Trisha Krishnan Tamil Nadu CM goal: Viral video sparks Jayalalithaa comparisons amid Vijay TVK rise: दोन दशकांपूर्वीचा एक विस्मरणात गेलेला व्हिडिओ सध्या तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाचे आणि कुतूहलाचे केंद्र ठरला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याने ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) या आपल्या नव्या पक्षाद्वारे राजकारणात दमदार एन्ट्री केल्यामुळे राज्याची समीकरणे बदलली आहेत. अशातच, लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अगदी मिश्कीलपणे व्यक्त केले होते. आता चाहत्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच जण तो केवळ एक सहज विनोद होता की, भविष्यात सत्यात उतरणारी एखादी भविष्यवाणी? असा प्रश्न विचारात आहेत.
विस्मरणात गेलेली मुलाखत व्हायरल
२००४ मधील त्या मुलाखतीचा हा भाग पुन्हा चर्चेत येण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे विजय आणि त्रिशा यांच्यातील वाढती जवळीक. या नव्या समीकरणामुळे तमिळनाडूतील चित्रपट आणि राजकारण यांचा ऋणानुबंध हा जुना आणि लोकप्रिय विषय पुन्हा एकदा चघळला जाऊ लागला आहे. ज्याप्रमाणे एम. जी. रामचंद्रन (MGR) आणि जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून थेट ‘फोर्ट सेंट जॉर्ज’ (तामिळनाडूचे सत्ताकेंद्र) पर्यंतचा यशस्वी प्रवास केला, तसाच चमत्कार त्रिशाच्या बाबतीतही घडू शकतो का? अभिनेत्री ते लोकनेता या परंपरेतील ती पुढचा दुवा ठरेल का? या प्रश्नाने सध्या संपूर्ण तमिळनाडूचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘ऑन-स्क्रीन केमिस्ट्री’ राजकारणातही?
तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या अभिनेत्री त्रिशा आणि दिवंगत नेत्या जयललिता यांची तुलना मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या चर्चेमागे प्रामुख्याने दोन महत्त्वाची कारणे आहेत. पडद्यावरील त्यांची लोकप्रिय प्रतिमा आणि राजकीय घडामोडींची अचूक वेळ. ज्याप्रमाणे जयललिता यांनी तमिळ सिनेसृष्टी गाजवली होती, तसाच दबदबा आज त्रिशाचा आहे. जयललिता आणि त्या काळातील महानायक एमजीआर (MGR) यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती आणि हीच ‘ऑन-स्क्रीन केमिस्ट्री’ पुढे एका भक्कम राजकीय भागीदारीत बदलली, या जोडीने तमिळनाडूच्या राजकारणावर अनेक दशके राज्य केले. आज नेमकी तशीच परिस्थिती अभिनेता विजय आणि त्रिशाच्या बाबतीत पाहायला मिळते आहे. ‘घिल्ली’, ‘तिरुपाची’ आणि अलीकडच्या ‘लिओ’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे ही जोडी घराघरांत पोहोचली असून, त्यांच्यातील मैत्रीची चर्चा आता सिनेसृष्टीच्या पलीकडे जाऊन राजकीय गोटात रंगू लागली आहे.
सह-अभिनेत्रीची आयुष्यातील भूमिका काय?
अभिनेता विजयने अलीकडेच ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) हा पक्ष स्थापन करून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. या वातावरणात त्याची सर्वात यशस्वी सह-अभिनेत्री असलेल्या त्रिशाची या प्रवासात काय भूमिका असेल, याबद्दल तर्कवितर्क लढवले जाणे स्वाभाविक आहे. या चर्चेला सर्वाधिक उधाण आले ते २००४ मधील ‘सन टीव्ही’च्या एका जुन्या मुलाखतीमुळे, ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

तमिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचे आहे…
या मुलाखतीत तरुण त्रिशा अतिशय आत्मविश्वासाने म्हणताना दिसते की, “मला तमिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचे आहे. थांबा आणि बघा; पुढच्या १० वर्षांत मी ते करून दाखवेन.” जेव्हा तिला मुख्यमंत्री झाल्यावरच्या नियोजनाबद्दल विचारले गेले, तेव्हा तिने हसत उत्तर दिले की, “आधी मला मत देऊन निवडून आणा, मगच सांगेन!” दोन दशकांपूर्वी हलक्याफुलक्या अंदाजात केलेले हे वक्तव्य आता तमिळ जनतेला एका मोठ्या बदलाचा संकेत वाटू लागले आहे, ज्यामुळे ‘ग्लॅमर ते सत्ता’ या प्रवासाच्या चर्चेला नवे धुमारे फुटले आहेत.
