– सुशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जलद प्रवासाचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. उपलब्ध असलेल्या दोनच धीम्या मार्गिका आणि पनवेलपर्यंत होणारा ७५ मिनिटांचा प्रवासामुळे दिवसभर काम करून थकलेल्या सर्वसामान्यांची दमछाक थांबलेली नाही. मध्य व पश्चिम रेल्वेवर धीम्याबरोबरच जलद गाड्या सुरू झाल्या आणि त्यामुळे प्रवास वेगवान झालाच, शिवाय फेऱ्याही वाढल्या. मात्र त्या तुलनेने हार्बरची जलद सेवा रखडलेलीच आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर उन्नत जलद मार्गिका सुरू करून अवघ्या ४५ मिनिटांत प्रवास घडवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. ते अद्यापही सत्यात उतरले नाही. उलट नव्याने बांधण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गिकांमुळे हार्बरचे जलद मार्गिकेचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

हार्बरसाठी उन्नत जलद मार्गिका कशासाठी?

मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धीम्या मार्गिका आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यांच्या गरज पाहता या मार्गावर धीम्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ केली जात आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर जलद मार्गिका उपलब्ध असतानाच गेली अनेक वर्षे सीएसएमटी ते पनवेल मार्गावर जलद मार्गिका होऊ शकलेली नाही. त्यामुळे या मार्गावर जलद लोकल चालवण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली. त्यानुसार सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाचा प्रस्ताव तयार करून तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. या प्रकल्पाला २००९- १० साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आणि त्यामुळे हार्बरलाही जलद लोकल मिळणार, अशी आशा निर्माण झाली. सीएसएमटी ते पनवेल हे साधारण ४९ किलोमीटर अंतर असून लोकल प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. उन्नत जलद मार्गिका झाल्यास हाच प्रवास ४५ मिनिटांत होईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते.

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गिका आहे तरी काय?

प्रकल्पात ११ स्थानके येणार असून सीएसएमटी ते पनवेल असा धिम्या मार्गावर ७५ मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांत होईल. उन्नत मार्ग बांधताना केवळ ३० टक्के भाग सध्याच्या हार्बर मार्गावरून जाईल, तर प्रकल्पातील अन्य मार्गासाठी जमीन संपादन करावी लागेल. त्यासाठी रेल्वेबरोबरच राज्य सरकार आणि सिडकोचे सहकार्य मिळणार होते. उन्नत मार्ग वाशी खाडीवरूनही जाणार असल्याने त्यासाठी पूल उभारण्याचे नियोजन होते. हा मार्ग मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडतानाच मेट्रोलाही जोडण्याचे नियोजन केले. मानखुर्द येथे प्रस्तावित मेट्रो मार्गाशी, तसेच नेरूळ येथेदेखील मेट्रोशी जोडणी देण्यात येईल. ११ हजार कोटीच्या या प्रकल्पात १२६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष मार्गिका बांधली जाणार होती. पनवेलसाठी दर तीन मिनिटाला तर विमानतळासाठी दर ८.६ मिनिटाला एक ट्रेन सोडण्याची योजना होती.

प्रकल्प का रखडला?

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरही त्यात वारंवार बदल होत होते. या प्रकल्पावर काम करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) त्याचा नव्याने प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर २०१६ साली त्याला मंजुरी मिळाली. प्रकल्पाला आणखी गती मिळावी यासाठी स्वतंत्र मंजुरी घेऊन आणखी विलंब करण्यापेक्षा त्याचा एमयूटीपी ३ ए मध्ये समावेश केला आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली. प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी आवश्यक असल्याने एमयुटीपी ३ ए ला मार्च २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. परंतु यातील सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गिकेचा फेरआढावा घेण्याच्या सूचना एमआरव्हीसीला केल्या आणि त्यातच प्रकल्प अडकला.

मेट्रो रेल्वेचा उन्नत मार्गिकेला फटका कसा?

उन्नत जलद मार्गिका मंजुरीच्या फेऱ्यात अडकली असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिली आणि त्यानंतर प्रकल्प आणखीनच रखडला. मेट्रोचे सुरू असलेले प्रकल्प व भविष्यात होणारे प्रकल्प, तसेच ट्रान्स हार्बर लिंक रोड इत्यादीमुळे उन्नत मार्ग कितपत फायदेशीर होऊ शकतो याचा आढावा घेण्याची सूचना देण्यात आली होती. डी एन नगर ते मंडाले मेट्रो २ बी मार्ग होत असून हा मार्ग कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, मानखुर्द येथून जाणार आहे. या मार्गामुळे रेल्वेची उन्नत मार्गिका फायदेशीर ठरणार नाही, हार्बरवरील रेल्वे प्रवासी कमी होतील आणि प्रकल्पावर खर्च होणारे हजारो कोटी रुपये बुडतील, असा अंदाज रेल्वेकडून वर्तवण्यात आला आणि त्यानंतर प्रकल्प पुढे सरकलाच नाही.

पर्यायांचा विचार का नाही?

उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून अनेक पर्यायही पुढे आले, मात्र ते कागदावरच राहिले. सीएसएमटीऐवजी बरेचसे प्रवासी वडाळा स्थानकातच उतरतात आणि त्यानंतर लोकल पुढे रिकाम्याच जातात. सीएसएमटीऐवजी वडाळा स्थानकापासून पुढे डाऊनला जाण्यासाठीच प्रवासी लोकल गाड्यांना गर्दी करत असल्याचा दावा एमआरव्हीसीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटीऐवजी वडाळा किंवा अन्य स्थानकातून पुढे पनवेलपर्यंत उन्नत मार्गिका नेणे योग्य ठरेल का हेदेखील तपासण्यात आले. परंतु त्यानंतर हा पर्यायही मागे पडला. उन्नत मार्गिका झाल्यास त्यावर हजारो कोटी रुपये रेल्वे व राज्य सरकारकडून खर्च होणार असल्याने एका खासगी कंपनीने मार्गिका बनवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला. त्यावरही विचार झाला नाही. आजपर्यंत प्रस्ताव पडून आहे. परिणामी मेट्रो मार्गिकांमुळे उन्नत जलद मार्ग बाजूला ठेवत असल्याचे एमआरव्हीसीला जाहीर करावे लागले आहे.

चर्चगेट ते विरार उन्नत मार्गिकाही बासनात?

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार उन्नत मार्ग साकारण्याची चर्चा साधारण बारा ते तेरा वर्षापासून सुरू होती. ही मार्गिका तयार करण्यासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च होणार होते. चर्चगेट ते विरार उन्नत मार्गाला समांतरच मेट्रो ३ कुलाबा, वांद्रे, सिप्झ प्रकल्प होत आहे, उन्नत मार्गिकेसाठी जागाही नसल्याने या प्रकल्पाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्प पूर्णत: न राबवता, वांद्रे ते विरार किंवा अंधेरी ते विरार असा राबवण्याचा पर्याय पुढे आला. मात्र त्यानंतर याचा विचार झाला नाही. येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमुळे उन्नत मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल का, या विवंचनेत असणाऱ्या रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील उन्नत मार्गिका प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local harbour line fast train print exp 0322 scsg
First published on: 29-03-2022 at 08:59 IST