भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना बुधवारी पहाटे उद्ध्वस्त केले. धर्म विचारून केवळ पुरुष आणि बहुतांश घरातील कर्त्या पुरुष पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या मोहिमेचे नाव अतिशय उचित असे ‘सिंदूर’ ठेवले गेले. संरक्षण दलांच्या विविध मोहिमांची नावे पाहिली, की किती बारीक विचार करून एखाद्या मोहिमेचे नाव ठेवले जाते, याचा प्रत्यय येतो. संरक्षण दलांच्या विविध मोहिमांच्या नावांचा घेतलेला हा आढावा… ऑपरेशन पोलो (१९४८) हैदराबादला भारतीय संघराज्यात घेण्यासाठी संरक्षण दलांनी केलेल्या कारवाईला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले होते. हैदराबादमधील मोठ्या पोलो मैदानांची याला पार्श्वभूमी होती. १३ ते १८ सप्टेंबर १९४८ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. निजामाच्या सैन्याचा पराभव या कारवाईत करण्यात आला आणि हैदराबाद भारताच्या संघराज्याचा हिस्सा झाले. ऑपरेशन विजय (१९६१) गोवामुक्ती संग्रामाला ऑपरेशन विजय हे नाव देण्यात आले होते. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी १८ आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी कारवाई करण्यात आली. भारताने कारवाई करून गोवा, दीव, दमण यांना भारतीय संघराज्यात घेतले.

ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१)

भारतीय हवाई दलाने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात ही मोहीम राबविली. ३ ते १६ डिसेंबर १९७१ दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यात भारताच्या हवाई दलाने देदीप्यमान कामगिरी बजावली. भारताचा या युद्धात ऐतिहासिक विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली.

ऑपरेशन ट्रायडंट (१९७१)

पाकिस्तानविरुद्ध नौदलाच्या हल्ल्याला ऑपरेशन ट्रायडंट हे नाव दिले. बांगलादेशनिर्मितीच्या युद्धामध्ये ४ आणि ५ डिसेंबर १९७१ रोजी या चकमकी झाल्या. कराची बंदरात पाकिस्तानी नौदलाला भारताच्या नौदलाने चांगलाच तडाखा दिला. भारताचा यात विजय झाला. या दिनाचे महत्त्व म्हणून ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून आपण साजरा करतो.

ऑपरेशन मेघदूत (१९८४)

भारताच्या सियाचिन मोहिमेला ऑपरेशन मेघदूत हे उचित नाव दिले गेले. जगातील सर्वांत उंचावरील रणभूमीवर ही लढाई लढली गेली. भारताने सियाचिनवर प्रत्यक्ष ताबा मिळविला. पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर सियाचिन भागातून लक्ष ठेवता येते.

ऑपरेशन ब्लू-स्टार (१९८४)

पंजाबमधील वाढत्या दहशतवादाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करण्यात आली होती. ऑपरेशन ब्लू स्टार असे या मोहिमेचे नाव होते. ही मोहीम मोठी वादग्रस्त ठरली. शीख समुदायाच्या प्रार्थनास्थळाचे या मोहिमेत नुकसान झाले. या मोहिमेनंतर काही काळातच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

ऑपरेशन राजीव (१९८७)

सियाचिनमधील उंचावरील एक चौकी या मोहिमेद्वारे भारताने आपल्या ताब्यात घेतली. तत्पूर्वी हे ठाणे पाकिस्तानच्या ताब्यात होते. कैद पोस्ट, असे या लष्करी चौकीचे नाव होते. नायब सुभेदार बाणा सिंग यांनी अतुलनीय शौर्य गाजवून पाकिस्तानला येथून मागे पिटाळले आणि यावर भारताचे नियंत्रण प्रस्थापित केले. बाणा टॉप असे नामकरण आता आपण या चौकीचे केले आहे.

