Sleeping After Eating Side Effects : रात्रीचे किंवा दुपारचे पोटभर जेवण केल्यानंतर थोडीशी डुलकी घेणे अनेकांना खूप आरामदायी वाटते; पण डॉक्टरांच्या मते ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. जेवल्यानंतर लगेच अंथरुणावर आडवे झाल्याने नेमके काय होते? त्याबाबत तज्ञ काय सांगतात? त्याविषयीचा हा आढावा…

जेवल्यानंतर लगेच झोपणे किती धोकादायक?

तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच अंथरुणावर आडवे पडल्यास पोटातील आम्ल म्हणजेच ॲसिड अन्ननलिकेत परत जाण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जेवल्यानंतर कधीतरी लगेच विश्रांती घेतल्याने याचा फारसा त्रास होत नाही. मात्र, जर ही रोजची सवय झाल्यास ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. तसेच, संवेदनशील व्यक्तींना यामुळे गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GORD) सारखा गंभीर आजारदेखील उद्भवू शकतो. विशेषतः वजन जास्त असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला किंवा आधीपासूनच अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना या सवयीचा मोठा फटका बसण्याची जास्त शक्यता असते.

ॲसिड रिफ्लक्स नेमका कशामुळे होतो?

जेवणानंतर उभे किंवा बैठे स्थितीत राहिल्यास गुरुत्वाकर्षणामुळे अन्न आणि पोटातील आम्ल पोटाच्या खालच्या भागातच राहण्यास मदत होते. मात्र, जेवल्यानंतर लगेच आडवे पडल्यास विशेषतः पाठीवर झोपल्यास पोटातील अन्न आणि आम्ल सहजपणे वरच्या दिशेने सरकून अन्ननलिकेत येतात. पोटाच्या आतील भागावर आम्लापासून संरक्षण करणारे विशेष अस्तर असते. मात्र, अन्ननलिकेत असे संरक्षण नसल्याने पोटातील आम्लाचा अगदी थोडा संपर्कही छातीत जळजळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. याच कारणामुळे अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीनेही ॲसिड रिफ्लक्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवल्यानंतर लगेच आडवे पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

छातीतील जळजळीकडे दुर्लक्ष करू नका!

फरीदाबाद येथील अमृता रुग्णालयातील औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मोहित शर्मा यांच्या मते, अनेकजण अधूनमधून होणाऱ्या अपचनाकडे सामान्य समस्या म्हणून पाहतात. मात्र, ही लक्षणे वारंवार दिसणे हे एखाद्या मोठ्या समस्येचे संकेत असू शकतात. अनेकांना असे वाटते की, पोटभर जेवण केल्यानंतर कधीतरी छातीत जळजळ होणे सामान्य आहे, पण प्रत्यक्षात वारंवार होणारा रिफ्लक्स हा एक धोक्याचा इशारा असतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटातील आम्ल झपाट्याने शरीराच्या वरच्या भागात येते. जर ही सवय महिने किंवा वर्षे कायम राहिल्यास केवळ अपचनच नव्हे तर अन्ननलिकेलाही सूज येण्याचा धोका वाढतो. जीवनशैलीतील साधे बदलही यात मोठा फरक घडवून आणू शकतात. जेवल्यानंतर किमान दोन ते तीन तास उभे किंवा बैठ्या स्थितीत राहिल्यास अनेक रुग्णांमध्ये ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, असेही डॉ. मोहित शर्मा यांनी स्पष्ट केले.

ॲसिड रिफ्लक्स किती सामान्य आहे?

गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा जगभरातील सर्वाधिक आढळणाऱ्या पचनविकारांपैकी एक आहे. विविध संशोधनांनुसार, जगभरातील सुमारे १४ टक्के वयोवृद्ध लोक या समस्येने त्रस्त आहेत. काही प्रदेशांमध्ये तर प्रत्येक पाचपैकी एका प्रौढ व्यक्तीला या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि विविध अभ्यासांनुसार विशेषतः ॲसिड रिफ्लक्सचा ज्यांना त्रास वारंवार होतो, अशा व्यक्तींनी जेवल्यानंतर काही काळ उभे किंवा बसलेल्या स्थितीत राहणे हा प्रभावी आणि सुरक्षित उपाय मानला जातो.