अफवेला अचानक उधाण येण्यामागचे नेमके कारण काय?
या संपूर्ण प्रकरणाची वेळ (Timing) इतकी अचूक जुळून आली की, हा केवळ एक योगायोग नसून एखादी नियोजित राजकीय खेळी असावी, असा संशय बळावला आहे. निकालाच्या दिवशी विजयच्या ‘TVK’ पक्षाने राजकीय मैदानात अर्ध्याहून अधिक मजल मारली होती तेव्हा नेमक्या त्याच सुमारास, अभिनेत्री त्रिशा आपल्या ४३ व्या वाढदिवशी विजयच्या चेन्नईतील निवासस्थानी गेल्याने माध्यमांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. विजयच्या घराबाहेर हसतमुख चेहऱ्याने चाहत्यांना अभिवादन करणाऱ्या त्रिशाचे फोटो वाऱ्यासारखे पसरले आणि अवघ्या काही तासांतच तिचा तो जुना, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न असलेला व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला.
या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर जणू प्रतिक्रियांचा महापूरच आला. चाहत्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत प्रत्येकाने आपापले तर्क मांडायला सुरुवात केली:
- @iamKarthik3yan ने उत्साहाने लिहिले, “TVK ची भविष्यातील मुख्यमंत्रीपदाची उमेदवार त्रिशाच असणार!”
- @gnsekharji यांनी ठामपणे भाकीत केले की, “त्रिशा भविष्यात मुख्यमंत्री होणार, माझे हे शब्द लक्षात ठेवा!”
- @Dear_Men_Life यांनी मत मांडले की, “२००४ चा हा व्हिडिओ आणि आजची परिस्थिती पाहता, विजयने व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही आघाड्यांवर विजय मिळवला आहे.”
- @georajakiyam यांनी तर याला एक मोठे राजकीय कारस्थान (Deep State) असल्याचे म्हणत, त्रिशाच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले.
या चर्चेत आता केवळ चाहतेच नाहीत, तर ज्योतिषीही सामील झाले आहेत. प्रसिद्ध ज्योतिषी @AstroSharmistha यांनी जेव्हा तमिळनाडू निवडणुकांवरील आपल्या भाकितात विजयच्या उदयाबद्दल साशंकता व्यक्त केली, तेव्हा @siv_ramkrish यांनी त्यांना उत्तर देताना म्हटले, “मॅडम, अभिनेत्री त्रिशाची पत्रिकाही एकदा अभ्यासा; भविष्यात ती राजकारणात खूप मोठी भूमिका निभावताना दिसत आहे.”
त्रिशाची राजकीय महत्त्वाकांक्षा: केवळ चर्चा की ठोस पाऊल?
त्रिशाने अधिकृतपणे राजकारणात प्रवेश करण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजवर तिने ना कोणती राजकीय योजना मांडली आहे, ना कोणत्याही पक्षाबद्दल आपली निष्ठा जाहीर केली आहे. मात्र, तिच्या सार्वजनिक विधानांचा आणि कृतींचा आढावा घेतल्यास एक वेगळेच चित्र समोर येते. विविध बातम्यांनुसार, त्रिशाने वारंवार लोकसेवा आणि सामाजिक प्रश्नांबाबत आपली ओढ व्यक्त केली आहे. “जनतेसाठी काम करण्यासाठी राजकारण हे एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते,” असे तिचे मत असल्याचेही अनेकदा चर्चिले गेले आहे.
ऱणनीति की, वैयक्तिक निर्णय?
