्या तुलनेत अधिक निर्भीड आणि स्पष्टवक्ते होते. ब्रिटीश सरकारची कडक दडपशाही सुरू असताना आणि ‘डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट’नुसार शिक्षेची टांगती तलवार असतानाही, टागोरांनी अत्यंत धाडसाने आपली सार्वजनिक निवेदने प्रसिद्ध केली. १९२१ च्या सुमारास या दोन महापुरुषांमधील वैचारिक मतभेद त्यांच्या भाषणांतून, निबंधांतून आणि पत्रांमधून उघडपणे समाजासमोर येऊ लागले.

तर्कनिष्ठ टागोर

या मतभेदाचे एक उदाहरण १९३४ साली पाहायला मिळाले. बिहारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर गांधीजींनी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या मते, हा भूकंप म्हणजे “उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांविरुद्ध (हरिजनांविरुद्ध) केलेल्या पापासाठी ईश्वराने दिलेली शिक्षा” होती. मात्र, टागोरांना गांधीजींचा हा तर्क अजिबात पटला नाही. नैसर्गिक आपत्तीला अशा प्रकारे अंधश्रद्धेशी किंवा मानवी कर्माशी जोडणे टागोरांच्या वैज्ञानिक आणि मानवतावादी विचारांना मान्य नव्हते आणि त्यांनी तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले.

टागोरांचा तर्कवाद

गांधीजींच्या त्या विधानावर टागोरांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला निषेध नोंदवला. त्यांनी गांधीजींना पत्राद्वारे कळवले (आणि नंतर ते जाहीरपणे प्रसिद्धही केले) की, “जर आपण मानवी नैतिकतेचा संबंध विश्वातील नैसर्गिक घटनांशी जोडू लागलो, तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की मानवी स्वभाव हा ईश्वरी व्यवस्थेपेक्षाही नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे…” टागोरांचा रोख स्पष्ट होता, नैसर्गिक आपत्तीला ‘पापाची शिक्षा’ म्हणणे हे तर्कहीन आहे.

द महात्मा अँड द पोएट

प्रसिद्ध इतिहासकार सब्यसाची भट्टाचार्य यांनी त्यांच्या ‘द महात्मा अँड द पोएट’ (१९९७) या पुस्तकात या वैचारिक संघर्षाचे नेमके विश्लेषण केले आहे. ते लिहितात, “गांधी आणि टागोर यांच्यात अनेक मूलभूत तात्त्विक प्रश्नांवरून मतभेद होते आणि याच मतभेदांतून पुढे राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक मुद्द्यांवर मोठे वाद निर्माण झाले.”

तरीही मैत्री कायम

विशेष म्हणजे, या दोघांमधील हे वादविवाद कमालीचे धारदार होते. त्यांनी आपले विचार मांडताना कुठेही शब्दांची जुळवाजुळव किंवा तडजोड केली नाही. या दीर्घकाळ चाललेल्या संवादाचे मर्म सांगताना भट्टाचार्य पुढे म्हणतात, “या वैचारिक युद्धात दोघांनीही आपली ठाम मते मांडली; मात्र प्रत्यक्षात एकमेकांचे मतपरिवर्तन करण्यात किंवा एकमेकांना स्वतःच्या विचारांकडे वळवण्यात दोघांपैकी कोणालाही विशेष यश आले नाही.” तरीही, या दोन महापुरुषांमध्ये मैत्री कायम राहिली.

रवींद्रनाथ टागोर: द मिरॅड-माइंडेड मॅन

कृष्णा दत्ता आणि अँड्र्यू रॉबिन्सन यांनी त्यांच्या ‘रवींद्रनाथ टागोर: द मिरॅड-माइंडेड मॅन’ (१९९६) या पुस्तकात गांधी आणि टागोर यांच्यातील वैचारिक द्वैताचे वर्णन केले आहे. ते या दोन महापुरुषांमधील संघर्षाला विविध छटांमध्ये मांडताना म्हणतात;

“हा संघर्ष दोन वेगवेगळ्या विचारधारांचा होता. एका बाजूला सौंदर्याची पूजा करणारा कलाकार होता, तर दुसऱ्या बाजूला संन्यासी वृत्तीचा तपस्वी. एकाला कलेत रस होता, तर दुसऱ्याला ती गोष्ट सामान्यांच्या किती उपयोगाची आहे यात रस होता. ही लढाई होती एका कल्पक विचारवंताची आणि मैदानात उतरून काम करणाऱ्या योद्ध्याची.