ॲसिड रिफ्लक्समुळे काय घडू शकते?

सतत होणारा ॲसिड रिफ्लक्स हा केवळ छातीत जळजळ होण्यापुरता मर्यादित राहत नाही. कालांतराने पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत गेल्यामुळे तिला दीर्घकालीन सूज येऊ शकते. तसेच झोपेचा दर्जा खराब होणे, सतत खोकला येणे, आवाज बसणे, दातांवरील कवचाचे नुकसान होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये ‘बॅरेट्स ओएसोफॅगस’ हा आजार उद्भवू शकतो आणि त्यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. रात्रीच्या वेळी होणारा रिफ्लक्स हा विशेष चिंताजनक असतो, कारण एखादी व्यक्ती झोपलेली असताना आम्ल अधिक काळ अन्ननलिकेच्या संपर्कात राहते. परिणामी अंतर्गत अवयवांचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता वाढते.

जेवल्यानंतर किती वेळाने झोपावे?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्रीच्या जेवणानंतर कमीत कमी दोन ते तीन तास आडवे होणे किंवा झोपायला जाणे टाळावे. या कालावधीत पोटातील अन्नाचा मोठा भाग लहान आतड्यात ढकलला जातो, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता खूपच कमी होते. याशिवाय, जेवणानंतर शरीरावर जास्त ताण न आणता सुमारे १० ते १५ मिनिटे शतपावली करणे हेही पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, या काळात अतिशय कष्टाचे व्यायाम किंवा शारीरिक श्रम टाळावेत.

कोणते पदार्थ समस्या वाढवू शकतात?

डॉ. मोहित शर्मा यांच्या मते, काही खाद्यपदार्थ आणि पेये पोट रिकामे होण्याची प्रक्रिया संथ करतात किंवा अन्ननलिकेच्या खालच्या भागातील स्नायूंना शिथिल करतात, त्यामुळे ॲसिड रिफ्लक्सची शक्यता कित्येक पटीने वाढते. या पदार्थांमध्ये तेलकट किंवा तळलेले पदार्थ, एकाच वेळी जास्त प्रमाणात केलेले जेवण, मद्यपान, चॉकलेट, पुदिना, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचा समावेश आहे. ज्या लोकांना वारंवार छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांनी एकाच वेळी जास्त न खाता थोड्या-थोड्या प्रमाणात खावे आणि रात्रीचे जेवण लवकर करावे; यामुळे ही लक्षणे कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते, असा सल्लाही डॉ. शर्मा यांनी दिला आहे.

ॲसिड रिफ्लक्स टाळण्यासाठी काय करावे?

डॉ. मोहित शर्मा यांच्या मते, सतत होणारा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेली अपचन कमी करणारी कोणतीही औषधी घेऊ नये. आठवड्यात दोनपेक्षा अधिक वेळा छातीत जळजळ होणे, झोपेत सातत्याने व्यत्यय येणे किंवा अन्न गिळताना त्रास होणे, कोणतेही कारण नसताना अचानक वजन कमी होणे, वारंवार उलट्या होणे किंवा काळ्या रंगाची विष्ठा होणे, यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जेवल्यानंतर किमान दोन ते तीन तास उभे किंवा बसलेल्या स्थितीत राहणे, १० ते १५ मिनिटे शतपावली घालणे आणि संतुलित व योग्य आहाराची निवड करणे, या साध्या सवयी अंगीकारल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाण्याची शक्यता खूपच कमी होते आणि दीर्घकाळ पचनसंस्था निरोगी ठेवण्यासही या सवयी उपयुक्त ठरतात, असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.