-सुशांत मोरे

मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत वाहनतळांवर पुरेशी जागा नसल्याने वाहनतळाची समस्याही गंभीर रूप धारण करत आहे. रहिवासी इमारतीत वाहनतळाची जागा अपुरी पडत असल्याने रस्त्यावर वाहने उभी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातच  वाहने घेऊन खरेदीसाठी बाहेर पडणारे, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना वाहन तळ उपलब्ध होत नसल्यानेही रस्त्यावर एका बाजूला अनधिकृतपणे वाहन उभे करावे लागते किंवा पालिकेने उपलब्ध केलेल्या वाहन तळांचा वापर करावा लागतो. मात्र तेही अपुरे पडतात. हेच हेरून तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या आगारातील मोकळ्या जागेत खासगी वाहनांसाठी वाहनतळाची जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्याला अद्याप अल्प प्रतिसाद असला तरीही अधिकाधिक खासगी वाहनधारकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल अ‍ॅपवर आधारित वॅले पार्किंग सुविधा बेस्टने सुरू केली आहे. त्यानुसार वाहनधारकांना आगार किंवा बस स्थानकातील रिकामी जागा वाहन उभी करण्यासाठी आगाऊ आरक्षित करता येणार आहे. या योजनेचा आढावा…

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…

मुंबईत वाहनतळाची समस्या कायम का आहे? 

राज्यासह मुंबईतही वाहनांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. करोनाकाळात काही प्रमाणात नवीन वाहन नोंदणी घटली होती. मात्र त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दुचाकी, चार चाकींबरोबरच अन्य व्यावसायिक वाहनांची खरेदीही वाढली आहे. सध्या मुंबईत ४३ लाख वाहने आहेत. यामध्ये खासगी चारचाकी वाहनांची संख्या १२ लाख असून २५ लाख दुचाकी आहेत तर सहा लाख अन्य वाहने आहेत. २०११-१२ पासून मुंबईतील वाहन संख्येत ९४ टक्के वाढ झाली आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि वाहनतळाची समस्याही वाढत आहे. सोसायटी, कार्यालये, दुकाने इत्यादींसमोरील रस्त्यावर वाहनतळ  नसतानाही अनेक जण वाहने उभी  करतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावे लागते. त्यावर उपाय म्हणून एक घर, एक वाहन किंवा सोसायटीत वाहनांसाठी जागा उपलब्ध असेल तरच वाहन खरेदी करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मध्यंतरी परिवहन विभागाच्या विचाराधीन होता. मात्र कायद्यातील अडचणी आणि संभाव्य विरोध पाहता तो मागे पडला आणि वाहने उभी करण्याची समस्या कायम राहिली. 

महापालिकेची वाहनतळ योजना कागदावरच? 

मुंबई महापालिकेकडून सध्या वाहनांसाठी काही ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था आहे. मुंबईत महापालिकेचे ‘रस्त्यावरील वाहनतळ’ व ‘रस्त्याव्यतिरिक्त वाहनतळ’ असे प्रामुख्याने दोन प्रकारचे वाहनतळ आहेत. सध्या मुंबई महापालिका क्षेत्रात २९ सार्वजनिक वाहनतळ आहेत. या वाहनतळांची एकूण क्षमता ही साधारपणे ३० हजार वाहनांची आहे. त्याचबरोबरच ९१ ठिकाणी रस्त्यांवरील सशुल्क वाहनतळ आहेत. मात्र हे वाहनतळही अपुरे पडत आहेत. दरवर्षी वाहनसंख्येत दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होत आहे. याशिवाय मुंबईत दररोज ठाणे, वसई-विरार, नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात वाहने येतात. एकंदरीतच मुंबईवर येणारा ताण पाहता वाहनतळांची संख्या आणखी वाढविण्याचे नियोजन मुंबई महापालिकेकडून केले जाणार होते. त्याची आखणीही करण्यात आली. मात्र ती प्रत्यक्षात अमलात आलीच नाही. 

वाहनतळांसाठी बेस्ट आगार, बस स्थानकांचा पर्याय का? 

मुंबईतील वाहतुकीचा खोळंबा कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मुंबई पार्किंग अ‍ॅथॉरिटीच्या माध्यमातून विविध भागांत जास्तीत जास्त वाहनतळाच्या जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जेणेकरून रस्त्यावरील वाहन उभे करण्याचे प्रमाण  कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढू शकेल. त्यानुसार २०१९मध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने २७ आगार व ५५ बस स्थानकांपैकी ४२ ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या. यात दिवसा आगार, बस स्थानकातून गाड्यांची ये-जा होत असल्याने रिकामी जागा खासगी वाहने उपलब्ध करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज २००पेक्षा जास्त वाहने आगार व बस स्थानकात उभी केली जातात. यातून बेस्टला प्रत्येक दिवशी सरासरी १८ हजार रुपये उत्पन्न मिळते. त्याला प्रतिसाद वाढवण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जात आहेत. चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून सुरुवातीला निश्चित केलेले पार्किंगचे शुल्कही कमी करण्यात आले. 

बेस्ट आगारातील वाहनतळातील जागा आगाऊ आरक्षित करता येणार? 

वाहनतळांवरही जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना पुन्हा परतावे लागते. सध्या बेस्ट उपक्रमाच्या वाहनतळांवर चालकांना आपणहून जागा शोधून वाहने उभी करावी लागतात. यामध्ये प्रथम येणाऱ्याला वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र काही वेळा आगारात येऊनही जागा उपलब्ध होत नसल्याने उपक्रमाने यावर तोडगा म्हणून वाहने उभी करण्यासाठी जागा आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून वॅले पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पार्क +’ या अ‍ॅपवर आगार आणि बस स्थानकातील वाहनतळांवर उपलब्ध असलेल्या जागेबाबतची माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे वाहन चालक त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करू शकतील. तसेच डिजिटल माध्यमातून वाहन शुल्कही भरू शकतील.

वॅले पार्किंगसाठी शुल्क किती?

या सुविधेत वाहनधारक बस आगाराच्या प्रवेशद्वारावर वाहन सोडतील आणि तेथून वाहन उभे करण्याची व्यवस्था बेस्ट किंवा ‘पार्क +’च्या वतीने करण्यात येईल. बेस्ट उपक्रमाने सुरुवातीला कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, दिंडोशी, वांद्रे येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येईल. दोन तासांकरिता कोणत्याही प्रकारच्या वाहनांसाठी १०० रुपये आणि दोन तासांनंतर प्रत्येक तासासाठी ३० रुपये आकारण्यात येतील. ‘पार्क +’  पच्या माध्यमातून जागा आरक्षित करण्याकरिता प्लॅटफॉर्म शुल्क पाच रुपये आकारण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये प्रवेश केल्यानंतर सेवा प्रकारात जाऊन पार्किंगवर क्लिक करता येईल आणि तेथे जाऊन पार्किंग जागेची निवड करून पुढील प्रक्रिया पार पाडता येईल. सध्या बेस्ट आगार आणि बस स्थानकात  आपणहून जागा शोधून वाहने उभी करण्यास दुचाकीसाठी सहा तासांसाठी २५ रुपये, बारा तासांसाठी ३० रुपये आणि तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांसाठी १२ तासांसाठी ७० रुपये शुल्क आकारण्यात येते.