Tanot Mata Temple History: पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून ७ मे २०२५ रोजी चोख प्रत्युत्तर दिले. या ऑपरेशनदरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळांवर भारतीय संरक्षण दलांनी हल्ला चढवला आणि हे तळ नेस्तनाबूत केले. त्यानंतर पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रिया देणारे व्हिडिओ व्हायरल झाले. या हल्ल्यात काही मशिदीही उध्वस्त झाल्या असे खोटे दावे करण्यात आले. या निमित्ताने यापूर्वीच्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानने राजस्थानमधील मंदिरावर केलेल्या हल्ल्याच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या आहेत. शिवाय गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांत पुन्हा याच मंदिरावर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर हे मंदिर नेमके कोणते होते? पाकिस्तानने सलग बॉम्बवर्षाव करूनही हे आजही उभे कसे याचाच घेतलेला हा आढावा.
भारत- पाक युद्धाचे साक्षीदार
पाकिस्तानने भारतातील एका हिंदू मंदिरावर एकदा नाही तर दोनदा म्हणजे १९६५ आणि १९७१ साली या दोन्ही युद्धांमध्ये हल्ला केला होता. हे मंदिर तब्बल १५०० वर्षे जुने आहे. राजस्थानमध्ये थरच्या वाळवंटात भारत- पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेले तनोट मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर केवळ प्राचीनतेमुळे प्रसिद्ध नाही तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे साक्षीदार असलेले मंदिर म्हणून ते अधिक प्रसिद्ध आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकात भाटी राजपूत राजा तनू राव याने या मंदिराचे बांधकाम केले होते. त्यानेच या मंदिरात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. तेव्हापासून भाटी राजपूत वंश आणि जैसलमेरमधील भाविकांकडून या देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते.
१९६५ सालचे युद्ध आणि तनोट देवीचे मंदिर
१९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तनोट देवीचे मंदिर थेट पाकिस्तानी लष्करी कारवाईच्या टप्प्यात आले होते. सीमेजवळ असलेल्या या मंदिराला पाकिस्तानी सैनिकांकडून लक्ष्य करण्यात आले होते. मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी त्यावर सलग बाँम्बवर्षाव करण्यात आले होते. परंतु एकही बॉम्ब फुटला नाही, अशी आख्यायिका येथील स्थायिक सांगतात.
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि लोंगेवालाची लढाई
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानने या मंदिरावर बॉम्बहल्ला केला होता. त्यावेळीही मंदिराच्या दिशेने जाणारे रणगाडे वाळूत रुतल्यामुळे पुढे जाऊ शकले नाहीत. परिणामी, या विलंबाचा फायदा भारतीय हवाई दलाने घेतला आणि प्रतिहल्ला करून अडकलेले रणगाडे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानी सैन्याला माघारी हटण्यास भाग पाडले.
लोंगेवाला लढाईत विजय
४ ते ७ डिसेंबर १९७१ दरम्यान झालेल्या निर्णायक लोंगेवालाच्या लढाईनंतर भारतीय सैन्याने या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून मंदिर परिसरात विजय स्तंभ उभारला. या वेळी पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या तुकडीचे १२० भारतीय सैनिक मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली लढले. त्यांच्यापुढे २,००० ते ३,००० पाकिस्तानी सैनिक आणि ३० ते ४० रणगाडे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी भारतीय हवाई दलाच्या फायटर- बॉम्बर्सच्या मदतीने आपला गड राखला. ही लढाई आता शौर्य आणि रणनिती कौशल्याचे दैदिप्यमान प्रतीक ठरली आहे आणि दरवर्षी तनोट माता मंदिरात या विजयाचा उत्सव साजरा केला जातो.
मंदिर परिसरात विजयस्तंभ
आज या मंदिराजवळ विजय स्तंभ लोंगेवाला लढाईतील शौर्याची आठवण म्हणून उभा आहे. तनोट देवीचे मंदिर आणि हा स्तंभ या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि शौर्याची एकत्रित कथा सांगतात. मंदिराच्या घंटांचे आवाज वाळवंटभर घुमतात आणि श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या अढळ शक्तीचा पुरावा देतात.