Russia honours Biju Patnaik ओडिशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बिजू पटनायक यांचा रशियाकडून सन्मान करण्यात आला. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक व रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी बुधवारी नवी दिल्लीतील रशियन दूतावासात दिवंगत बिजू पटनायक यांना समर्पित एका स्मारक फलकाचे उद्घाटन केले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर मित्रराष्ट्रांनी मिळवलेल्या सर्वांत निर्णायक विजयांपैकी एक असलेल्या स्टॅलिनग्राडच्या लढाईत बिजू पटनायक यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्याच भूमिकेचा सन्मान करण्यासाठी हा फलक उभारण्यात आला. या युद्धात त्यांचे योगदान काय होते? रशियाकडून त्यांचा सन्मान का करण्यात आला? त्याविषयी जाणून घेऊ.

स्टॅलिनग्राडची लढाई

२२ जून १९४१ रोजी वेहरमॅच्ट (वेहरमॅच्ट हे नाझी जर्मनीचे सशस्त्र दल होते) यांनी सोविएत युनियनवर मोठे आक्रमण केले. त्यावेळी जवळजवळ संपूर्ण पश्चिम युरोपवर ‘वेहरमॅच्ट’चा ताबा होता. त्यांनी या आक्रमणाला ‘ऑपरेशन बार्बरोसा’ असे नाव दिले होते. १९४२ च्या वसंत ऋतूपर्यंत बेलारूस आणि युक्रेनचा बराचसा भाग नाझींच्या ताब्यात होता. त्यांनी दक्षिण रशियातील स्टॅलिनग्राड शहराला लक्ष्य केले. १९६१ मध्ये व्होल्गोराड असे नाव देण्यात आलेले स्टॅलिनग्राड हे व्होल्गावरील एक प्रमुख औद्योगिक केंद्र होते आणि रशियन लष्कराचे (रेड आर्मी) तोफखाना उत्पादन केंद्र होते. व्होल्गा नदी ही यूएसएसआरच्या सर्वांत महत्त्वाच्या शिपिंग मार्गांपैकी एक होती, जी पश्चिम रशियाला कॅस्पियन समुद्राशी जोडत होती. मुख्य म्हणजे सोविएत युनियनचे नेते जोसेफ स्टॅलिन यांचे नाव या शहराला असल्याने त्याला एक मोठे प्रतीकात्मक महत्त्वदेखील होते.

जनरल फ्रेडरिक पॉलसच्या नेतृत्वाखाली ‘वेहरमॅच्ट’च्या सहाव्या सैन्याने २३ ऑगस्ट १९४२ रोजी स्टॅलिनग्राडवर हल्ला सुरू केला. ही लढाई खूप रक्तरंजित झाली. या लढाईत रशियन सैन्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. संघर्ष वाढत असताना, जर्मनीचा इंधन पुरवठाही कमी होत गेला आणि त्यामुळे ते सोविएत प्रदेशात खोलवर जाण्यावर आणि देशाच्या तेल क्षेत्रांवर कब्जा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त झाले. १९४२ च्या शरद ऋतूपर्यंत तोफखान्याचे सततचे हल्ले आणि बॉम्बहल्ले यांमुळे स्टॅलिनग्राडचे मोठे नुकसान झाले आणि तेथे केवळ कचऱ्याचे ढिगारे उरले. जर्मन लोकांनी स्टॅलिनग्राडचा जवळजवळ ९०% भाग ताब्यात घेतला होता. असे असले तरी रशियन लोक लढत राहिले.

नोव्हेंबरमध्ये सोविएत सैन्याने ऑपरेशन युरेनस सुरू केले. हा रशियन लष्कराचा प्रतिहल्ला होता. या हल्ल्यानंतर युद्धाला नवे वळण मिळाले. या प्रदेशात उपलब्ध असलेल्या सर्व सैन्यांना एकत्रित करून रशियन लष्कराने शहराभोवती एक बचावात्मक कडे तयार केले आणि जवळजवळ ३,००,००० सैन्याला अडवले. त्यानंतर हिवाळा सुरू झाला. त्यांचा मार्ग अडवल्यामुळे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या हिवाळी युद्धासाठी तयार नसल्यामुळे जर्मन सैन्य शरणागती पत्करण्यास भाग पडले. जनरल पॉलसने ३० जानेवारी १९४३ रोजी शरणागती पत्करली. फेब्रुवारीपर्यंत रशियन लष्कराने स्टॅलिनग्राड परत मिळवले आणि यादरम्यान जवळजवळ १,००,००० जर्मन सैन्याला ताब्यात घेतले. स्टॅलिनग्राडमधील पराभवानंतर ‘वेहरमॅच्ट’ने पूर्वेकडे कधीही पाऊल ठेवले नाही.

बिजू पाटनायक यांचे लढाईतील योगदान

बिजू पटनायक यांनी एकदा एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते, “विमान उडवणे हे माझे पहिले प्रेम आहे आणि वयानुसार ते कमी झाले असले तरी ते अजूनही तसेच आहे.” त्यांचा जन्म १९१६ मध्ये कटक येथे झाला. पटनायक १९३६ मध्ये रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये सामील झाले. बिजू पटनायक प्रामुख्याने ‘डकोटा’ म्हणून ओळखली जाणारी डग्लस सी-४७ स्कायट्रेन विमाने उडवत होते. ही पुरवठा आणि वाहतूक विमाने होती. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर बिजू पटनायक यांनी ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अनेक उड्डाणे केली. रंगूनमधून ब्रिटिश अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पटनायक यांनी चीनच्या चियांग काई-शेकला मदत करण्यासाठी पुरवठा मोहिमादेखील चालवल्या.

रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी नवीन पटनायक यांना लिहिले, “आम्ही ज्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यात इंडियन नॅशनल एअरवेजचे एक शूर पायलट तुमचे दिवंगत वडील आदरणीय श्री बिजू पटनायक जी यांचादेखील समावेश आहे. त्यांनी स्टॅलिनग्राड ऑपरेशनमध्ये सहभागी होत वेढलेल्या रेड आर्मीला शस्त्रे पुरवली होती,” असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. बिजू पटनायक ज्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते, त्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, स्टॅलिनग्राडमध्ये रशियन लष्कराला पुरवठा करण्यासाठी लुफ्टवाफे आणि जर्मन सैन्याचा सामना करणाऱ्या अनेक मित्रराष्ट्रांच्या वैमानिकांपैकी ते एक होते.

त्यावेळी शहरातील रशियन नागरिक आणि सैन्य त्यांचे युद्ध प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी पूर्णपणे हवाई वाहतुकीवर अवलंबून होते. मुख्य म्हणजे रशियन लोकांनी बिजू पटनायक यांच्या योगदानाची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९९५ मध्ये युद्धाच्या समाप्तीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील रशियन दूतावासाकडून ओडिशाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला होता. १९९७ मध्ये त्यांच्या निधनानंतर, त्यांची शवपेटी तीन वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रीय ध्वजांनी गुंडाळण्यात आली होती. त्यात भारत, इंडोनेशिया (ज्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी मदत केली होती) आणि रशिया यांचा समावेश होता.