-जयेश सामंत
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह धरत ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाचे आंदोलन ओढावून घेणारे बंडखोर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या दोन्ही जिल्ह्यांमधील आगरी-कोळी नेत्यांची मोट बांधण्याचे जोरदार प्रयत्न आता शिवसेनेकडून सुरू झाले आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबाजनक अनुकूलता दर्शवली आहे. नामकरणाच्या मुद्द्यावरून मागील दीड वर्षापासून भूमिपुत्र म्हणविला जाणारा हा समाज सातत्याने रस्त्यावर उतरत आहे. गावागावांमधून आगरी-कोळी समाजातील तरुणांच्या बैठका होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतके दिवस या मुद्द्यावर कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. शिंदे यांच्या बंडानंतर मात्र नामांतरणाची खेळी शिंदे यांच्यावर उलटविण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न दिसतो आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

आगरी-कोळी समाजाचे राजकारणातील महत्त्व काय ?

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज ही अनेक वर्ष शिवसेनेची जमेची बाजू राहिली आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाणे आणि पालघर जिल्हा पालथा घालत शिवसेना रुजवली. गावागावांमधून शाखांची उभारणी केली. हे करत असताना दिघे यांना भूमिपुत्रांची निर्णायक अशी साथ मिळत गेली. आगरी-कोळी, कुणबी, आदिवासी हा ठाणे-पालघर जिल्ह्यातील मूळ भूमिपुत्र समाज. या समाजातील तरुणांना शिवसेनेने अगदी पहिल्यापासून आपलेसे केले. पक्षाचे एके काळचे बंडखोर नेते गणेश नाईक यांच्यामुळे या समाजामध्ये शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट होत गेली. मात्र नाईक यांच्या बंडानंतरही आगरी समाजातील बहुतांश नेते शिवसेनेसोबत राहिले हे विशेष. इतक्या मोठ्या संख्येने हाताशी असलेला हक्काचा मतदार विमानतळ नामकरणाचा वाद ओढवून घेत शिवसेनेने दुखावला हे नाकारता येणार नाही.

नेमका वाद काय?

नवी मुंबईतील सिडको प्रकल्पग्रस्तांसाठी निर्णायक आंदोलन उभारणारे दिनकर बाळू उर्फ दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जावे अशी येथील प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी आहे. ‘सिडकोने नवी मुंबई प्रकल्पासाठी आम्हा भूमिपुत्रांकडून स्वस्तात जमिनी संपादित केल्या आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावर हात आखडता घेतला’, या भावनेतून ऐशीच्या दशकात प्रकल्पग्रस्तांचे अभूतपूर्व असे आंदोलन झाले. या आंदोलनाची धुरा दि.बा यांनी वाहिली होती. जासई येथील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस गोळीबारात काही प्रकल्पग्रस्तांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली. पुढे राज्यात शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी साडेबारा टक्के जमीन योजना अमलात आणली. या योजनेविषयीही नाराजी होती. मात्र दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला हे नाकारता येणार नाही. मुंबई महानगर क्षेत्राचा चहूबाजूंनी विकास होत असताना भूमिपुत्रांना विमानतळ नामकरणाच्या आंदोलनाद्वारे आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

शिंदे विषयी नाराजी का?

डिसेंबर २०२०मध्ये नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोमध्ये मंजूर करत एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची नाराजी ओढवून घेतली. राज्य सरकारविरोधात आक्रमक असलेल्या भाजपला हा मुद्दा आयता मिळाला आणि पुढे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांचे मोठे आंदोलन सुरू झाले. शिंदे यांनी थेट शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा ठराव सिडकोत मंजूर करून घेतल्याने शिवसेनेत असलेल्या आगरी-कोळी समाजातील नेते, पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात समन्वयकाची भूमिका बजावली, तर कळवा येथील आगरी नेते दशरथ पाटील यांनी शिंदे यांना आव्हान देत हे आंदोलन यशस्वी कसे होईल यासाठी पुढाकार घेतला. कल्याण, डोंबिवली, २७ गाव, दिवा यांसारख्या भागातूनही हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त तरुणांचे लोंढे या आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळाले. ही नाराजी दूर करण्यासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे नगरविकास विभागाच्या माध्यमातून नियमित करण्याचा निर्णय मध्यंतरी शिंदे यांनी घेतला होता. त्यासाठी नवी मुंबईत पत्रकार परिषदही आयोजित केली होती. त्यानंतरही दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलन अधिक तीव्र होताना दिसले.

कठीण समयी आगरी नेत्यांना साद कशासाठी?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेल्या शिवसेनेने या कठीण समयी आगरी-कोळी नेत्यांनाच साद घालण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर सुरुवातीचे काही दिवस ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पसरला होता. ठाणे शहरातील पक्षाचे बहुतांश पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिंदे यांची साथ धरली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही बडे आगरी नेते मात्र ‘मातोश्री’वर थेट उद्धव यांच्या भेटीस जाऊ लागल्याने विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने शिंदे यांनाच अडचणीत आणणारी खेळी खेळली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष भोईर, रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांचे बंधू संजय, बदलापुरात वामन म्हात्रे, नवी मुंबईतील द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी यासारख्या नेत्यांना ‘मातोश्री’वरून निमंत्रण धाडले जात आहे. म्हणूनच विमानतळाच्या नामकरणाचा मुद्द्यावरून शिंदे यांनाच अडचणीत आणण्याची खेळी ‘मातोश्री’वरून खेळली जात असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai airport di ba patil naming issue uddhav thackeray and politics print exp 0622 scsg
First published on: 29-06-2022 at 14:26 IST