1965 Indo-Pak War Sialkot Sector: युक्रेन-रशिया युद्धानंतर तसेच भारत-पाकिस्तान संदर्भातील ‘ऑपरेशन त्रिशूळ’ सारख्या अलीकडच्या घडामोडींमुळे आधुनिक युद्धांमध्ये रणगाड्यांची भूमिका, मर्यादा आणि उपयुक्तता यावर जागतिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ड्रोन, अँटी-टँक शस्त्रं आणि हवाई वर्चस्वाच्या काळात मोठ्या प्रमाणावर बख्तरबंद तुकड्या कितपत प्रभावी ठरू शकतात, हा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर अभ्यासक १९६५ च्या युद्धातील सियालकोट सेक्टरसारख्या मोठ्या बख्तरबंद संघर्षांकडे नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत.
या निमित्ताने १९६५ च्या युद्धाचं पुनर्मूल्यांकनही घडत आहे. आसल उत्तर आणि हाजी पीर यांसारख्या लढायांभोवती दीर्घकाळ केंद्रित राहिलेल्या सामूहिक स्मृतीपलीकडे जाऊन, युद्धाची दिशा ठरवणाऱ्या व्यापक आघाड्यांचा शोध सध्या घेतला जात आहे. सियालकोट हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. सियालकोटमधील आक्रमणातून मिळालेले धडे विशेषतः बख्तरबंद युद्ध, लॉजिस्टिक्स आणि संयुक्त कारवाई यांसंदर्भात आजच्या लष्करी धोरणांशी थेट जोडले जात आहेत. त्यामुळे हा विषय केवळ ऐतिहासिक अभ्यासापुरता मर्यादित न राहता, आधुनिक युद्धशास्त्र आणि धोरणात्मक विचारांच्या संदर्भातही अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
रणभूमीची निवड: सियालकोटच का?
१९६५ साली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत काश्मीर आणि पंजाब या दोन्ही भागांत संघर्ष कमालीचा तीव्र झाला होता. चंब-अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने सुरू केलेल्या ऑपरेशन ग्रँड स्लॅममुळे युद्धाचं पारडं त्यांच्याबाजूने अधिकच झुकू लागलं होतं. या परिस्थितीला प्रत्युत्तर देताना भारताने आंतरराष्ट्रीय सीमेलगत नवे मोर्चे उघडण्याचे निर्णायक पाऊल उचललं. जम्मूवरील ताण कमी करणं आणि पाकिस्तानला आपलं सैन्य अनेक आघाड्यांवर विभागण्यास भाग पाडणं हा या हालचालींचा मुख्य उद्देश होता.
सियालकोटची निवड विचारपूर्वकच
सियालकोट सेक्टरची निवड काही योगायोगाने झालेली नव्हती, तर ती पूर्णपणे विचारपूर्वक आखलेली योजना होती. लाहोर परिसरातील कालव्यांनी छेदलेल्या सपाट भूभागाच्या तुलनेत सियालकोटचा प्रदेश अधिक मोकळा होता, त्यामुळे रणगाड्यांना हालचालीसाठी आवश्यक ते स्वातंत्र्य मिळू शकत होतं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सियालकोट हा पाकिस्तानसाठी एक अत्यंत धोरणात्मक केंद्रबिंदू होता. या भागात भारतीय सैन्याने यशस्वी धडक दिली असती, तर पाकिस्तानातील महत्त्वाच्या रस्ते आणि रेल्वे मार्गांना थेट धोका निर्माण झाला असता. परिणामी त्यांची पुरवठा-व्यवस्था विस्कळीत झाली असती आणि मोठ्या लष्करी तुकड्या त्या दिशेने वळवण्याशिवाय पर्याय उरला नसता.
द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या सखोल विश्लेषणात्मक लेखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ही कारवाई एखाद्या मर्यादित छापेमारीपुरती मर्यादित नव्हती. रणगाडे आणि तोफखान्यावर आधारलेली, कोअर स्तरावर आखलेली ही एक महत्त्वाकांक्षी आघाडीची लष्करी मोहीम होती, जी संपूर्ण युद्धावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली होती.
आक्रमणाचा व्याप
या मोहिमेसाठी भारताने थेट कोअर स्तरावर सैन्य तैनात केलं होतं. त्यात पहिली बख्तरबंद (आर्मर्ड) डिव्हिजन, पायदळाच्या अनेक डिव्हिजन्स आणि तोफखान्याचा मोठा ताफा सहभागी होता. दोन्ही बाजूंनी प्रचंड संख्येने रणगाडे उतरल्यामुळे सियालकोट सेक्टरमधील लढाई भारतीय उपखंडातील सर्वात मोठ्या बख्तरबंद संघर्षांपैकी एक ठरली.