ऑपरेशन पवन (१९८७)

श्रीलंकेतील एलटीटीईला चाप बसावा, यासाठी भारताने या ठिकाणी शांतिसेना पाठविली. ऑक्टोबर महिन्यात ही कारवाई केली गेली. ही मोहीम वादग्रस्त ठरली. दुसऱ्या देशामध्ये जाऊन कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. शांतिसेनेने जाफना ताब्यात घेतले. एलटीटीईचा पराभव झाला. मात्र, तिचे आव्हान नंतरही कायम राहिले.

ऑपरेशन कॅक्टस, मालदीव (१९८८)

मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष मौमून गयूम यांना वाचविण्यासाठी आणि तेथील लोकशाहीच्या रक्षणासाठी ही कारवाई केली गेली. नोव्हेंबर महिन्यात ही कारवाई केली गेली. गयूम यांना वाचविण्यात यश आले. तेथील बंडाचा प्रयत्न संरक्षण दलांनी हाणून पाडला. लष्कर, नौदल, हवाई दलाने या मोहिमेत सहभाग घेतला.

ऑपरेशन विजय (१९९९)

कारगिल येथे झालेल्या मर्यादित युद्धाला ऑपरेशन विजय हे नाव दिले होते. पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील शिखरे ताब्यात घेऊन आव्हान दिले होते. या मोहिमेंतर्गत पाकिस्तानी घुसखोरांना आणि पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावण्यात आले आणि भारताचे नियंत्रण पुन्हा एकदा गमावलेल्या शिखरांवर प्रस्थापित केले गेले. मे ते जुलै १९९९ दरम्यान ही मोहीम चालली.

ऑपरेशन सफेद सागर (१९९९)

कारगिल युद्धादरम्यान हवाई दलाने ही मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत हवाई दल भारतीय लष्कराच्या मदतीला धावून आले. उंचावरील महत्त्वाच्या ठिकाणांना हवाई दलाने लक्ष्य केले.

ऑपरेशन तलवार (१९९९)

या मोहिमेंतर्गत नौदल अरबी समुद्राच्या उत्तरेला तैनात होते. कारगिल युद्ध सुरू असताना नौदलाचे शक्तीप्रदर्शन आणि वेळ पडली, तर कारवाई यासाठी ही मोहीम होती. भारताचा अंतिमतः कारगिल युद्धात विजय झाला.

ऑपरेशन पराक्रम (२००१)

संसदेवरील हल्ल्यानंतर ही मोहीम आखली गेली. या अंतर्गत संरक्षण दलांची मोठी जमवाजमव पाकिस्तान सीमेवर झाली. युद्धसदृश स्थिती तयार झाली होती. मोठा युद्धसराव करण्यात आला. कुठल्याही आशियायी देशाने इतकी मोठा सराव तत्पूर्वी केला नव्हता. कुठलेही मोठे युद्ध न होता, केवळ शक्तिप्रदर्शन करून ही मोहीम नंतर समाप्त झाली.

ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो (२००८)

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) कमांडोंनी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी मोहीम आखली. तिला ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो असे नाव दिले. दहशतवाद्यांना मारून नागरिकांची सुटका याद्वारे करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर महत्त्वाच्या मोहिमा

ऑपरेशन स्टीपलचेज (१९७१) ही नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम, सिक्कीममधील १९७५ मधील कारवाई. पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लू-स्टार या मोहिमेनंतरही दहशतवाद्यांविरुद्ध विविध मोहिमा राबविण्यात आल्या. त्यात ऑपरेशन वूडरोज, ऑपरेशन रेड रोज (१९८४), ऑपरेशन ब्लॅक थंडर – १ आणि २ (१९८६ आणि १९८८), ऑपरेशन नाइट डॉमिनन्स (१९९० ते १९९४), ऑपरेशन रक्षक यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन सर्प विनाश आणि दहशतवादविरोधी मोहिमांचा समावेश आहे.