पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी तीन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत अत्यंत महत्त्वाची पदे भूषवली. गेल्या काही दिवसांत ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखत आणि दहशतवाद, युद्धासंदर्भातील वादग्रस्त विधाने यामुळे आसिफ यांच्यावर जगभरातून टीका होताना दिसत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची मुलाखत
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. सीएनएन या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे ख्वाजा मोहम्मद आसिफ हे सध्या टीकेचे विषय ठरत आहेत. पाकिस्तानने पाच भारतीय लढाऊ विमाने यशस्वीरीत्या पाडल्याचा दावा मुलाखतीदरम्यान आसिफ यांनी केला. मात्र, वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विश्वासार्ह पुरावेही नसल्याचे सांगत त्याबाबत प्रश्न उपस्थित करत हा दावा खोडून काढला.
सीएनएनच्या बेकी अँडरसन यांनी त्यांना विचारले, “पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची पाच विमाने पाडल्याचा दावा केला जात आहे. पण भारताने म्हटले की, याबाबतचे काही पुरावे नाहीत. तर त्याचे पुरावे कुठे आहेत?” या प्रश्नावर आसिफ यांनी उत्तर दिले, “हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आमच्या नाही; पण भारतीय सोशल मीडियावर झाले आहे. या विमानांचे अवशेष सापडले आणि ते सर्व भारतीय सोशल मीडियावरच आहे.”

आसिफ यांनी सोशल मीडियाचा हवाला देताच अँडरसन यांनी त्यांचे बोलणे थांबवत म्हटले, “सर, तुम्ही संरक्षणमंत्री आहात. तुमच्याशी सोशल मीडियावरील कंटेंटबद्दल बोलत नाही. मला माफ करा.” या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यावर टीकेचा वर्षावही झाला. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री असलेले वरिष्ठ नेते आसिफ यांनी सोशल मीडियावर विश्वास ठेवला म्हणून वापरकर्त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. “हे संरक्षणमंत्र्यांचे विधान आहे का? पाकिस्तान हा गांभीर्याने घ्यावा, असा देश नाही”, असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यात पाकिस्तानची भूमिका

‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमुळेही आसिफ यांना अनेकांनी लक्ष्य केले. या मुलाखतीदरम्यान त्यांनी दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा करण्यात पाकिस्तानचा ऐतिहासिक सहभाग असल्याचे मान्य केले. ‘स्काय न्यूज’च्या यालदा हकीम यांनी आसिफ यांना विचारले, “तुम्ही मान्य करता का की, पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा व वित्तपुरवठा करण्याचा इतिहास आहे.” त्यावर आसिफ यांनी म्हटले, “आम्ही हे काम सुमारे तीन दशकांपासून अमेरिका, तसेच ब्रिटनसाठीही करीत आहोत. ती एक चूक होती आणि आम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. जर आम्ही सोविएत युनियनविरुद्धच्या युद्धात आणि ९/११ नंतरच्या युद्धात सामील झालो नसतो, तर पाकिस्तानचा एक निर्दोष इतिहास दिसला असता.”

आसिफ यांनी पुढे असेही म्हटले, “आज ज्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, त्यांचे पूर्वी पाश्चात्त्य देशांच्या राजधान्यांमध्ये स्वागत केले जात असे. ८० च्या दशकात जेव्हा सोविएत युनियनविरुद्ध लढत होतो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजेत आयुष्य जगत होते. त्यानंतर ९/११ चे हल्ले झाले.”

परस्परविरोधी विधाने

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आसिफ यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला. या हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या लष्कर-ए-तैय्यबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या अस्तित्वाबद्दल आसिफ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “लष्कर-ए-तैय्यबा आता पाकिस्तानात अस्तित्वात नाही. मूळ संघटनाच अस्तित्वात नसेल तर त्याची शाखा इथे कशी असू शकते? भारताने सुरू केलेल्या कोणत्याही गोष्टीला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊच.हल्ला किंवा तसे स्पष्ट संकेत मिळाले, तर नक्कीच युद्ध होईल.”

वादग्रस्त राजकीय नेते

ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचा राजकीय प्रवास १९९१ मध्ये सुरू झाला. ते पाकिस्तानच्या सिनेटवर निवडून आले होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सरकारांमध्ये अनेक उच्च पदांवर काम केले आहे. संरक्षणमंत्री म्हणून त्यांचा सध्याचा कार्यकाळ एप्रिल २०२२ मध्ये शहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये सुरू झाला आणि मार्च २०२४ मध्ये त्यांना विमानोड्डाण वाहतूकमंत्री म्हणूनही नियुक्त करण्यात आले. ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे प्रतिनिधित्व करतात. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते सियालकोटमधून राष्ट्रीय सभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

त्यांची राजकीय कारकीर्द अशी होती:

पाणी आणि वीजमंत्री (२०१३-२०१७)

संरक्षणमंत्री (२०१३-२०१७ आणि पुन्हा २०२२ पासून आतापर्यंत)

परराष्ट्रमंत्री (२०१७-२०१८)

पेट्रोलियम आणि नैसर्गिक संसाधन मंत्री (२००८ मध्ये )

क्रीडामंत्री (२००८ मध्ये)

खासगीकरण आयोगाचे अध्यक्ष (१९९७-१९९९)

राजकारणात येण्याआधी आसिफ संयुक्त अरब अमिरातीमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करत होते. त्यांचे वडील ख्वाजा मोहम्मद सफदर हेदेखील एक प्रसिद्ध राजकारणी होते. वडिलांच्या निधनानंतर ते १९९१ मध्ये पाकिस्तानला परतले. त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला कायम कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. २०१२ मध्ये एका याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, आसिफ यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संविधानानुसार त्यांना सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरवायला हवे. याचिकाकर्त्याने खटला मागे घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले.