आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी वर्ष २०२३ हे जागतिक आर्थिक मंदीचे वर्ष असेल असा अंदाज काही दिवसांपूर्वीच वर्तविला होता. वर्ष २०२२ मध्ये महागाईने उच्च स्तर गाठला होता. त्यामुळे २०२३ मध्ये मंदी येऊ शकते. अमेरिका, युरोपीयन संघ आणि चीनच्या अर्थव्यवस्थेला मरगळ येऊन त्याचे परिणाम जगातील एक तृतीयांश भागावर मंदीचे सावट निर्माण होईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. क्रिस्टालिना यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यावर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ॲमेझॉन, मेटा आणि ट्विटर या कंपन्यांनी आता मोठी कामगार कपात जाहीर केली आहे. खरंच जागतिक मंदी येणार आहे का? त्याचे भारतावर काय परिणाम होतील? याचा घेतलेला हा आढावा.

IMF सोबतच बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, बँकांनी वाढत्या महागाईला रोखण्यासाठी कर्जावरील व्याज वाढविले आहे. हे वाढलेले व्याज आर्थिक मंदी आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. रशिया-युक्रेन यांच्यात ताणलेले युद्ध, जागतिक स्तरावरील महागाई, चीनमध्ये पुन्हा नव्याने सुरु झालेला करोनाचा प्रकोप, व्याज दरातील वाढ या सर्व कारणांमुळे २००८ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. याचा परिणाम असा झाला आहे की मोठ्या कंपन्यांनी आतापासूनच आपल्या खर्चांवर नियंत्रण आणण्याची खबरदारी घेतली आहे. त्याचाच पहिला फटका बसला आहे तो कर्मचाऱ्यांना.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

अमेरिकेतील या कंपन्यात होणार नोकर कपात

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ज्यांचा बोलबोला होता त्या ॲमेझॉनने (Amazon.com Inc) २०२३ च्या सुरुवातीलाच मोठी नोकर कपात करणार असल्याचे जाहीर केले. आधी हा आकडा १० हजार असेल असे कळत होते. मात्र नव्या माहितीनुसार १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. १८ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने ही नोकर कपात सुरु होईल, असे कंपनीचे सीईओ एंडी जेसी यांनी सांगितले.

फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटा प्लॅटफॉर्मने (Meta Platforms Inc) एकून कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला. अंदाजे ११ हजार कर्मचारी यामुळे घरी बसण्याची शक्यता आहे. डूरडॅश (DoorDash Inc) ही फूड डिलिव्हरी करणारी एक मोठी कंपनी. करोना काळात या कंपनीने चांगली प्रगती केली होती. मात्र आता नुकसान होत असल्यामुळे १ हजार २५० कर्मचाऱ्यांना काढले जाणार आहे. एएमसी नेटवर्क (AMC Networks Inc) ही केबल टीव्ही नेटवर्क मधील नामांकित कंपनी. कंपनीचे सीईओ क्रिस्टिना स्पाडे हे तीन महिन्यापूर्वी पायउतार झाल्यानंतर कंपनीने २० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर सीटीग्रूप, मॉरगन स्टॅनली, इंटेल कॉर्प, मायक्रोसॉफ्ट कॉर्प, जॉन्सन अँड जॉन्सन, वॉर्नर ब्रॉस डिस्कव्हरी, बीयाँड मीट आयएनसी, स्ट्रीप आयनसी, फिलिप्स ६६, सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स, अरायव्हल एसए, वॉल्ट डिस्ने, सीस्को सिस्टम, वूलव्हरीन वर्ल्ड वाईड आयएनसी, सेल्सफोर्स आयएनसी आणि बझफीड आयएनसी यांनी काही हजारोंच्या घरात नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर त्यात सकारात्मक बदल होतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र ट्विटर डबघाईला असल्याचे चित्र आज दिसत आहे. ट्विटरमधून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. एवढंच नाहीतर ट्विटर कार्यालयात कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा काढून घेण्यात येत आहेत. एचपी या संगणक निर्मितीमधील नामांकित कंपनीने ६ हजार जणांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर सीएनएन या जागतिक दर्जाच्या आणि वॉर्नर बॉस डिस्कव्हरीची उपकंपनी असेल्या संस्थेतून मोठी नोकर कपात होणार असल्याचे कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा >> जगातला श्रीमंत व्यक्ती असूनही एलन मस्कने कार्यालयातील टॉयलेट पेपर बंद केला; ट्विटर कर्मचाऱ्यांना सांगितलं “घरुनच…”

भारतासाठी IMF ने काय सांगितले

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये सांगितले होते की, भारत नव्या वर्षात संपूर्ण जगावर आपली छाप सोडेल. जगभरात मंदीचा अंधकार पसरलेला असताना भारताची अर्थव्यवस्था जगाला प्रकाश देईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जॉर्जिवा यांनी सांगितले की, भारत सरंचनात्मक सुधारणा करत असून डिजिटायजेशनच्या प्रक्रियेत भारताने चांगले यश मिळवले आहे.

भारतीय अर्थविषयक संस्थाचे मत काय?

असौचेम (The Associated Chambers of Commerce and Industry of India – ASSOCHAM ) या संस्थेचे महासचिव दीपक सूद यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर मंदीचे सावट असले तरी भारतीय अर्थव्यवस्था तग धरून राहिल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मार्केटमधली मागणी, वित्तीय क्षेत्रांची चांगली स्थिती आणि बऱ्याच कंपन्यांची बॅलन्सशीट मजबूत आहे. त्यात कृषी क्षेत्रातून चांगली बातमी येत आहे. रबीचा हंगाम चांगला जाताना दिसतोय. तसेच पर्यटन क्षेत्रकडेही ग्राहक आकर्षित होत आहेत. याचा सकारात्मक प्रभाव या क्षेत्राशी निगडीत व्यापारावर होईल.

तसेच जीटीआरआय (The Global Trade Research Initiative – GTRI) या संस्थेने सांगितले आहे की, जागितक आर्थिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था आणि निर्यात क्षेत्र थोडेसे प्रभावित होऊ शकते. भारताला ऊर्जा क्षेत्रातील आयात कमी करावी लागेल. तसेच भारताच तेल, इंधन या क्षेत्रात संशोधन करुन उत्पादन वाढवावे लागणार आहे. असे झाल्यास ऊर्जा आयात कमी होईल आणि आपले चालू खात्यामध्ये मोठी सुधारणा होईल.

अर्थव्यवस्थेचे चित्र आशादायक

वर्ष २०२२-२३ च्या सप्टेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्क्यांनी वाढलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे की, वर्ष २०२९ पर्यंत भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनलेला असेल. २०२३ या आर्थिक वर्षात भारत अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के ते ७.७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.