तिच्या सामाजिक भूमिकेचा विचार केल्यास, त्रिशाने लैंगिक समानता आणि महिलांच्या सुरक्षिततेसारख्या संवेदनशील विषयांवर नेहमीच आपली मते ठामपणे मांडली आहेत. तरीही, तिने स्वतःला थेट राजकीय भाष्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. ही तिची रणनीति आहे की केवळ वैयक्तिक निर्णयाचा भाग, हे सांगणे कठीण आहे.

अस्तित्व आणि प्रतिष्ठा
अलीकडेच घडलेली एक घटना तिच्या या भूमिकेला अधिक अधोरेखित करते. ‘TVK’ च्या प्रचारादरम्यान भाजप नेते नैनार नागेंद्रन यांनी तिचे नाव अभिनेता विजयसोबत जोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्रिशाने त्यांना कडक शब्दांत सुनावले. राजकीय वर्तुळात या घटनेचे दोन अर्थ काढले गेले. काहींनी याकडे तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा संकेत म्हणून पाहिले, तर काहींनी हा आपल्या स्वतंत्र ओळखीवर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध दिलेला लढा म्हणून याकडे लक्ष वेधले. स्वतःचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने घेतलेला हा पवित्रा नक्कीच कौतुकास्पद ठरला.
त्रिशा खरोखरच तमिळनाडूची मुख्यमंत्री होऊ शकते का?
१. ‘TVK’ पक्षातील सहभाग आणि विजयची उत्तराधिकारी
त्रिशाने अधिकृतरीत्या अभिनेता विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) मध्ये प्रवेश केला, तर ती पक्षातील सर्वात प्रभावशाली चेहरा म्हणून समोर येईल. एक ‘स्टार’ सेलिब्रिटी म्हणून तिची जनमानसातील प्रतिमा अतिशय स्वच्छ आणि लोकप्रिय आहे. विजयच्या राजकीय प्रवासात ती केवळ एक प्रचारक म्हणून मर्यादित न राहता, मनोरंजन आणि राजकारण यांमधील एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते.
विशेषतः महिला आणि तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्याची ताकद तिच्यात आहे. येत्या पाच-दहा वर्षांत विजयचा पक्ष सत्तेत राहिला आणि स्थिरावला, तर त्रिशाला विजयची राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाऊ शकते. एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती, म्हणूनच त्रिदशाची तुलना जयललिता यांच्याबरोबर केली जात आहे.
२. स्वतंत्र राजकीय अस्तित्व: एक आव्हानात्मक मार्ग
त्रिशा एखाद्या प्रस्थापित पक्षाची साथ न घेता स्वतंत्रपणे स्वतःचा राजकीय मार्ग निवडू शकते. महिलांचे अधिकार किंवा सामाजिक सुधारणांसारख्या मुद्द्यांवर ती एखादी चळवळ उभी करू शकते. मात्र, तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहता, केवळ वैयक्तिक करिष्मा पुरेसा नसतो.
तिला यशस्वी होण्यासाठी भक्कम संघटनात्मक बांधणी, प्रचंड आर्थिक पाठबळ आणि अनुभवी सल्लागारांची गरज लागेल. संघटनात्मक यंत्रणा नसल्यामुळे सीमन (नाम तमिळर काची) यांच्यासारख्या नेत्यांना जे संघर्ष करावे लागत आहेत, तसेच आव्हान त्रिशासमोरही उभे ठाकू शकते. त्यामुळे, हा मार्ग तिच्यासाठी अधिक खडतर असेल.
३. आघाडी सरकारमधील ‘तडजोडी’चा चेहरा
भविष्यातील राजकारणात त्रिशा एक ‘तडजोडीचा उमेदवार’ म्हणून पुढे येऊ शकते. विविध राजकीय गट किंवा आघाड्यांना एकत्र ठेवण्यासाठी एखाद्या सर्वमान्य आणि लोकप्रिय सांस्कृतिक चेहऱ्याची गरज भासल्यास तिचे नाव आघाडीवर असू शकते. सध्या अशी कोणतीही शक्यता नसली, तरी २०३१ च्या निवडणुकीपर्यंत राज्यातील आघाड्यांची समीकरणे पूर्णपणे बदलली, तर हे चित्र वास्तवात येऊ शकते.
