-अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजया दशमी म्हणजे असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा विजय. त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनाची प्रथा फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पोलीस दलही त्याला अपवाद नाही. आजही पोलीस दलामध्ये दसऱ्याला शस्त्र व वाहनांचे पूजन केले जाते. काळानुसार पोलिसांकडील शस्त्रे, वाहनांमध्ये बदल झाला आहे. एकेकाळी लाठीच्या सहाय्याने मुंबई बंदरावरील तस्करांशी दोन हात करणाऱ्या पोलिसांना थेट दहशतवाद्यांशी दोन हात करावे लागत आहेत. त्यामुळे पोलिसांकडे आता रॉकेट लाँचरपासून अगदी स्नायपर रायफल्सही आल्या आहेत. बदलत्या काळासोबत पोलिसांची शस्त्रे व सामग्री अद्ययावत झाली आहेत. त्याचा आढावा….

पोलीस दलात शस्त्रांचे पूजन कसे केले जाते?

पोलिस दलात शस्त्रपूजनाचे वेगळे महत्त्व आहे. दसऱ्याला पोलीस ठाणे, सशस्त्र विभाग, शस्त्र भांडार, शस्त्र दुरुस्ती विभागात पूजा केली जाते. वाईट शक्तींवर मात करण्यासाठी शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याच भावनेने अगदी ब्रिटिश काळापासून ही शस्त्रपूजनाची प्रथा आहे. शस्त्रपूजनासाठी शस्त्रांची विशेष रचनेत मांडणी केली जाते. त्यात बंदुका, काठ्या, संगणक यांची पूजा करण्याची प्रथा आहे. यावेळी घरातील वस्तू अथवा वाहनांची पूजा केल्याप्रमाणे शस्त्रांना, विशेषतः बंदुकांना हळद-कुुंकू लावले जाते. पोलीस दलातील शस्त्रपूजनाची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असली, तरी त्यांच्या शस्त्रामध्ये वेळोवळी बदल होत गेला आहे. सायबर पोलीस, मुख्यालय व आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयांमध्ये पोलीस त्यांच्या संगणकाचीही पूजा करतात.

कायदा व सुव्यवस्था राखणारा पोलीसाचा धाक आजही कायम कसा आहे?

पोलीस शिपाई म्हटले की, हातात दंडूका घेऊन रस्त्यावर उभे पोलीस असे चित्र आजही डोळ्यासमोर उभे राहते. फार पूर्वी गुन्हेगारी टोळ्यांकडून सोडा बॉटल, चॉपरचा वापर केला जात असे. त्या काळी पोलिसांच्या दंडूक्याचाही दरारा होता. काळानुसार पोलिसांच्या लाकडी काठीची जागा आता फायबरच्या काठ्यांनी घेतली आहे. वजनाला हलकी व टिकाऊ असलेल्या या फायबरच्या काठीचा दरारा कोरोना काळात पहायला मिळाला. गणेशोत्सव असो वा निवडणूका, घातपाताच्या ठिकाणी होणारी गर्दी असो, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला की पोलिसांचा दांडुका आजही त्यांचे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे.

काळानुसार पोलिसांच्या बंदुकांमध्ये कसे बदल झाले?

ब्रिटिश काळापासून पोलिसांकडे थ्री नॉट थ्री, मस्केट रायफल होत्या. मस्केट रायफलची जागा आता अत्याधुनिक एसएलआरने घेतली. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलिसांकडे ३०३ आणि ४१० बोअरच्या मस्केट रायफल होत्या. आधीच्या रायफल्सची रेंज ३०० ते ३५०च्या आसपास होती. मात्र प्रत्येक फायरिंगदरम्यान या रायफल्समध्ये बुलेट लोड करावी लागायची. या रायफलचा सतत वापर केल्यामुळे त्याचे चाप घट्ट व्हायचे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा वापर सहसा केला जात नव्हता. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी ३०३ आणि ४१० बोअरच्या मस्केट रायफलनेच दहशतवाद्यांशी दोन हात केले. मुंबई हल्ल्यानंतर २००९पासून ३०३ आणि ४१० बोअरची मस्केट रायफल दप्तरजमा करण्यास सुरुवात झाली. त्याजागी एसएलआर रायफल देण्यास सुरुवात झाली होती. शिवाय पोलिसांकडे काही प्रमाणात सबमशिन गनचाही वापर केला जातो.

मुंबई हल्ल्यानंतर पोलिसांना कशी मिळाली अद्ययावत शस्त्रे?

मुंबईत २६/११च्या हल्ल्यानंतर नेमलेल्या राम प्रधान समितीने पोलिसांकडील रायफल या निकामी आणि कुचकामी असल्याने त्या जागी अत्याधुनिक बंदुका दिल्या पाहिजेत, असे अहवालात नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांकडे एसएलआर (सेल्फ लोडेड रायफल), कार्बाइन, नऊ एमएम पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि गॅसगन तसेच एकाच वेळी ३० काडतुसे सोडणारी एकेएम (ऑटोमॅटिक कलश्निकॉव्ह मॉडर्नाइज्ड) आणि एका वेळी ३० राऊंड फायर होणारी एलएमजी (लाईट मशिन गन) अशी अद्ययावत शस्त्रे आहेत. सध्या मुंबई पोलिसांकडे रॉकेट लाँचर, ग्रेनेड प्रक्षेपक, स्नायपर रायफल सारखी शस्त्रेही आहेत. ही शस्त्रे एवढी सहज मिळाली नाहीत. त्यासाठी मुंबई हल्ल्यासारखी भीषण घटना कारणीभूत आहे.

व्हाईट कॉलर क्राईमविरोधात पोलिसांचे संगणक कसे प्रमुख शस्त्र ठरते?

अपमाहिती (फेक न्यूज) हे सध्या दहशतवाद्यांचे एक हत्यार बनले आहे. पण माहिती-तंत्रज्ञानाच्या, समाजमाध्यमांच्या, जल्पक म्हणजेच ट्रोल्स आणि बॉट्सच्या काळात हे हत्यार अधिक धारदार झाले आहे. त्यामुळे एरव्ही रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना संगणकाच्या सहाय्याने माहिती तंत्रज्ञानाच्या या दुनियेत अशा सायबर हल्ल्यांशीही दोन हात करावे लागत आहेत. केंद्रीय यंत्रणांकडे समाजमाध्यमांवरील अपमाहितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘विश्वरूप’ ही माहितीच्या महाजालावर बारीक नजर ठेवणारी प्रणाली आहे. पोलिसांचा समाजमाध्यम कक्षही यांच्याच तोडीचे काम करत आहे. याशिवाय महाराष्ट्र सायबर विभागही संगणकीय शस्त्रांद्वारे समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरावर कारवाई करत आहे. या माध्यमातून पोलीस दरवर्षी किमान १० हजार आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणारा, प्रक्षोभक मजकूर हटवला जात आहे. सायबरवॉरच्या या लढाईत पोलिसांचे संगणकही एक शस्त्र ठरले आहे. त्याच्या माध्यमातून पोलीस सायबर विश्वातील कृत्यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. आर्थिक गुन्हे शाखेमध्येही पोलिसांसाठी संगणक हे महत्त्वपूर्ण शस्त्र ठरते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police dasara shastra pujan importance significance and changes print exp scsg
First published on: 05-10-2022 at 10:00 IST