शेकडो रणगाडे समोरासमोर
टाइम्स ऑफ इंडियामधील समकालीन नोंदी आणि नॅशनल वॉर मेमोरियलच्या अभिलेखांनुसार, तुलनेने मर्यादित भूभागावर शेकडो रणगाडे समोरासमोर उभे ठाकले होते. भारतासाठी ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी बख्तरबंद तैनात होती आणि अनेक अभ्यासकांच्या मते दुसऱ्या महायुद्धानंतर उपखंडात झालेली कदाचित सर्वात मोठी रणगाड्यांची तैनात होती.

अमेरिकेच्या अत्याधुनिक पॅटन रणगाड्यांविरोधात भारत
या आक्रमणाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळालेल्या पॅटन रणगाड्यांनी सुसज्ज असलेली आपली ६ वी बख्तरबंद डिव्हिजन रणांगणात उतरवली. त्या काळात हे रणगाडे तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक मानले जात होते. त्यानंतर जे घडलं, ते एखाद्या क्षणिक झटापटीपुरतं मर्यादित राहिलं नाही. फिलोरा ते चाविंडा या विस्तीर्ण पट्ट्यात पसरलेली, सलग आणि दीर्घकाळ चाललेली रणगाड्यांची भीषण स्फोटांची मालिका सियालकोट सेक्टरची ओळख बनली.
प्रारंभीच्या हालचाली आणि सुरुवातीचे यश
१९६५ साली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या आक्रमणाने वेग घेतला. भारतीय बख्तरबंद तुकड्या पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्या आणि पुढील संरक्षणरेषा भेदून काढत, निवडलेल्या रणांगणावरच पाकिस्तानच्या रणगाड्यांना निर्णायक लढाईस उतरवण्याच्या योजनेनुसार हालचाली करण्यात आल्या.
भारतीय सैन्याचा वेग आणि आत्मविश्वास
फिलोरा परिसरात झालेल्या पहिल्याच चकमकींनी संघर्षाची तीव्रता अधोरेखित केली. येथे झालेल्या भीषण रणगाडा-लढाईमध्ये दोन्ही बाजूंनी प्रचंड ताकद पणाला लागली. अधिकृत स्मरणिकांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या भारतीय नोंदीनुसार, या टप्प्यावर पाकिस्तानी तुकड्यांना चाविंडाकडे माघार घ्यावी लागली. त्यामुळे फिलोराची लढाई ही केवळ रणांगणावरील यश न राहता, आक्रमणाच्या सुरुवातीच्या वेगाचं आणि आत्मविश्वासाचं ठळक प्रतीक ठरली.
तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्र
या टप्प्यावर नेतृत्वाचं महत्त्व निर्णायक ठरलं. पूना हॉर्सचे ए. बी. तारापोर यांनी या बख्तरबंद संघर्षात थेट आघाडीवरून नेतृत्व केलं. नंतर त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत असूनही त्यांनी कारवाईचं नेतृत्व सुरू ठेवलं आणि रेजिमेंटची आक्रमक धार कायम राखण्यात निर्णायक भूमिका बजावली.
लढाईचा केंद्रबिंदू चाविंडाकडे सरकला
फिलोरा आक्रमणाच्या वेगाचं प्रतीक ठरलं, तर चाविंडा हा भाग पाकिस्तानच्या ठाम प्रतिकाराचं रूप ठरला. भारतीय सैन्य पुढे सरकत असतानाच पाकिस्तानने चाविंडाच्या परिसरात आपली बख्तरबंद ताकद एकवटली. परिणामी, युद्धातील सर्वात मोठा रणगाड्यांच्या संघर्षांपैकी एक याच भागात घडला.
लढाईला वेग आणि दिशा
चाविंडाच्या लढाईत कोणत्याही बाजूला स्पष्ट आणि निर्णायक विजय मिळवता आला नाही. येथे बख्तरबंद युद्धाच्या मर्यादा ठळकपणे समोर आल्या. भूभागाची गुंतागुंतीची रचना, रणगाडेविरोधी अडथळे, तोफखान्याचा सातत्यपूर्ण मारा आणि हवाई सहाय्य या सगळ्या घटकांनी मिळून लढाईचा वेग आणि दिशा ठरवली.
दीर्घकाळाचा संघर्ष
हळूहळू आक्रमणाचा प्रारंभीचा वेग मंदावला. जे आक्रमण सुरुवातीला वेगवान आणि निर्णायक धडक म्हणून सुरू झालं होतं, तेच पुढे दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात बदलू लागलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानला संरक्षणात्मक भूमिकेत ढकलण्यात यश मिळवलं असलं, तरी सप्टेंबरच्या उत्तरार्धात युद्धबंदी लागू होईपर्यंत चाविंडाजवळ ठोस भेदक यश साध्य करता आलं नाही.
