-संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाम-मेघालय सीमेवर झालेल्या हिंसाचारात सहा जण ठार झाले. गेल्याच वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात पाच पोलीस ठार झाले होते. यापूर्वी मणिपूर आणि नागालॅण्ड या दोन राज्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला आहे. मणिपूर आणि नागालँण्ड सीमेवर गेल्याच वर्षी नागा संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. यामुळे मणिपूरला होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला होता. ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद किंवा आंतरराज्य वाद मिटविण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर दिला असला तरी वारंवार हिंसक प्रकार किंवा चकमकी घडतच आहेत. 

आसाम-मेघालय या दोन राज्यांमध्ये वाद काय आहे?

१९७१मध्ये आसामचे विभाजन करून मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून गेली ५० वर्षे या दोन राज्यांमध्ये सीमावाद सुरू आहे. या दोन राज्यांमध्ये ८८५ कि.मी.ची सीमा असून, दोन्ही राज्यांनी काही भागांवर दावा केल्याने हा वाद वाढत गेला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन राज्यांमधील वादावर तोडगा काढण्याचा अलीकडेच प्रयत्न झाला. दोन राज्यांमध्ये १२ मुद्द्यांवर मतभेद आहेत. यापैकी सहा मुद्द्यांवर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण मंगळवारी पहाटे आसाम वन विभागाच्या जवानांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात सहा जण ठार झाले. या गोळीबाराच्या घटनेनंतर आसाम व मेघालय या दोन राज्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. मेघालयचे मुख्यमंत्री कोर्नाड संगमा यांनी आसाम पोलीस व वन विभागाला या गोळीबाराबद्दल दोष दिला आहे.

गेल्या वर्षीही आसामच्या सीमेवर हिंसाचार झाला होता. तो का?

गेल्या वर्षी आसाम – मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक उडाली होती. त्यात आसाम पोलीसचे सहा जवान ठार झाले होते. याशिवाय ८० जण जखमी झाले होते. आसाम पोलीस दलात कार्यरत असलेले व मूळचे महाराष्ट्रातील वैभव निंबाळकर हे भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस.) अधिकारी जखमी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली होती. आसाम आणि मिझोरामध्ये १६४ कि.मी. परिसरात सीमा विभागली आहे. या दोन राज्यांमधील सीमा वाद मिटविण्याकरिता अनेक वर्षे चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी त्यात फार काही यश आलेले नाही.

ईशान्यकेडील सात राज्यांमधील सीमा वाद काय आहे?

ईशान्येकडील सात राज्यांमध्ये आपापसात सीमा वाद जुनाच आहे. आसाम-मेघालय, आसाम-मिझोराम, आसाम-अरुणाचल प्रदेश, मणिपूर-नागालॅण्ड असे विविध राज्यांमध्ये वाद आहेत. आसामचे विभाजन करून नागालॅण्ड, मेघालय आणि मिझोराम या राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. या राज्यांमध्ये विविध वांशिक आणि बंडखोरांचे गट आहेत. ईशान्येकडील बहुतांश सर्वच राज्यांमध्ये हिंसक संघर्षाची किनार आहे. आंतरराज्य तसेच विविध प्रादेशिक वाद आणि हिंसाचार झाला आहे. आसाममध्ये परकीय नागरिकांच्या मुद्द्यांवर हिंसाचार झाला. नागालँण्डमधील बंडखोर गटाने मणिपूरचा काही भाग नागालँण्डमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी हिंसक संघर्ष केला होता. सात राज्यांची आंतरराज्य परिषद असून या माध्यमातून संघर्ष मिटविण्याचे प्रयत्न झाले आहेत. पण त्याला फारसे यश आलेले नाहीत. आसाम आणि मिझोरामधील हिंसाचार आटोक्यात आणण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात आसाम आणि मिझो करार करण्यात आले होते.

आसामच्या आक्रमक भूमिकेबद्दल टीका का होत असते?

हेमंत बिश्व सरमा हे गेल्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यापासून आसामने विविध मुद्द्यांवर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. याबद्दल सरमा यांच्यावर टीकाही होते. सात राज्यांमध्ये आसाम हे मोठे राज्य. यामुळे आपल्याला झुकते माप मिळाले पाहिजे, अशी आसाममधील राजकारणी आणि नागरिकांची सुरुवातीपासून भूमिका आहे. आसामचे वाढते प्रस्थ मणिपूर, मिझोराम, नागालँण्ड, त्रिपुरा, अरुणाचल आणि सिक्कीम या सहा अन्य राज्यांना मान्य नसते. यातूनच संघर्ष होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are northeastern states squabbling with each other print exp scsg
First published on: 24-11-2022 at 08:04 IST