चाहते एम.जी.आर. आणि जयललितांशी तुलना का करत आहेत?
तमिळनाडूच्या मातीत चित्रपट आणि राजकारण यांचे नाते जवळचे आहे. या राज्याने रुपेरी पडद्यावरील नायकांना देवासारखे पुजले आणि नंतर त्यांनाच सत्तेच्या सिंहासनावर बसवले. या परंपरेचा पाया एम.जी. रामचंद्रन (MGR) यांनी रचला. त्यांनी पडद्यावरील आपली ‘गरिबांचा कैवारी’ ही प्रतिमा प्रत्यक्ष आयुष्यात उतरवली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या शिष्या जयललिता यांनी आपला वैयक्तिक करिष्मा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल १४ वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूवर अधिराज्य गाजवले.
आज त्रिशाची तुलना जयललितांशी होण्यामागे तिचे दीर्घकाळ टिकून असलेले सौंदर्य, तिचा ठाम स्वभाव आणि लोकांशी सहज जोडले जाणारे तिचे व्यक्तिमत्व ही प्रमुख कारणे आहेत. जर भविष्यात अभिनेता विजय यांच्या राजकीय उदयामुळे एम.जी.आर. यांच्यासारखी ‘लोकाभिमुख लाट’ निर्माण झाली, तर त्रिशा त्यांच्या सोबतीला एक खंबीर ‘सहकारी नेतृत्व’ म्हणून लोकांच्या मनात जयललितांची आठवण जागी करू शकते. सोशल मीडियाच्या युगात वावरणारा तरुण मतदार मनोरंजन आणि राजकारण या दोन्ही गोष्टींकडे एकाच चष्म्यातून पाहतो, त्यामुळे तरुणांमध्ये त्रिशा आणि जयललिता अशी तुलना होणे साहजिक असेल.
परंतु, जयललिता आणि त्रिशा यांच्यात एक मूलभूत फरक आहे. जयललितांनी प्रचंड संघर्षातून राजकारणात आपली जागा निर्माण केली होती, तर त्रिशा सध्या केवळ एक ग्लॅमरस सेलिब्रिटी म्हणून या सर्व चर्चेपासून दूर आहे.
ही राजकीय शक्यता वास्तवात येण्यासाठी काय घडणे आवश्यक आहे?
- अधिकृत पक्षप्रवेश: त्रिशाने आगामी काळात विजय यांच्या TVK पक्षात किंवा अन्य एखाद्या मोठ्या राजकीय आघाडीत अधिकृतपणे प्रवेश करणे ही पहिली पायरी असेल.
- सक्रिय राजकीय सहभाग: केवळ पक्षात येणे पुरेसे नाही, तर सार्वजनिक सभांमध्ये भाषणे देणे, लोकांशी संवाद साधणे आणि सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडणे यातून तिची राजकीय प्रगल्भता सिद्ध व्हावी लागेल.
- प्रतिमा निर्मितीची रणनीति: सोशल मीडिया आणि समर्थकांनी सातत्याने तिच्या जुन्या विधानांना आणि ठाम प्रतिमेला लोकांसमोर आणले, तर तिच्याभोवती एक नैसर्गिक राजकीय वलय निर्माण होऊ शकते.
- नेतृत्वाची पोकळी: जर भविष्यात विजय यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली, तर राज्यातील त्यांच्या वारसदार म्हणून त्रिशाकडे पाहिले जाऊ शकते.
ही ऑनलाइन अफवा किती काळ टिकेल?
तमिळ राजकारणात चित्रपटविश्वातून जन्मलेल्या दंतकथांना खूप मोठे आयुष्य असते. मग ती एम.जी.आर.-जयललिता यांची जोडी असो वा रजनीकांत- कमल हासन यांचा प्रभाव. विजय आणि त्रिशा यांच्याभोवती विणली गेलेली ही कथा पुढील निवडणुकीपर्यंत सहज टिकू शकते. जोपर्यंत त्रिशा स्वतः यावर स्पष्ट नकार देत नाही, तोपर्यंत सोशल मीडियाचे अल्गोरिदम आणि चाहत्यांचे प्रेम या चर्चेला जिवंत ठेवेल.