पॅटन रणगाड्यांना धूळ चारली
चाविंडाची लढाई भारताला पूर्णपणे जिंकता आली नसली तरी, भारताने पाकिस्तानच्या ‘M48 Patton’ रणगाड्यांची भीती जगासमोरून काढून टाकली. अमेरिकन रणगाडे भारतीय ‘सेंचुरियन’ (Centurion) आणि ‘शेरमन’पेक्षा (Sherman) प्रगत असूनही भारतीय रणधुरंदरांनी त्यांना धूळ चारली.
हानी आणि वादग्रस्त मांडणी
मोठ्या प्रमाणावर झालेल्या लढायांप्रमाणेच, नष्ट किंवा निकामी झालेल्या रणगाड्यांचे आकडे विविध स्रोतांमध्ये भिन्न आढळतात. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी उद्ध्वस्त व निकामी झालेल्या बख्तरबंद वाहनांबाबत परस्परविरोधी मांडणी केली आहे. मात्र एका मुद्द्यावर फारसा वाद नाही. या आघाडीवरील लढाईचा व्याप आणि तीव्रता अपवादात्मक होती. सियालकोट सेक्टरमध्ये युद्धातील सर्वात भीषण रणगाडा-लढाया झाल्या. या संघर्षामुळे पाकिस्तानची प्रमुख बख्तरबंद डिव्हिजन दीर्घकाळ संरक्षणात्मक भूमिकेत अडकून पडली आणि तिला इतर आघाड्यांवर मोकळेपणाने पुनर्तैनात करता आलं नाही. याच कारणामुळे ही लढाई केवळ रणांगणापुरती मर्यादित न राहता, धोरणात्मक पातळीवरही अत्यंत महत्त्वाची ठरली.
धोरणात्मक परिणाम
सियालकोटमधील आक्रमणातून युद्धानंतर झालेल्या ताश्कंद करारात टिकून राहील असं नाट्यमय भौगोलिक यश भारताला मिळालं नाही. युद्धकाळात जिंकलेला बराचसा प्रदेश नंतर परत करण्यात आला. त्यामुळे नकाशावर पाहिल्यास या आघाडीचं यश मर्यादित वाटू शकतं. मात्र युद्धाचं मूल्यमापन केवळ भूभागाच्या सीमांवरून केलं जात नाही. या संघर्षात भारताने सर्वात मोठी बख्तरबंद आघाडी उघडत पाकिस्तानला व्यापक मोर्च्यावर लढायला भाग पाडलं. यामुळे इतर सेक्टरमधील दबाव लक्षणीयरीत्या कमी झाला. त्याचबरोबर अमेरिकन बनावटीच्या पॅटन रणगाड्यांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानच्या युनिट्सना भारतीय बख्तरबंद तुकड्या थेट आणि प्रभावीपणे भिडू शकतात, हेही स्पष्टपणे अधोरेखित झालं.

या आक्रमणाचा परिणाम तात्कालिक रणांगणापुरता मर्यादित राहिला नाही. १९६५ चा अनुभव विशेषतः एकवटलेल्या बख्तरबंद शक्तीविरुद्ध लढताना आणि संरक्षणरेषा भेदताना आलेल्या अडचणी यांनी दोन्ही बाजूंच्या लष्करी विचारसरणीवर खोल प्रभाव टाकला. पुढील काळात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्करी धोरणांच्या, तत्त्वज्ञानाच्या आणि युद्धपद्धतींच्या विकासाला याच अनुभवांनी महत्त्वाची दिशा दिली.
समतोल निष्कर्ष
सियालकोट सेक्टरमधील आक्रमणाला दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची सर्वात मोठी बख्तरबंद धडक म्हणणं अतिशयोक्ती ठरत नाही. या विधानामागे प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या सैन्यबळाचा प्रचंड व्याप आणि या मोहिमेमागची महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून येते. या आक्रमणातून एखादा निर्णायक, युद्ध तत्काळ संपवणारा आघात झाला नसला, तरी त्याने दबावाचं संतुलन निश्चितच बदललं.
पोलादाला पोलाद भिडले
१९६५ च्या युद्धाच्या व्यापक कथानकात सियालकोट हा असा अध्याय आहे, जिथे दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल दोन दशकांनी भारतीय उपखंडात इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘पोलादाने पोलादाला’ भिडण्याचं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. रणगाड्यांवर आधारलेली ही एक मोठी जोखीम होती आणि सप्टेंबरमधील त्या काही आठवड्यांत सियालकोटच्या मैदानांनीच त्या जोखमीची खरी कसोटी घेतली.
