राजस्थान राज्यात गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर १३ मे २००८ रोजी लागोपाठ झालेल्या आठ बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या भीषण बॉम्बस्फोटांत ७१ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १८५ लोक जखमी झाले होते. या स्फोटानंतर देशभरात खळबळ माजली. पोलिसांच्या तपासानंतर काही आरोपींना अटक केली, तर बाटला हाऊस येथे दोन आरोपी चकमकीत मारले गेले. २०१९ साली जयपूरच्या विशेष न्यायालयाने चार आरोपींना या गुन्ह्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र काल (२९ मार्च) राजस्थान उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपला निकाल दिला आणि आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींचे वकील सईद सादत अली यांनी या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या पोलीस प्रशासनाला आदेश देऊन तपासकार्यात अकार्यक्षमता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ साली, जयपूरच्या विशेष न्यायालयाने बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याबाबत चार आरोपींना दोषी मानले होते. तर पाचवा आरोपी, शाहबाज हुसैन याची मुक्तता केली होती. उच्च न्यायालयानेदेखील शाहबाजच्या निर्दोषत्वाला मान्यता दिली होती.

हे वाचा >> जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना मृत्युदंडाची शिक्षा

एकापाठोपाठ आठ बॉम्बस्फोटांची मालिका

आरडीएक्स वापरून जयपूर शहरात नऊ बॉम्ब पेरण्यात आले होते. त्यांपैकी आठ बॉम्बचा स्फोट होऊन जयपूर शहर हादरले. सायंकाळी ७.१५ ते ७.४५ दरम्यान गर्दीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या भागांत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे स्फोट घडवून आणण्यात आले. सायंकाळी ७.१५ वाजता जोहरी बाजार येथे पहिला स्फोट झाला. या स्फोटाची बातमी शहरभर पसरते न पसरतो तोवर हनुमान मंदिर, हवा महाल, बडी चौपाल, त्रिपोलिया बाजार आणि चांदपोल या ठिकाणी एकापाठोपाठ स्फोट झाले. हनुमान मंदिरात भाविकांची बरीच गर्दी होती, त्या ठिकाणी स्फोट झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले.

या वेळी पोलिसांना एक बॉम्ब निकामी करण्यात यश मिळाले होते. सायंकाळी ८.१० वाजता चांदपोल हनुमान मंदिराजवळ एका सायकलवर शाळेच्या बॅगेत आठ किलो वजनाचा बॉम्ब आढळून आला होता. या बॉम्बला टायमर आणि डिटोनेटर लावलेले होते. पोलिसांच्या पथकाने मोठ्या धाडसाने हा बॉम्ब निकामी केला. जयपूरसारख्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता.

इंडियन मुजाहिदीन संघटनेने घेतली जबाबदारी

बॉम्बस्फोट झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या वेळी इंडियन मुजाहिदीनबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. विविध माध्यमांना ईमेल पाठवून मुजाहिदीनने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. ईमेलमध्ये त्यांनी सायकलवर बॉम्ब ठेवलेला एक व्हिडीओदेखील पाठवला होता. सायकलची ओळख पटल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले होते.

माध्यमांना पाठविण्यात आलेला ईमेल खरा असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले होते. मात्र त्यातील माहितीबाबत ते साशंक होते. ही माहिती तपासाची दिशा भरकटविण्यासाठी तर पाठविली नाही ना? असा प्रश्न त्यांना पडला होता.

भारताने आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर अमेरिकेला पाठिंबा देऊ नये, अशी धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती. तसेच जयपूरच्या पर्यटनाला धक्का पोहोचविण्यासाठी या शहराची निवड केल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले होते. या स्फोटाच्या मालिकेनंतर जयपूरमधल्या पर्यटनाला काही काळ खीळ बसली. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या स्पर्धेत अनेक परदेशी खेळाडू सहभागी झाले होते, त्यामुळे त्यांच्या देशांना खेळाडूंची चिंता होती.

स्फोटानंतरचा तपास आणि कारवाई

मे महिन्यात स्फोट झाल्यानंतर ऑगस्ट २००८ मध्ये शाहबाज हुसैन या पहिल्या आरोपीला अटक झाली. शाहबाजने ईमेल पाठवून स्फोट केल्याचा दावा केला होता, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. मात्र २०१९ साली सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. डिसेंबर २००८ ते डिसेंबर २०१० दरम्यान मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवार आझमी, मोहम्मद सलमान आणि सैफुरेहमान यांना अटक करण्यात आली. २०१९ साली जयपूरच्या विशेष न्यायालयाने चारही आरोपींना दोषी मानत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. चौघेही आरोपी उत्तर प्रदेशच्या आझमगढचे रहिवासी आहेत.

आणखी तीन आरोपी यासिन भटकळ, असदुल्लाह अख्तर आणि आरीझ हे तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर जयपूरसह इतर काही स्फोटांच्या प्रकरणांचे आरोप आहेत. इतर दोन आरोपी २००८ साली दिल्ली येथे बाटला हाऊस येथील चकमकीत ठार झाले.

उच्च न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता का केली?

१३ मे रोजी स्फोट घडल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (ATS) १३ सप्टेंबर २००८ रोजी पहिले डिस्क्लोजर स्टेटमेंट सादर केले होते. अशा वेळी चार महिन्यांत एटीएसने कारवाई का नाही केली? याचे उत्तर न्यायालयाला दिले गेले नाही. तसेच एटीएसने सायकल खरेदीचे जे बिल न्यायालयात सादर केले, ते स्फोटात सापडलेल्या सायकलचे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. सायकलच्या बिलातील तपशिलात खाडाखोड झाल्याचे न्यायालयाने सांगितले. चारही आरोपी १३ मे रोजी दिल्लीहून जयपूरला येत असताना त्यांनी हिंदू नाव सांगितले होते, असा आरोप एटीएसने केला, मात्र त्यांचे तिकीट न्यायालयात सादर करण्यात आले नाही.

एटीएसने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, आरोपी १३ मे रोजी दिल्लीहून जयपूरला आले. त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले, त्यानंतर किशनपोल बाजारातून सायकल विकत घेतली. यानंतर त्यांनी ठिकठिकाणी बॉम्ब ठेवून सायंकाळी पाच वाजता शताब्दी एक्स्प्रेस पकडून दिल्लीला पलायन केले. एटीएसच्या या दाव्यावर न्यायालयाचा विश्वास बसला नाही. एका दिवसात एवढ्या घटना कशा होऊ शकतात? असा प्रश्न विचारण्यात आला.

आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan high court acquitted 2008 jaipur blasts four accused big setback for rajasthan government kvg
First published on: 30-03-2023 at 17:39 IST