जागतिक माणूस विरुद्ध प्रखर राष्ट्रवादी

एकीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याला जपणारं थोर व्यक्तिमत्त्व होतं, तर दुसरीकडे डावपेच आखणारा मुरब्बी राजकारणी. एकीकडे उच्च अभिरुची असलेले विद्वान टागोर होते, तर दुसरीकडे जनतेशी नातं जोडलेले लोकनेते गांधीजी. थोडक्यात सांगायचं तर, हा वाद संपूर्ण जगाचा विचार करणाऱ्या ‘जागतिक’ माणसाचा आणि आपल्या देशासाठी समर्पित असलेल्या ‘प्रखर राष्ट्रवादी’ नेत्याचा होता.”

आणि या दोघांमधील हा विरोधाभास सर्वात ठळकपणे त्यांच्या बाह्य रूपांतूनही झळकत असे. एकीकडे दाढी आणि अंगावर मऊ तलम पोशाख परिधान केलेले गुरुदेव, तर दुसरीकडे हाताने विणलेला खरबरीत लंगोट नेसलेले आणि टक्कल पडलेले महात्मा!”

चरख्याचा ‘पंथ’ आणि टागोरांची अस्वस्थता

सूतकाताईच्या चळवळीत दडलेला एक प्रकारचा ‘नैतिक सक्ती’चा भाव टागोरांना कमालीचा अस्वस्थ करत होता. काँग्रेसने खादीला (हाताने कातलेल्या कापडाला) ज्या प्रकारे अनिवार्य केले होते, त्याचे स्वरूप टागोरांना एखाद्या ‘पंथा’सारखे वाटू लागले.

१९२४ साली (नोव्हेंबर) गांधीजी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, काँग्रेसच्या सर्व सदस्यांना राजकीय कार्यक्रमांत खादी परिधान करणे अनिवार्य करण्यात आले. इतकेच नव्हे, तर प्रत्येक सदस्याने दरमहा २,००० यार्ड सूत कातून त्याचे योगदान देणेही बंधनकारक करण्यात आले. गांधीजींची अशी धारणा होती की, यामुळे भारत केवळ वस्त्रोद्योगात स्वावलंबी होणार नाही, तर या प्रक्रियेतून कार्यकर्त्यांचे ‘नैतिक परिवर्तन’ही घडेल. परंतु, टागोरांचा या सक्तीला तीव्र विरोध होता. त्यांनी या निर्देशाला “छापील शाईतील धिक्कार” असे संबोधले आणि ‘द मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये ‘द कल्ट ऑफ द चरखा’ (The Cult of the Charkha) हा प्रसिद्ध निबंध लिहून गांधीजींच्या भूमिकेला वैचारिक उत्तर दिले.

बिनशर्त आज्ञापालनाचा धोका

टागोरांना सर्वात जास्त भीती एका गोष्टीची वाटत होती… ती म्हणजे या चळवळीने केलेली ‘बिनशर्त आज्ञापालनाची’ मागणी. त्यांच्या मते, चरख्याभोवती निर्माण झालेला हा अवास्तव उत्साह म्हणजे भारतीय जनतेची एक विशिष्ट प्रवृत्ती होती. जेव्हा एखादी थोर, पूजनीय व्यक्ती राष्ट्राच्या कठीण ध्येयांकडे जाण्याचा एखादा ‘सोपा मार्ग’ सांगते, तेव्हा लोक विचार न करता त्या आदेशांना शरण जातात. गंगेय मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, टागोरांना भीती होती की, मानवी स्वभावातील आणि निवडीतील नैसर्गिक विविधतेचा बळी देऊन सर्वांना “एकाच साच्यात किंवा एकसारखेपणाच्या गोळ्यात मळले जात आहे.”

श्रमाचे स्वरूप आणि मूळ उद्देश

टागोरांच्या मते, चरख्याचा मूळ आणि उदात्त उद्देश हा गरिबांना वस्त्रासारखी मूलभूत गरज पूर्ण करण्यास मदत करणे हा होता. पण आता सूतकाताई हा केवळ एक ‘विधी’ ठरला होता. या कामातील एकाच प्रकारच्या यांत्रिक कामामुळे माणसाचे “मन नव्हे, तर केवळ स्नायू गुंतले जातात,” असे त्यांचे मत होते.

टागोरांनी आपल्या निबंधात परखडपणे लिहिले की, “ज्या कामात केवळ यांत्रिक पुनरावृत्ती असते, अशा कामाकडे प्रत्येक देशातील माणसाने नेहमीच कमीपणाने पाहिले आहे, कारण त्यात बुद्धीला वाव नसतो.” थोडक्यात, टागोरांना चरखा हा स्वातंत्र्याचा मार्ग न वाटता, तो विचारांच्या गुलामगिरीकडे नेणारा मार्ग वाटत होता.

