चित्रविचित्र कपडे आणि फटकळ स्वभावामुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. यावेळी मात्र ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. दिग्दर्शक साजिद खानला सेलिब्रिटी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊ दिल्याबद्दल तिने यापूर्वी बिग बॉस १६ च्या निर्मात्यांवर टीका केली होती. आता उर्फीने पुन्हा एकदा साजिद खानवर निशाणा साधला आहे. उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीजच्या माध्यमातून साजिद खानने कित्येक मुलींचा विनयभंग केला आहे आणि त्याबद्दल त्याला पश्चात्तापही नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे वाचण्यासाठी लोकसत्ता अ‍ॅप डाउनलोड करून लॉग-इन करा

ही स्टोरी पोस्ट करताना उर्फीने आधी बरेच बोल्ड फोटोज शेयर केले आणि मग नंतर शेवटच्या स्टोरीमधून तिने साजिद खानवर निशाणा साधला. उर्फीने पुढे लिहले आहे की “त्याने कधीही माफी मागितली नाही पण त्याच्या त्याने कृतीचा बचाव केला आहे. एका फक्त माफी मागून पुन्हा सगळं होणार नाही, परंतु आपण जे केले त्याचा बचाव करण्यापेक्षा हे चांगले आहे”. एकीकडे साजिद खानवर टीका होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या माजी स्पर्धक पायल रोहतगी आणि कश्मिरा शाह यांनी साजिद खानला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

एकूणच या प्रकरणामुळे काही वर्षांपूर्वी भारतात चांगलंच डोकं वर काढलेल्या ‘मी टू’ मोहिमची चर्चा पुन्हा व्हायला सुरूवात झाली आहे. याआधी काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनूश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तेव्हापासून भारतात या चळवळीने जोर धरायला सुरुवात केली. यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचा फोडली. केवळ मनोरंजनसृष्टीच नव्हे तर प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिला उघडपणे बाहेर येऊन कसलीही भीड न बाळगता यावर भाष्य करू लागल्या. अर्थात या अशा असंख्य ‘मी टू’ प्रकरणांपैकी किती प्रकरणं खरी आहेत याचा आकडा अजूनतरी समोर आलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य न करता एकंदरच भारतात या चळवळीने डोकं कसं बाहेर काढलं याबद्दल आपण जाणून घेऊयात.

आणखी वाचा : ‘बेला चाओ’ हे गाणं, खिळवून ठेवणारा थरार पुन्हा अनुभवायला मिळणार? ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी खुशखबर

‘एआयबी’च्या टीममधील भूतपूर्व कॉमेडीयन उत्सव चक्रवर्ती याच्यावर जेव्हा त्यांच्या एका महिला कर्मचारीकडून लैंगिक शोषणाचे आरोप लागले तेव्हापासून या ‘मी टू’ मोहिमेने भारतात डोकं वर काढायला सुरुवात केली. ज्या महिलेने हे आरोप केले तिने पुढे येऊन स्पष्ट केले की कंपनीचे सीईओ आणि फाउंडर मेंबर तन्मय भट्टकडे तक्रार करूनही त्याने याबद्दल काहीच दखल घेतली नाही. तन्मयने नंतर त्याच्या पदापासून फारकत घेतली, तर एआयबीचा आणखीन एक फाउंड र मेंबर ज्याच्यावर आधीच लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते असा गुरसिमरन खंबा यालाही कंपनीने केवळ तात्पुरतं रजेवर पाठवलं होतं.

या प्रकरणानंतर ‘क्वीन’ चित्रपट दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर ‘फॅन्टम फिल्म्स’ या संस्थेमधील महिलेकडून असेच गंभीर आरोप केले गेले. गोष्ट इतक्यावर थांबली नाही तर हळूहळू यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नावं समोर यायला सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, अनुराग कश्यप, सुभाष घाई, लव रंजन, साजिद खान, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, संगीतकार अनू मलिक यांची नावं समोर आली. नाना पाटेकर आणि तनूश्री दत्ता हे प्रकरणही चांगलंच तापलं आणि त्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या, बोलल्या गेल्या. असं नाही की हे आरोप फक्त पुरुषांवरच लागले, तर यात काही महिलांचीही नावं पुढे आली. त्यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे कॉमेडीयन अदिती मित्तल. ‘एआयबी’च्या कंपूत काम करणाऱ्या कनीज सुरेखाने अदिती मित्तलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अदितीने एका कार्यक्रमात कनीजला जबरदस्ती कीस करून लैंगिक शोषण केल्याचं तिनेच सांगितलं होतं.

या मी टू मुव्हमेंटचा फटका विदेश राज्यमंत्री एमजे अकबर यांनाही बसला होता. एका वृतपत्रात काम करताना तब्बल २० महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे आरोप त्यांच्यावर लागले आणि लगेचच त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. मोब्बशिर जावेद म्हणजेच एमजे अकबर यांचा बिहारमध्ये जन्म झाला. इंग्रजी बीए (ऑनर्स)मध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये ट्रेनी म्हणून काम सुरू केलं आणि नंतर मीडिया क्षेत्रात त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. याच कार्यकालादरम्यान वृत्तपत्राचे संपादक म्हणून कारभार सांभाळताना त्यांनी २० महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याचं काही वर्षांपूर्वी समोर आलं.

आणखी वाचा : मोनू देओरीने केली उर्फी जावेदची भन्नाट मिमिक्री; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

एकूणच २०१८ च्या दरम्यानपासून सुरू झालेल्या या ‘मी टू’ चळवळीला भारतात आजही पूर्णविराम मिळत नाही. यातील बऱ्याचशा केसेस धड रिपोर्टही झाल्या नसल्याने खरा आकडा आपल्यासमोर आलेला नाही. आत्तापर्यंत जेवढी नावं घेतली आहेत त्या सगळ्यांच्याच विरोधात ठोस पुरावे अजून सादर झालेले नाहीत. काहींवर झालेले आरोप सिद्ध झाले आहेत तर काही मंडळी अजूनही हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगून आपला बचाव करत आहेत. आरोप सिद्ध व्हायचे आहेत तेव्हा ते होतील आणि जे खरंच निर्दोष आहेत ते यातून बाहेरही पडतील, पण आज सगळ्याच क्षेत्रातील महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं या मोहिमेमुळे शक्य झालं आहे. अर्थात यामध्ये कोण दोषी आणि निर्दोष हे ठरवायचा अधिकार हा केवळ आणि केवळ न्यायव्यवस्थेला आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is metoo movement and its history and why director sajid khan is again on the radar of actresses avn
First published on: 10-10-2022 at 10:19 IST