विज्ञान, राष्ट्रवाद आणि हस्तिदंती मनोरा

भारताने आधुनिक जगापासून स्वतःला तोडून एकाकी पाडावे, ही कल्पना टागोरांना कधीच मान्य नव्हती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्याग करणे म्हणजे देशाला प्रगतीऐवजी दारिद्र्याच्या खाईत लोटणे आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या निबंधांमधून स्पार्टा आणि अथेन्स या दोन संस्कृतींची तुलना केली. टागोरांच्या मते, स्पार्टाने स्वतःला एका संकुचित ध्येयापुरते मर्यादित ठेवले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला; याउलट, अथेन्सने ज्ञानाची सर्व दारे उघडी ठेवून परिपूर्णतेचा ध्यास घेतला, म्हणूनच ती संस्कृती बहरली.

द पोएट अँड द चरखा

गांधीजींनी या टीकेला १९२५ (नोव्हेंबर) साली ‘द पोएट अँड द चरखा’ या लेखाद्वारे उत्तर दिले. टागोरांच्या लेखणीतून व्यक्त झालेली अस्वस्थता मान्य करत असतानाच गांधीजींनी चरख्याचे समर्थन केले. ते मिश्किलपणे म्हणाले, “कवीची ही टीका म्हणजे केवळ त्यांच्या ‘काव्यात्मक स्वातंत्र्याचा’ एक भाग आहे; जो कोणी या टीकेला शब्दशः अर्थाने घेईल, तो स्वतःच अडचणीत पडेल.”

इतक्यावरच न थांबता, गांधीजींनी टागोरांवर ते वास्तवापासून दूर ‘हस्तिदंती मनोऱ्यात’ (Ivory Tower) राहत असल्याचा पलटवार केला. गांधीजी लिहितात, “कवींनी जर दररोज केवळ अर्धा तास सूत कातले, तर त्यांच्या कविता अधिक समृद्ध होईल. कारण, तेव्हा त्यांची कविता आजच्या तुलनेत गरिबांच्या वेदना आणि त्यांच्या गरजा अधिक प्रभावीपणे मांडू शकेल.”

गांधीजींचा यंत्रांना विरोध नव्हता, पण यंत्रांनी माणसाच्या हातातील काम हिरावून घेऊ नये, असे त्यांना वाटे. त्यांच्या दृष्टीने चरखा हा केवळ सूत कातण्याचे साधन नव्हता, तर तो शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारा, लोकांमध्ये सहकार्याची भावना रुजवणारा आणि आर्थिकसोबतच नैतिक क्रांती घडवणारा एक विचार होता.

एक अस्वस्थ करणारा मतभेद

मानवी जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे एक साधन म्हणून टागोरांचा चरख्याला कधीच विरोध नव्हता. उलट, स्वदेशीचा एक भाग म्हणून त्यांनी त्याचे स्वागतच केले असते; पण त्यांना खरी अस्वस्थता एका वेगळ्या गोष्टीमुळे वाटत होती. गांधीजींच्या राजकीय आणि नैतिक विचारप्रणालीत चरख्याला जे ‘अतोनात आणि केंद्रस्थानी’ महत्त्व प्राप्त झाले होते, ते टागोरांना पटणारे नव्हते. चरख्याला केवळ एक आर्थिक साधन न ठेवता, त्याला एका आध्यात्मिक आणि राजकीय मुक्तीचे एकमेव प्रतीक बनवणे टागोरांच्या स्वतंत्र विचारांना संकुचित वाटत होते.

विशेष म्हणजे, टागोरांनी हा आपला विरोध अतिशय जड अंतःकरणाने आणि अनिच्छेने व्यक्त केला होता. गांधीजींबद्दल त्यांना वाटणारा आदर इतका थोर होता की, त्यांच्यावर टीका करताना टागोरांची द्विधा मनःस्थिती होत असे. त्यांनी स्वतः हे मान्य केले होते की, “कोणत्याही तत्त्वावर किंवा कार्यपद्धतीवर महात्मा गांधींशी मतभेद व्यक्त करणे, हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि अप्रिय आहे. जरी वैचारिक दृष्टिकोनातून असा मतभेद असणे चुकीचे नसले, तरी माझे मन गांधीजींच्या विरोधात उभे राहताना कायम आढेवेढे घेते.”

हा केवळ दोन विचारांचा संघर्ष नव्हता, तर एका थोर मित्राने दुसऱ्या थोर मित्राच्या मार्गाबद्दल व्यक्त केलेली ती एक ‘प्रेमळ काळजी’ होती.